शुक्रवार, १० जुलै, २००९

वी लव्ह हिम.

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................

' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .

ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .

खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

उत्तर : लीडर

प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला ?

उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'आपल्यालाच उलट प्रश्न विचारण्यात येतो .)

प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं कापली ?

उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर चालेल ना ?')

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !) औरंगजेबाने

प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार आणला ?

उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय म्हणतात ते आठवत नाही )

इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !

या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !

तुझी साथ.

जीवनाच्या या खडतर वाटेवर लाभली तुझी साथ
स्वखुशीने पुढे केलास तू प्रेमाचा हात
तुझे ते सुमधुर बोलणे पटकन मनात
ठसते
बाह्यांगावरूनच तुझ्या सोज्वळतेची खात्री पटते.
तुझा तो लाघवी स्वभाव मनात उमेद निर्माण करतो
प्रत्येक नवीन गोष्ट करण्याची मला प्रेरणा देतो.
तुझ्याशिवाय माझे हे जगणं व्यर्थ आहे
तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे.
तुझे अस्तित्व मला सर्व ठिकाणी जाणवते
तू माझ्या जवळच आहेस याची जाणीव करून देते.
तुझे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व मनाला भुलवते
त्यामुळेच तुझ्या आठवणीत मी दिवसरात्र झुरते.
तुझ्या या प्रेमळ वागण्याने माझी झोपच उडाली आहे
सांग बरं, माझ्यावर तू कोणती जादू केली आहेस?
नकळत तुझे आणि माझे सूर जुळले
माझे अवघे जीवनच बदलून गेले.

जगण्याचा मार्ग.

स्वत:चं भविष्य, करिअर सगळेच बघतात. मी पण बघतोय आणि पण हे सगळं असताना सामाजिक देणं म्हणून मी नेहमी काही ना काही सामाजिक कार्य करत असतो.

मला काय मिळणार... काय फायदा होणार, याशिवाय कुठलंच काम होत नाही का किती फायदा बघणार! आतापर्यंत आपण प्रत्येक जण फायदाच बघत आलोय. फायदा बघतोय आणि पुढे ही बघतच राहणार.

जन्माला आल्यानंतर नकळत्या वयापासून आपण स्वत:चा फायदाच बघतोय. मी आणि माझं हेच... पाहत आलोय.

मग आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ स्वत:चा फायदा न बघता कुठलं काम करू शकत नाही का?

एवढं आपण मीपणात गुरफटून गेलोच की. आपल्या फायद्याशिवाय काहीच विचार किंवा काम करता येत नाही.

इतिहास डोकावून पाहिला तर समजेल.

बाबू गेनू यांनी परदेशी मालाने भरलेल्या गाडीखाली झोकून दिले. त्याने बघितला होता का स्वत:चा फायदा?

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा गांधी यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी घालवलं त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

विनोबा भावे गोरगरीबांसाठी गावोगावी फिरले, त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले स्वत: शिकून हालअपेष्टा झेलत स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समर्पण केले. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबा आणि साधनाताई आमटे यांनी सुखी जीवन सोडून जंगलात वाईट दिवस काढून ज्या कुष्ठरोगींची सेवा करून त्यांच्याकडून एक वेगळं विश्व निर्माण केलं. त्यांनी साधनाताईंनी बघितला होता का आपला फायदा? त्याची मुलं, सुना, नातवंडे पण हेच कार्य करताहेत त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

या लोकांनी जर आपला फायदा स्वार्थ बघितला असता तर काय झालं असतं या देशाचं, हे आपण कल्पना करूनच पाहवं. आपल्याला जरी या लोकांत सारखं महान कार्य करता येत नसलं तरी मला वाटतं आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आपला फायदा विसरून, स्वार्थ सोडून, मीपणा काढून काहीतरी कार्य करायला हवं आणि याच निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यानेच आपला एक परिपूर्ण माणूस बनायला मदत होते.

मीपण तेच करतोय अर्थात मी पण स्वत:चा विचार करतोय मला आर्ट डायरेक्टर बनायचंय आहे. त्यासाठी शिकायचं आहे. घरची जबाबदारी संभाळायची आहे. गाडी, बंगला, बँक बॅलन्स मलाही करायचं आहे. आणि त्यासाठी जी मेहनत करायची आहे ती करतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, मी ठरवलं आहे ते मी करेनच, त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. मग हे करत असताना जर मी काही वेळ स्वत:चा फायदा न बघता, कोणाची तरी मदत करत असेल, एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मी उपयोगी पडत असेन. एखादं सामाजिक कार्य करत असेल तर यात माझं काही चुकतंय का?

मला वाटतं अजिबात नाही चुकत माझं.

प्रत्येकाने असाच विचार करायला हवा, खरं आयुष्य जगणं म्हणजे हेच आहे. पण मी मात्र थांबणार नाही. स्वत:साठी करतोयच पण नि:स्वाथीर् मनाने जिथे गरज असेल तिथे दुसऱ्यांना मदत करतच राहिल. बाकी कोणीही काही बोलो. मला माझा जगण्याचा मार्ग सापडला आहे आणि मी असाच जगत राहणार.

- Namdev Bamane.

गुरुवार, ९ जुलै, २००९

बेळगावचा धडा.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणा-या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

.................

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप चालू आहे आणि ते आणखी काही काळ चालू राहील, याचे महत्त्वाचे कारण हे की, पुढील लोकसभा निवडणुकांपूर्वीचा दक्षिण भारतातील हा बहुधा शेवटचाच सार्वजनिक कौल. म्हणूनच कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, याकडे ब-याच जणांचे बारीक लक्ष होते. त्यातले अनेकांचे अंदाज चुकले, हे ओघाने आलेच. ज्यांचे अंदाज चुकले, ते आधी छातीठोकपणे आपण बोलतो, लिहितो ती कशी काळ्या दगडावरची रेघ आहे, हे सांगत होते. आता तीच मंडळी चुकलेल्या अंदाजांचे तर्कशास्त्र वाचक आणि टीव्ही प्रेक्षकांच्या गळी उतरवत आहेत. हे असेच दर वेळी चालते. या निवडणुकीतील महाराष्ट्राच्या दृष्टीने बातमी ही की, कर्नाटक विधानसभेतील बेळगाव, कारवार या सीमाभागातील जनतेचा गेली पाच दशके चाललेला लढा या निवडणुकीने संपुष्टात आणला. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता विधानसभा सीमाभागाविषयी जो काही निर्णय घेईल व विविध सामाजिक, सांस्कृतिक धोरणे संमत करेल, त्याचा प्रतिवाद विधिमंडळाच्या आत करण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. निदान ही विधानसभा हयात असेपर्यंत सीमावासीयांना आपल्या मागण्यांसाठी विधानसौधाच्या बाहेर फूटपाथवरच तिष्ठावे लागणार. गेली पाच दशके केवळ एकाच मागणीसाठी लढत राहणा-या बेळगाव, कारवारातील मराठी माणसांचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

भाषानिहाय प्रांतरचना करण्याचा फाझलका कमिशनचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला व १९५६ साली मुंबई प्रांतातून कानडी भाषिक वगळले व म्हैसूर राज्याला जोडले, तेव्हापासून हा लढा चालू आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे साडेतीन-चार वर्षे पेटलेले आंदोलन मुख्यत्वे मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून व्हावा, यासाठी होते. त्यामुळेच गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या स्थापना होताना १९६० साली मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून झाला, यातच मराठी जनांचे हात स्वर्गाला टेकले. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरचा डांग जिल्हा अगोदर वादग्रस्त होता, पण तो वाद तिथेच विरला. आणखी काही सीमाप्रांतही चूप बसले, पण बेळगाव, कारवारची मंडळी जोर लावत राहिली. त्यांची सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे आथिर्क नाती महाराष्ट्राशी अधिक जवळची होती, हे एक कारण होतेच. त्यामुळे सीमाभागातील काही लढवय्ये लढत राहिले आणि हरतही राहिले. महाजन आयोग महाराष्ट्राच्या आग्रहाखातर अस्तित्त्वात आला. त्याचा निकाल विरुद्ध गेला. कर्नाटकच्या दृष्टीने हा प्रश्न तिथेच सुटला, पण लोकेच्छा तशी नाही, हे त्यानंतरच्या विविध स्तरांवरील निवडणुकांनी वारंवार दाखवून दिले. कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणुकीतून जाहीर होणारी लोकेच्छा या स्वतंत्र बाबी आहेत, हे खरे. पण संसदीय लोकशाही मानणा-या राज्यव्यवस्थेत या निवडणुकीतून प्रकट झालेल्या लोकेच्छेचाही विचार व्हायला हवा. ही लोकेच्छा अधिक स्पष्टपणे आजमवायची, तर सार्वमत हा मार्ग होता. तो घ्यायची गरज कर्नाटकला वाटत नव्हती, कारण सीमाभाग तांत्रिकदृष्ट्या कर्नाटकाचाच भाग होता. महाराष्ट्राला असे सार्वमत घेण्यात धोका वाटत होता, कारण गोव्यात सार्वमत घेण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या अंगलट आला होता. अशा वेळी वारंवार आंदोलने पेटवणे, मोर्चे, धरणे, उपोषणे, शिष्टमंडळे आदी शिष्टसंमत उपायच अंमलात येत होते.

या विषयात कर्नाटकात अर्थातच स्वारस्य नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आदी सीमाभागातील प्रदेश वगळता कोणाला त्यात सोयरसुतक नाही. आधी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांनी आणि नंतर एन. डी. पाटील, शरद पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला खरा, पण तो केवळ राजकारण म्हणून. मुंबई, दिल्लीत बसून सीमावासीयांच्या बैठका घ्यायच्या, त्यांना आश्वासनांची गाजरे दाखवायची, झिंदाबादच्या घोषणा ऐकून कान तृप्त करून घ्यायचे आणि आपाल्या उद्योगांना लागायचे, यापलीकडे केव्हाही काहीही झाले नाही. शिवसेनेनेही हा विषय हाती घेऊन कोणालाही जमले नाही, असे उग्र आंदोलन उभारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाताबाहेर चाललेली परिस्थिती ओळखून विशाल गोमंतकचा पर्याय मांडला. तोही तिथेच थिजला.

अशा वेळी सीमाभागातील मंडळींना आपला लढा केवळ स्वत:च्याच जोरावर लढावा लागणार, हेही स्पष्ट झाले. महाराष्ट्र एकीकरण समिती या संयुक्त व्यासपीठावर सर्व मराठी जनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातच विलीन होण्याची मागणी सातत्याने लावून धरली असती, तर कदाचित चित्र बदलले असते. पण जसजशी वर्षे मागे जाऊ लागली, तसतसे या भागातील नवतरुण या मागणीपासूनही दूर जाऊ लागले, हे वास्तव आहे. पिकलेल्या केसांच्या आणि टक्कल पडलेल्या निवृत्त व निरुद्योगींचा टाइमपास असे सीमालढ्याचे स्वरुप उरले, हे वास्तवही नाकारता येत नाही. पण ही मंडळी आपल्या भूमिकेविषयी कमालीची हळवी आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या पेपरांत या आंदोलनाविरुद्ध ब्र जरी छापून आला, तरी रान उठते. त्यांची भावना ठीक आहे. तिचा आदर राखतानाच वास्तवाचे भान सोडून कसे चालेल?

' सार्मथ्य आहे संघटनेचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे वास्तव्य पाहीजे', असे समर्थ रामदासांनी सांगितले. सीमावासीयांनी संघटना तर बांधली. पण ती समर्थ कशी होणार? कारण संघटनेचे मुख्य सूत्र एकी हे असेल, तर तिचाच अभाव या एकीकरण समितीत आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटक सरकारने बेळगाव शहराला 'उपराजधानी'चा दर्जा दिल्याने शहराचे रुप पालटू लागले. महाराष्ट्रात जाऊन एका जिल्ह्याचे गाव बनण्याऐवजी 'उपराजधानी' म्हणून दिमाखात राहावे, असे काही मराठी तरुणांनाच वाटू लागले, हे खरे आहे. त्यांना सत्य परिस्थिती सांगून आपल्याकडे वळवायचे, तर समितीत ऐक्य हवे आणि हे ऐक्य निवडणुकीत दिसायला हवे. मराठेशाहीच्या उत्तरार्धात मराठे सरदार आपसात लढले आणि सर्वजण पराभूत झाले. बेळगावातील मराठी नेत्यांनी हा उत्तर पेशवाईचाच आदर्श स्वत:समोर ठेवला.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहीले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणाऱ्या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

समितीतले नेते छोट्या स्वार्थासाठी आपसात लढले आणि परिणाम म्हणून एकीकरण समितीचाच नव्हे, तर मराठी भाषिकांचा गुणफलक कोराच राहीला. हा पराभव केवळ महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून मिरवणाऱ्या डझनभर लोकांच्या टोळीचा नव्हे, तर समस्त मराठी समाजाचा झाला. या पराभवाच्या पापाचे धनी कर्नाटकातील कानडी नेते नसून मराठी भाषिकच आहेत, हे ध्यानात घ्यायला हवे. कर्नाटकातील सर्व मोठ्या पक्षांना सीमाभाग आपल्याच राज्यात हवा आहे. म्हणून त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्नच नाही. पण या प्रश्नावर महाराष्ट्रात रान उठवणारे किती मराठी नेते एकीकरण समितीच्या प्रचाराला गेले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ कर्नाटकात 'प्रचार' करत होते. त्यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जरूर प्रचार केला असेल. पण तिथल्या तुमच्या भाषा बांधवांचे काय? त्यांची तुम्हाला काळजी नाही, हे आता स्पष्ट झाले. मग महाराष्ट्रात एकीकरणाच्या परिषदा आणि राणाभीमदेवी आगखावू भाषणे कशाला? आणि कोर्टकज्जे तरी कोणाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी? याचा एकदाच अंतिम निर्णय घ्यायला हवा. कारण सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनाशी असा वर्षानुवर्षे खेळ खेळणे अमानुषपणाचे आहे.

बेळगावची महापालिका जिंकून तिथल्या मराठी समाजाने आपला ध्वज तिथं मानाने फडकावला होता, पण महापालिकेत जे जिंकले, ते मोठ्या प्रमाणावरील विधानसभेत पूर्णपणे गमावले. आता मराठीचा मुद्दा कोण लावून धरणार? महाराष्ट्र सरकारने सीमाभागाचा प्रश्न ब-याच उशीराने का होईना, सुप्रिम कोर्टात नेला आहे, त्याचा निकाल लागेल, तेव्हा लागो, तोपर्यंत विधानसभा निकाल हेच सार्वमत मानून कर्नाटक सरकार बेळगावचे कानडीकरण करणार. त्यास विरोध कोण व कसा करणार?

बेळगावचा धडा असा आहे. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मुंबई कोणाची? हा सवाल उपस्थित झाला आणि समस्त मराठी जनांनी त्याचा जवाब ती मराठी माणसाचीच, असा दिला. त्याचा परिणाम दिसलाच. ठाण्याच्या निवडणुकीतही असेच ऐक्याचे दर्शन घडले. बेळगावने अशीच एकजूट दाखवली असती, तर इतिहास बदलला असतो. पण आता ती वेळ पाच वर्षांसाठी तरी टळलेली आहे. आता केवळ चचेर्चे कवित्वच आपल्या हाती आहे.

bharat.raut@timesgroup.com

( लेखक टाइम्स ऑफ इंडिया समुहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)

शनिवार, २७ जून, २००९

सप्रेम धन्यवाद, विनंती विशेष! - श्री. राज ठाकरे


लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना लोकांनी भरभरून मतदान केले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. अवघ्या तीन वर्षांच्या `मनसे' ला आपण जे प्रेम दिले, जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरविण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावून मी यापुढील वाटचाल करीन. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पक्षाची स्थापना केल्यानंतर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीतही आपण मला साथ दिली होती. त्यावेळी पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मतदान लोकसभा निवडणुकीत करून आपण माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसाठी यापुढे अधिक कडवटपणे लढण्याचे बळ मला मिळाले आहे. आपले प्रेम यापुढेही असेच भरभरून मिळावे, यासाठी माझे `महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न' आपल्यासमोर मांडत आहे.

गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास का झाला नाही? महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात देशाचा आदर्श का बनू शकले नाही? या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वच पक्ष याला कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. त्या सार्‍यानीच महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावण्याचे काम केले आहे. दिल्लीपुढे लोटांगण घालत आपली खुर्ची सांभाळण्याचे काम केले आहे. मराठीचा मुद्दा आमचाच, असे म्हणणार्‍यानाही महापालिकेत सत्ता असतानाना दुकानांवर मराठीत पाट्या लावता आल्या, ना संसदेत महाराष्ट्राचा आवाज उठवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सार्‍याचीच नावे उठता-बसता घेणाऱ्या ‍आजच्या राजकारण्यांनी या युगपुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आज आहे का, व त्यासाठी आपण कोणते प्रामाणिक प्रयत्न केले, याचा एकदा तरी आढावा घ्यावा. `मनसे' ला लोकसभेत एकाही जागी विजय मिळाला नसला तरी अवघ्या तीन वर्षांच्या माझ्या पक्षाला मतदारांनी दिलेली `लाखमोला' ची मते ही लोकांना`गृहित' धरून राजकारण करणार्‍याच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकावून जाणारी आहेत. कालपर्यंत `मनसे' ला अनुल्लेखाने टाळणारी ही मंडळी आज `मनसे' मुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे गळा काढून सांगत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींनी गेल्या काही वर्षांत आपली विश्वासार्हता किती गमावली आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का?

गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत `मनसे' ने अनेक आंदोलने केली. माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तडीपार्‍या भोगल्या. माझ्या स्वत:वर ८० हून अधिक केसेस आहेत. हे सारे मराठी माणूस उघडे डोळे ठेवून पाहात होता. माझ्या भाषणातील तसेच कृतीतील तळमळ त्याला दिसत होती. त्यामुळेच त्यांनी `मनसे' ला भरभरून मतदान केले. यामध्ये नवमतदारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढलेल्या जाबादारीची संपूर्ण जाणीव मला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मी पाहिले. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडविण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी विकासाची `ब्लू प्रिंट' मी तयार केली. आज जो विश्वास आपण दाखवलात, तसाच विश्वास यापुढेही दाखवलात आणि महाराष्ट्राची सत्ता `मनसे' च्या हाती दिलीत, तर लोकहितासाठी कठोरपणे राज्यकारभार करून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार करून दाखवेन, एवढाच शब्द आज मी आपल्याला देतो.

दिल्लीच्या मनात महाराष्ट्राचा विकास होऊ नये, असेच आहे. किंबहूना, महाराष्ट्राविषयी दिल्ली व उत्तरेतील राजकारण्यांच्या मनात आकस व रागच आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासूनच हा आकस कायम असल्याचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीच स्पष्ट झालेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी चिंतामणराव देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दाखविलेल्या बाणेदारपणानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक सर्वच नेत्यांनी दिल्लीश्वरांपुढे कायम लोटांगणच घातल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील आजचे राज्यकर्ते तर टीकेपलीकडेच आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्न उराशी बाळगून मी `महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना केली. आज जो मी लढत आहे, तो केवळ विरोधासाठीचा विरोध म्हणून नाही, तर एक ठाम भूमिका घेऊन मी उभा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा हा लढा आहे.

जगभर अनेकदा फिरण्याचा मला योग आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही मी अनेकदा फिरलो आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांनीच नव्हे, तर अनेक छोट्या देशांनी केलेली प्रगतीही थक्क करणारी आहे. तेथील रस्ते, पाण्याची व्यवस्था, उद्योग वाढविण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न, पर्यटनाच्या माध्यमातून केलेला विकास, वाळवंटात धरण बांधण्याची साधलेली किमया... हे पाहताना माझ्या महाराष्ट्रात असे का साकारू शकत नाही, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. या सर्व देशांतील नेत्यांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांचा स्वार्थ कधी आड येऊ दिला नाही. प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले आणि विकासाचाच विचार करणारे लोक अशा प्रकारची प्रगती करू शकतात. महाराष्ट्राचाही सर्वार्थाने विकास करणे शक्य आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ताही येथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती येथे नाही, हेच आपले दुर्देव आहे. त्यामुळेच राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षानंतरही पाणी, वीज, बेरोजगारी या प्रश्नांवरच निवडणुका लढविल्या जात आहेत. हे सारे चित्र बदलायचे आहे की नाही, याचा विचार आता महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांना करायचा आहे. गेल्या ६० वर्षांतील सर्वच राजकीय पक्षांनी लोकांना गृहीत धरले आहे. जातीपातीचे राजकारण केले आहे. यामुळे महाराष्ट्र गर्तेत गेला आहे. शेतकर्‍याना आत्महत्या कराव्या लागत आहेत, तर चांगल्या शिकलेल्या तरुणांनाही बेरोजगारांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. वीज फुकट देऊ, नोकर्‍याच देऊ, दोन रुपयांत धान्य देऊ, अशा लोकप्रिय घोषणा करणार्‍याच राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांना निसर्गाकडून फुकट मिळणार्‍या पाण्याचे साधे नियोजन करता आलेले नाही. नुसता मराठवाड्याचा विचार केला, तर तेथे पाण्याची पातळी ७०० फुटांहून खाली गेली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर १५ ते २० वर्षांनंतर मराठवाड्याचे वाळवंटात रुपांतर होण्याची भीती काही अभ्यासकांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. याच मराठवाड्यात शेतीचे व शेतकर्‍याचे पाण्याअभावी हाल होत आहेत. परंतु, त्यांचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळ नाही.

औरंगाबाद येथे बीअरच्या सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यासाठी पाण्याचा उपस मराठवाड्यातच केला जात आहे. बीड आणि लातूर येथे बिस्लेरीसारख्यांचे अनेक प्रकल्प टाकण्यात आले आहेत. लोकांना बाटल्यांतील पाणी घेण्याची सक्ती करणारे हे कोणते धोरण आहे? दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत असताना आमचे राजकारणी मात्र सत्तेत मश्गुल आहेत. शेतकर्‍याच्या आत्महत्त्या झाल्या की, कर्जमाफी करायची; परंतु प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सोडवणूक करायची नाही. शेतीचे, पाण्याचे, वाढत्या शहरीकरणाचे,विजेचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य नियोजन करायचे नाही. तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्र्नच लोंबकाळत ठेवायचे, अशी या राजकारण्यांची नीती आहे. जेथे नियोजनाच्याच नावाने बोंब आहे, तेथे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही. भविष्याचा वेध घेणे, आगामी काळाच्या गरजा लक्षात घेणे, त्यासाठी महाराष्ट्रातील प्रश्नांचा आढावा घेणे - यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळही नाही आणि इच्छाशक्तीही नाही, हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

`महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना करण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा केला होता. लोकांचे प्रश्न पुन्हा एकदा समजून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चांगल्या व तज्ज्ञ लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या विकासाचा लढा लढताना लोकांचा पाठिंबा मिळेल का, याची पाहणी केली. त्यानंतरच पक्षाची स्थापना केली. हे सारे करताना केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्क येथील भाषणात महाराष्ट्राच्या विकासाची `ब्लू प्रिंट' तयार करण्याची घोषणा केली होती. आजही काही लोक खवचटपणे `ब्लू प्रिंट' कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करतात. अशी `ब्लू प्रिंट' माझ्याकडे तयार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सात विषय आम्ही तयार केले आहेत. त्यासाठी पक्ष स्थापनेच्यावेळीच पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीत तज्ज्ञ लोकांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध प्रश्नांचा निरंतर अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये अर्थकारण, आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांसह अनेक विषयांवर नेमके काय केल्यास महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास होईल, यांच्या योजना तयार केल्या जात आहेत.

चांगले रस्ते बांधल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, उद्योगांचा विकास होऊ शकतो. आजचे अनेक राजकारणी वेळोवेळी परदेशात जातात. तिथून येताना आपल्या नातेवाईकांसाठी अनेक गोष्टी आणतात. मात्र त्यांना महाराष्ट्रासाठी एखादी गोष्ट आणावी, असे का वाटत नाही? परदेशात एकदा रस्ते बांधले की, ते ३० वर्षे टिकतात. असे चांगले रस्ते आपण कधी बांधणार? चांगले रस्ते बांधले तर त्यावर खड्डे कसे पडणार आणि मग खड्डे बुजवण्यासाठी व पुन्हा रस्ते बांधण्यासाठी निविदा कशा काढणार, एवढाच विचार करणारे राजकारणी महाराष्ट्राचे काहीही भले करू शकत नाहीत. ब्रिटनमधील कंपन्यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांसंदर्भात अलीकडेच येथील महापालिकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सदर पुलाची जाबदारी ही १०० वर्षापर्यंत आमची होती. आता ही जबाबदारी तुम्ही सांभाळा. अशी बांधीलकी आमच्यात कधी निर्माण होणार? आम्ही आज पूल बांधले की, दुसर्‍या आठवड्यात त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू केले जाते. वर्षभरात पुलाला खड्डे पडून दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला जातो. या खराब बांधणीमुळे राज्याच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो आणि विकासाचा पैसा खड्ड्यात जातो. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांकडे द्रष्टेपणा नाही. एवढेच नव्हे, तर प्रश्न लोंबकळत ठेवायचे किंवा वाढवत न्यायचे, एवढेच काम ही मंडळी करत आहेत. यातून केवळ महराष्ट्रच नव्हे, तर सार्‍याच देशाचा विकास अडकून पडला आहे. चांगले रस्ते न बांधणार्या कंत्राटदारांवर कठोरपणे कारवाई होत नाही, की या कामांवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍याना जेलची हवा खावी लागत नाही, कारण राजकीय नेत्यांचे यामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात.

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी आपल्या बलिदानाची आत्माहुती दिली, अशा स्वातंत्र्यवीरांचे बलिदान भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडविणार्‍या राजकारण्यांना धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्ग शत्रू प्रवेश करू शकतो, असा इशारा दिला होता. तरी आपण आजही झोपलेलो आहोत. त्यामुळेच समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला करण्याची हिम्मत पाकिस्तानी अतिरेकी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांनी अशा बेजबाबदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे.

आज शहरांच्यानियोजनाचा पत्ता नाही. नियोजनाअभावी शहरे बकाल होत आहेत. अनधिकृत झोपड्या वाढत आहेत. कोणीही यावे व कसेही राहावे. कोणतेही नियंत्रण नाही. कसलाही धाक नाही. मुंबई व महाराष्ट्रात परप्रांतातून लोंढे येत आहेत. अनधिकृत झोपड्या बांधून राहत आहेत. या अनधिकृत झोपड्यांना मान्यता देऊन त्यांनाच मोफत घरे देण्याचे उद्योग राजकारणी करत आहेत. यातूनच मुंबईसारख्या शहरांमध्ये परप्रांतीयांची दादागिरी मतांच्या रूपाने वाढत आहे. दिवस - रात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना तसेच सरकारी नोकरांना हक्काची घरे नाहीत आणि बिहार, युपीतून येणाऱ्या लोंढ्यांना मात्र मोफत घरे मिळत आहेत. अरबाच्या तंबूत घुसलेल्या उंटासारखी येथील मराठी माणसाची अवस्था होणार आहे.

मतांच्या राजकारणासाठी शहरांची वाट लावली जात आहे. मुंबईतून केंद्राला ६८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्यातून महाराष्ट्राला योग्य वाटा केंद्राकडून दिला जात नाही. अविकसित राज्ये या नावाखाली बिहार व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांना या महसुलातील मोठा वाटा मिळतो. एकीकडे महराष्ट्राने या राज्याच्या विकासाचा वाटा उचलायचा आणि ते कमी ठरावे, म्हणून तेथून येणार्‍या लोंढ्यांनाही येथे पोसायचे, हे उद्योग महाराष्ट्राला फार काळ परवडणारे नाही. येथील भूमीपुत्रांनाच शंभर टक्के येथील व्यवसायात अथवा नोकर्यांरमध्ये वाटा मिळायला हवा. रेल्वे, आयकर अथवा अन्य केंद्रीय सेवांमध्ये महाराष्ट्रात भरती होणार असेल तर येथील मराठी तरुणांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, यावर मी ठाम आहे. यासाठीच `मनसे' ने मधल्या काळात आंदोलन पुकारल्यानंतर दिल्लीतील युपी-बिहारच्या नेत्यांनी मी देश तोडायला निघाल्याचा आरोप केला.

आज प्रत्येक राज्य आपला विकास, अस्मिता, भाषा व वेशभूषा यासाठी पराकेटीचे आग्रही आहेत. दक्षिणेतील राज्यांकडे याबाबत आदर्श म्हणून पाहता येईल. आपल्याकडील बिनकण्याच्या नेत्यांमुळे मराठी तरुणांचे हक्क डावलले जात आहेत. दुकानांवर मराठी पाट्या लावणे, शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असणे आणि नोकऱ्या मध्ये मराठी तरुणांना प्राधान्य देणे या मुद्दांवर मी ठाम आहे.

दुर्दैवाने मराठी मते फोडल्याचा आरोप माझ्यावर लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही `बालबुद्धी' च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठी मतदार म्हणजे काही शिवसेनेच्या गोठ्यातील गाय नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. २००४ साली `मनसे' हा पक्ष नव्हता. त्यावेळी मुंबईत लोकसभा निवडणुकीत काय झाले होते? मराठी मतदारांनी तेव्हा शिवसेनेला का मते दिली नाहीत, याचा विचार प्रथम त्यांनी करावा आणि त्यानंतरच मराठी मते फुटल्याचा बेताल आरोप करण्याची हिम्मत करावी.

खरे तर मराठी मते फुटलेली नाहीत. नवमतदारांनी `मनसे' ला भरभरून मते दिली आहेत. मी मांडत असलेले विचार, त्यासाठी केलेली आंदोलने, घेतलेल्या केसेस आणि माझी तळमळ अवघ्या तीन वर्षांत लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच लोकंनी `मनसे' ला मते दिल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे व अस्मितेचे स्वप्न घेऊनच मी राजकारणाच्या रणांगणात उभा आहे. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना आपण राज्यात सत्ता देऊन पाहिली आहे. आता एकदा माझ्यावर विश्वास टाकून पाहा. विधानसभा जिंकण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र मी घडवेन, एवढेच मनापासून सांगतो.

- मा. राज ठाकरे
***
(शब्दांकन - संदीप आचार्य)
सौजन्य : लोकसत्ता - लोकरंग, रविवार २४ मे, २००९.

शुक्रवार, २६ जून, २००९

माझी भूमिका, माझा लढा! - श्री. राज ठाकरे


मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल युपी-बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी-बिहारची वकिली करणार्‍या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भैय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकार्‍यांची, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत, ते चांगल्या घरातले आहेत. त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्र्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांना उत्तम करियर्स आणि व्यवसाय आहेत. परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला, ज्यातून त्यांना काहीही आर्थिक किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही. तात्काळ कोणती सत्तापदंही त्यांना मिळणार नाहीत. नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या सार्‍या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही, हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात येणार्‍या यूपी-बिहारमधल्या सर्व भैय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहोत असे वाटत असते. एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत:ची भाषा असते. तिची समृद्ध अशी संस्कृती असते. पाहुणा जेव्हा येतो, तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते, तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी, त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते. उत्तर प्रदेश, बिहारमधला साधा माणूस असो, नेता असो, पत्रकार असो, शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी असो, नट असो, वा मच्छीमार असो - तो तिथे, त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते. इथली भाषा तो शिकत नाही. इथल्या संस्कृतीला, स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो, त्याच्यावर दादागिरी करतो. एखाद्या युपी-बिहारच्या रिक्षा-टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन: पुन्हा येत असतो. आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला औदार्याने, सहिष्णूपणे पुन: पुन्हा माफ करतो, विसरून जातो. असं बंगाली, पंजाबी, उडिया, आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही. कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात. परंतु आपण सहिष्णू आहोत.

आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो. सवर्च अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही. परंतु युपी-बिहारमधल्या भैय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे. सैन्यात मराठा बटालियनमध्ये ‘मराठा’ (म्हणजे महाराष्ट्रीयन) या शब्दाची फोड ‘मरता लेकिन हटता नही वो मराठा’ अशी केली जाते. यापूर्वी हात जोडून या यूपी-बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता-बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की, इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे, तेव्हा या संस्कृतीचं रक्षण, संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे. असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं. परंतु यांची मग्रूरी इतकी आहे की, उत्तर प्रदेश-बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह, मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ‘शिकवण्याचे’ प्रयोग इथल्या युपी-बिहारवाल्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच. पण मराठी ही इथली राजभाषा आहे. तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. शिवाय स्वत:ची भाषा-संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला युपी-बिहारमधल्या भैय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का? या भैय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रात छट पूजा, उत्तर प्रदेश स्थापना दिवस, राजकीय बळ दाखवण्याकरिता जोराने साजरे करायला सुरुवात केली. रिक्षा असो, टॅक्सी असो, रस्ते असोत, इमारती असोत, सोसायट्या असोत, वर्तमानपत्रं असोत, चॅनल्स असोत, मच्छिमारी असो, सिनेमे असो - सर्वत्र या युपी-बिहारवाल्या भैय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली. तेव्हा लक्षात आलं की, यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले. आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं. म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी महाराष्ट्रात युपी-बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणार्‍यांना जगावं लागेल. महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल. हे झालं नाही, तर महाराष्ट्रात अराजक माजेल.


महाराष्ट्रात जी कायदा-सुव्यवस्था आहे, महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत, त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात. ती संस्कृतीच उखडून टाकली, तर इथे जौनपूर-आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल. राजाभय्या, अमरसिंह, लालू, पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील. हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसर्‍या दिवशी कोल्हापूरमध्ये ‘महाराष्ट्राचे पुढचे मख्यमंत्री अमराठी झाले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही,’ असे उद्‌गार काढले. आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत. परंतु ही सार्वत्रिक भावना आहे. मराठी जनतेत, मराठी नेत्यांमध्ये, मराठी नटांमध्ये, सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या युपी-बिहारवाल्यांबद्दल चीड आहे. मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो. नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे. ते साहस मी करतो आहे. परिणामांची पूर्ण कल्पना करून. एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं, आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं, बाळासाहेबांनी केलेलं होतं, खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं.

कित्येक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात. परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली, तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे. तेव्हाचं आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं, प्रामुख्यानं नोकर्‍यांसाठीचं आंदोलन होतं. इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले. आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे. त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते, त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन, शस्त्रास्त्रं आहेत. इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात. भैय्या टॅक्सीवाला, रिक्षावाला, मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भैय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात. परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मग्रुरी, महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष, उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या सार्‍याचं आपल्याला दर्शन होतं. त्यामुळे ‘तो गरीब बिचारा पोटासाठी येतो’ अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही.

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे. ती एकपदरी नाही, बहुपदरी आहे. महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो. युपी-बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ‘व्हाया दिल्ली चेपू इच्छितात. हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे. पं. बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरिसा, आसाम, केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही.
कारण तिथली जनता या भैय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे. स्वत:च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरूद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत. पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही.

आज मराठी माणूस समृद्ध आहे. त्याची आज जागतिक बाजारात पत आहे. दीपक घैसास, आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर आणि यांसारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत. आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकर्‍या करत आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे. पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो. या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत.

एकेकाळी, म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. तेव्हा तो माझाही पक्ष होता. तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता. बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच. त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही.

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यातलेच काही मराठी मला आणि माझ्या सहकार्‍यांना शिव्याशाप देत आहेत. पण त्यांची मुलं-नातवंडं पुढे मला दुवा देतील. कविता, पुस्तकं, संस्कृती, अहिंसा, सहिष्णुता मलाही कळते. नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी, विकासदृष्टीसाठी मी अकादमीच (पुण्यात) सुरू केलेली आहे. ज्या शिवाजी पार्कवर परवा स. पा. ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या, तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं. त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते. पण मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी कविता टिकेल. मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी संस्कृती टिकेल. मराठी संस्कृती टिकेल तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल. शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो. पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. तसं नसतं तर शेजार्‍यांच्या सद्‌सद्‌विवेकबुद्धिवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलीसदलही ठेवलं नसतं. संघर्ष करताना रक्त, घाम, अश्रू द्यावेच लागतात. पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात!

फ्रांन्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत: भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रांन्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात. करुणानिधी मलेशियातल्या तामिळांसाठी मलेशियन सरकारशी वाग्‌युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते. दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो. इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणार्‍या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही. राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणार्‍या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्यावर थेट संबंध ठेवून असतात. गांगुलीला टीममधून काढल्यावर पं.बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात. हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत युपी-बिहारची वकिली करतात, ते प्रांतवादी नाहीत? अमिताभ बच्चन स्वत:ला ‘छोरा गंगा किनारेवाला’ मानतो. ते प्रांतवादी नाही का? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणार्‍या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी, भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं, तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत, असं दाखवलं जातं. त्यांचा मेकअपमन जरी गांगुली, सुब्रम्हण्यम, मिश्रा कुणीही असता, तरी ते असेच वागले नसते काय? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय? ते तन, मन, धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत. त्यांनी जे मिळवलं ते इथे, हेही सत्य नाही का?फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो? राज्यघटनेत असं लिहिलंय का? मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो. सर्व जग जरी विरोधात गेलं, तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता, महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषा यासाठीच लढत राहू. युपी-बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच. मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की, जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय, सामील व्हा!

आपण विजयी होऊच; कारण कोणताही कायदा, कोणतंही युद्ध, कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मराठी माता-भगिनी-बांधवांनो, विजय तुमचाच आहे.

जय महाराष्ट्र!


-महाराष्ट्र टाईम्स, ९ फेब्रुवारी, २००८

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी...

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी, कोणीतरी आपल्याला आवडतं. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. कालांतराने हीच भावना बळावते आणि 'त्याच्या' किंवा 'तिच्या' शिवाय जगणे फार अवघड आहे इत्यादी इत्यादी विचार मनात येतात. हे सगळे फार नैसर्गिक आहे. खरंतर हा त्या वयाचा प्रताप असतो. खरंतर त्या वयात 'कुणीतरी' आवडावं इतकीच योजना निसर्गाने केलेली असते. पण 'त्याच्याशिवाय शक्य नाही' हा मात्र पूर्ण मनाचा खेळ असतो. आयुष्यात प्रथमच असे घडत असल्याने मनाची तशी समजूत होणे स्वाभाविक आहे. त्या वयात निसर्ग स्वप्न पहायची वृत्ती देतो, व्यवहार नव्हे. प्रेम करायची भावना देतो, विषयाकर्षण नव्हे. 'तूच एकमेव' चा विचार देतो, 'तू पण चालेल' नव्हे. थोडक्यात काय, तर मन स्वप्नाळू आणि अपरीपक्व असते.

पण हा काळ दुर्दैवाने जास्त नसतो. मनाची ही अवस्था आयूष्यभर राहू शकत नाही. ते जेंव्हा स्वप्नातून सत्यात येते, तेंव्हा 'स्वप्नात असताना' घेतलेले निर्णय जर त्याला चुकिचे वाटले तर मग सुरू होते ती मनाची असह्य फरफट. आणि प्रेम-विवाह करून नंतर घटस्फोट घेणार्‍या बहुतांश जोडप्यांमध्ये ही फरफटच कारणीभूत असते!

मग सत्य काय आहे? अशा मनाला काबूमध्ये आणावे तरी कसे? योग्य जोडीदार खरोखर 'एकमेव' असतो का? 'त्या वयात' मनाची समजूत कशी घालावी? असे अनेक विचार मनात येतात. आणि इथेच मन परीपक्व व्हायला चालू होते असे म्हणायला हरकत नाही.

व्यवहारी विचार केला, तर 'तो किंवा तीच एकमेव' ही कल्पना चुकीची आहे. एक नाही मिळाला तरी आपल्याला हवा तसा दुसरा जोडीदार मिळणे हे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. शेवटी 'लग्नांतरचे यशस्वी आणि सुखी आयुष्य' हेच आपल्याला हवे असते ना? मग काय लागते त्यासाठी? तर त्यासाठी तीन 'स' पहावे लागतात. 'सवय, स्वभाव आणि समजूतदारपणा'.

सवयी काय आहेत? आपल्याला जूळणार्‍या आहेत का? (एकाला क्रिकेट आवडते तर दुसर्‍याला 'एकता कपूर' ची सिरियल! बस्स इतके कारण खूप असते. हो ना? :) स्वभाव कसा आहे. आपल्याशी जुळतो का? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट 'समजूतदारपणा'. ही एकच गोष्ट पहील्या दोन्हींना पुरून ऊरेल. म्हणजे, जरी स्वभाव आणि सवयी जुळत नसतील तरी केवळ 'समजूतदारपणा'च्या जोरावर संसार खूप सुखी होतो.

तेंव्हा, तारुण्याच्या भरात पट्कन आवडून गेलेली एखादी व्यक्ती 'आयुष्याचा जोडीदार' करण्याची गडबड मुळीच करायला नको. ह्या तिन्ही गोष्टी पुरेसा वेळ देउन पहायला हव्यात.. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या तिन्ही गोष्टि जुळणारी एखादी व्यक्ती जरी आपली झाली नाही, तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही. आपल्यासाठी दुसरे कोणी तरी जरूर वाट पहात असते :)

शुक्रवार, ५ जून, २००९

प्रेम

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
नेहमीच वाटत.....

नेहमीच वाटत कोणीतरी आपलस व्हाव्
सुखदु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
ह्रदयात सामावून घेणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत बागेत भेट्णार कोणीतरी असाव्
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत हातात हात घेणार कोणीतरी असाव्
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असाव्
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठ्वणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असाव्
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
मलाही आय लव्ह यु म्हणणार कोणीतरी असाव्

एक लघु कथा ...

एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....


सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

मराठी माणूस...

उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..

अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकातच दिसेल..

.....

म्हणून म्हणतोय मित्रांनो..
हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि

"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..

दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..

आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक
... असेल हिंमत .. तर अडवा...

मराठी प्रतिज्ञा

मराठी ही माझी मातृभाषा आहे.

मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.

माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.

इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.

त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.

जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.

महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.

मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.

मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.

मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.

जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!

शुक्रवार, २९ मे, २००९

उद्धव-राज रायगडावर महाराजांना भेटतात तेव्हा…...


खास मराठी चित्रपटप्रेमींसाठी सविनय सादर करत आहोत, ‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय II’ (लोकसभा निवडणुकीनंतरचा)...सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करायचेय, ती म्हणजे पुढे आपण जो प्रसंग वाचणार आहात, तो संपूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा कदापि संबंध नाही. तुम्हाला वाटला तर तो निव्वळ योगायोग समजा...कारण कुणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. किंबहुना मराठीजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्रपंच...

तर, महेश मांजरेकरांचा ‘ मी शिवाजीराजे... ’ आपण सगळ्यांनी पाहिला आहेच. त्यातली शिवाजी महाराजांची एन्ट्री आठवा... ‘ लाज वाटते मराठी म्हणून जन्माला आल्याची, लाज वाटते ’, हे दिनकरराव भोसलेंचे हताश, हतबल उद्गार ऐकून व्यथित झालेले छत्रपती शिवाजी महाराज, आपले मावळे पाठवून दिनकररावांना रायगडावर बोलावून घेतात आणि त्यांची चांगलीच कानउघाडणी करतात.

आता ‘ पार्ट II’ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर महाराज त्याहूनही अधिक व्यथित झालेत आणि चिडलेतही. (का ?, ते आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे.) तर, यावेळी त्यांनी आपले दोन मावळे ‘ मातोश्री ’ वर आणि दोन ‘ कृष्णकुंज ’ वर (किंवा कृष्णभुवन) पाठवले आणि ते उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना रायगडावर घेऊन गेले.

कट टू रायगड...

(महाराजांचा दरबार भरलेला. राज आणि उद्धव झोपेतून जागे होतात. एकमेकांकडे पाहतात आणि लगेचच तोंड फिरवतात. पुढच्याच क्षणाला समोर साक्षात छत्रपतींना पाहून दोघंही थक्क होतात. बाळासाहेब आणि बाबासाहेबांनी (पुरंदरे) शिकवल्याप्रमाणे दोघंही लवून महाराजांना मुजरा करतात.)

उद्धव-राज एकत्रः महाराज आपण ?
महाराजः होय...मी !
राजः महाराज, आपण स्वतः येण्याची तसदी घेतलीत ?
महाराजः न येऊन कसं चालणार होतं ?
उद्धवः का महाराज ? आमचं काही चुकलं का ?
महाराजः चुकलं ? अहो, घोडचूक झालेय तुमच्याकडून. भाऊबंदकीचा शाप आपल्या महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, तुमच्या भाऊबंदकीचा त्रास माझ्या मराठी बांधवांना, माता-भगिनींना भोगावा लागतोय. म्हणूनच तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतलंय आम्ही...
राजः नेमकं काय झालंय महाराज ?
महाराजः काय झालंय ? दो ही मारा, पर सॉल्लिड मारा, हे तुमचे उद्गार ऐकलेत आम्ही ! अहो, पण ते दोन रट्टे माझ्या मराठी माणसालाच लागलेत ना !
(राजला झापल्याचं पाहून उद्धव गालातल्या गालात हसतात. तेव्हाच महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे जातं.)
महाराजः उद्धवसाहेब तुमचीही प्रतिक्रिया वाचली आहे आम्ही. मराठीचं काय करायचं ते मनसेला विचारा, असं सांगून तुम्ही मोकळे झालात. तुमचं दोघांचं जे काही चाललंय, ते कितपत योग्य आहे ?
राजः महाराज, आमच्यात काय झालंय ते बहुतेक तुम्हाला ठाऊक नाही.
महाराजः आम्हाला ठाऊक नाही ? गनिमी कावा काय असतो हे आम्ही तुम्हाला शिकवलं. त्यावेळचे आमचे गुप्तहेर आजही तितकेच समर्थ आहेत. महाराष्ट्रात जे काही होतंय, ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचतंय. विशेषतः, शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तर आमचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्यात काय झालं, कसं झालं, हे सगळं आम्ही जाणतो. अगदी २७ नोव्हेंबर २००६ पासून, किंबहुना त्या आधीपासूनचा सारा घटनाक्रम आम्हाला ठाऊक आहे. मराठी माणसाला हक्काचे दोन नेते मिळतील, असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं. पण हे सगळं भलतंच घडतंय.
उद्धवः महाराज, पण लोकसभा निवडणुकीत जे काही झालं, तो तमाशा ‘ राजा ’ मुळेच झालाय ना ? त्याची जी काही ‘ बकबक ’ चाललेय, त्यामुळेच मराठीच्या दुश्मनांचं भलं होतंय. त्यामुळे त्यानं सुधारायला हवं.
राजः महाराज, तुम्हीच सांगा कोण चुकतंय ? मराठी माणसाचा आवाज उठवण्याचा मी प्रयत्न केलाय. आमच्या ‘ दादू ’ ला मराठीचा एवढाच पुळका आलाय, तर त्यांचे ११ खासदार काय नेपाळी आहेत का ?
महाराजः (अधिकच संतापतात) ... खबरदार ! ही सगळी भाषणात ऐकवायची वाक्यं आम्हाला ऐकवू नका. ती आधीच ऐकली आहेत आम्ही आणि त्यामुळेच व्यथित झालो. खरं तर आधीच बोलावून, तुम्हाला खडसावण्याचा विचार होता. पण म्हटलं, तुम्ही सुजाण आहात, हुशार आहात, सगळं ठीक होईल. पण कसलं काय, तुम्ही तर माझ्या मराठी माणसांमध्ये फूट पाडताय. हे आम्ही सहन नाही करू शकत.
राजः (अत्यंत खेदाने) असं नका म्हणू महाराज, बरं का !
महाराजः तुम्हीच भाग पाडलंय मला हे सगळं ऐकवायला. अतिरेक झालाय सगळा. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेची, मराठी माणसाच्या संघटनेची काळजी वाटतेय आता आम्हाला. काय वाटत असेल त्यांना हे सगळं पाहून ? लोकसभा निवडणुकीत मराठी माणसामुळे, मराठी माणसाचं पानिपत झालं आणि तरीही तुमचं वाक्-युद्ध सुरूच आहे, ही बाब आमच्या मनाला चटका लावून गेली आहे. याचसाठी का केला होता अट्टाहास ? याचसाठी का मराठा तितुका मेळविला होता ?

(दरबार शांत. राज-उद्धव अंतर्मुख होऊन विचार करत असतात. महाराज दोघांकडेही पाहतात.)

उद्धवः महाराज, तुमच्या मते हा दोष कुणाचा ?
महाराजः चूक तुम्हा दोघांचीही आहे.
राज-उद्धव एकत्रः ती कशी
महाराजः आठवून पाहा शिवचरित्र. सगळ्या मराठींना-मराठ्यांना-माझ्या या सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन आम्ही लढलो नसतो, तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं असतं का ? शाहीर बाबासाहेब पुरंदरे आमचे चरित्र सांगताना हे प्रत्येक वेळी सांगतात. तुम्ही दोघंही ते बालपणापासून ऐकत आहात. कळतंय सगळं पण वळत नाही आहे.
राजः असं का म्हणता महाराज ?
महाराजः अहो , शिवाजी काय म्हणतो हे तुम्ही तुमच्या भाषणांतून कायम सांगत असता . पण ते कृतीत उतरलं नाही . पहिले ते राजकारण , हे तुम्ही लक्षात ठेवलेत , पण त्यातलं सावधपण तुम्ही विसरलात . पांडव आणि कौरव एरव्ही एकमेकांच्या विरोधात होते . पण तिसरा शत्रू आला की ते १०५ होते . पण तुम्ही एकमेकांविरोधात लढत राहिलात आणि त्यात ‘ शत्रूं ’ चा फायदा झाला . आता मला मुंबई - ठाण्यातल्या माझ्या मराठीजनांची काळजी वाटतेय . त्यांचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल .
उद्धव-राज एकत्रः ते कसं शक्य आहे महाराज ?
महाराजः का शक्य नाही ? मराठी माणसाचा उद्धार करण्याचं, महाराष्ट्राचं भलं करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे ना...मग का नाही शक्य ? लोकसभा निवडणुकीतले मतांचे आकडे बघा. मतांचं विभाजन झालं नसतं, तर विजय मराठी माणसाचाच होता. विधानसभा निवडणुकीत तशी रणनीती आखा. हवं तर आमची प्रत्येक लढाई आठवून पाहा आणि त्यातून काहीतरी बोध घ्या. एकत्र आलात, तर उत्तमच...पण वेगळं राहूनही मराठी माणसांसाठी एक होऊ शकता ना ! तसं झालं तर आणि तरच मराठी माणसाला न्याय मिळेल, त्याचा दबलेला ‘ आवाज ’ पुन्हा फुटेल. हा आमचा सल्ला नाही, तर आदेश आहे आणि तुम्हाला आदेश करण्याचा आम्हाला हक्क आहे. आहे ना ?
राजः महाराज , हे काय विचारणं झालं का ?
महाराजः तर मग शपथ घ्या, मराठी माणसासाठी एकदिलानं लढण्याची. शत्रूचा सामना करण्यासाठी तुम्हाला तलवार द्यायची गरज नाही, कारण तुमचे शब्दच तितके धारदार आहेत. त्याचा योग्य वापर करून मराठीच्या शत्रूंना नामोहरम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत !
उद्धव-राजः आम्ही चुकलो महाराज ! आता आम्ही एकदिलानं लढण्याचा प्रयत्न करू.

(या प्रसंगाचा हा शेवट समस्त मराठीजनांची इच्छा लक्षात घेऊन केलाय. काय मंडळी, तुम्हालाही तसंच वाटतंय ना ? )

शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १५६ ...आठवावा प्रताप !

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा
गोंधळ काही नवीन नाही. पाच वर्षापूर्वीही याच गदारोळावर भाष्य करणारा हा अग्रलेख ...

..........................................

आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती।
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।।

समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात.

परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली.

या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांचे सरकार सत्तेवर आले. समितीच्या अहवालावर विचार करण्यासाठी विलासरावांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त झाली. या समितीने शिवरायांचेे स्मारक मुंबईत करण्याऐवजी ते रायगड किंवा शिवनेरीवर करावे , असे सुचवले. शिवाजी महाराजांचे नाव घेताच ज्यांचे बाहू फुरफुरू लागतात , अशा मंडळींचे यामुळे पित्त खवळणे स्वाभाविकच आहे. वास्तविक विलासरावांच्या समितीचा निर्णय कटू असला , तरी योग्यच म्हणावा लागेल.

मुंबईत शिवाजी महाराजांचे तीन अश्वारूढ पुतळे आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ व मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन बोरीबंदर यांना शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नाव बदलून त्यालाही महाराजांचे नाव देण्यात आले. याखेरीज छोटी-मोठी स्मारके आहेतच. याहून आणखी स्मारक करायचे म्हणजे काय करायचे ? चौकाचौकात पुतळे उभारल्याने चिमण्याकावळ्यांचीच सोय होते व इमारती आणि रस्त्यांना नावे देऊन आद्याक्षरांचे शॉर्टफॉर्म होऊन थोर नेत्यांच्या स्मरणापेक्षा विस्मरणच अधिक होते. पण शिवराय गेल्यानंतरही त्यांचेच आश्रित होऊन आपली उपजीविका करणाऱ्यांना इतके भान कुठले ? त्यामुळेच विधान परिषदेत गदारोळ झाला व अखेर सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना या समितीच्या शिफारशींचा पुर्नविचार करण्याचे आश्वासन द्यावे लागले.

म्हणजे आता आणखी एका समितीची सोय झाली. हे असे किती काळ करून जनतेची फसवणूक करत राहणार ? शिवाजी हा रयतेचा राजा. आज महाराष्ट्रातील रयत एका बाजूला दुष्काळ व वीज टंचाई आणि दुसऱ्या बाजूला भयानक बेकारी यांच्या दुष्टचक्रात पिसून निघत असताना , शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवणारे मात्र त्यांच्या स्मारकाचे लोणी कसे खाता येईल , याचाच विचार करत राहिले आहेत. छत्रपती आज असते , तर आपल्या स्मारकाच्या मागणीसाठी सभागृहाचा वेळ फुकट घालवणाऱ्यांनाच मणामणाच्या बेड्या घालून त्यांचा कडेलोट करण्याच्या आज्ञा त्यांनी दिल्या असत्या.

ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाचा इतका कळवळा आला आहे , त्यांनी एकवार शिवनेरीवर किंवा पायात त्राण आणि उरात दम असल्यास रायगडावर जाऊन यावे. शिवस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंची जी परवड झाली आहे , ती नजरेखालून घालावी. शिवनेरीची अवस्था इतकी वाईट की , गडावर एकही माहिती फलक नीट अवस्थेत नाही. जे पर्यटक शिवप्रेमाने शिवनेरीवर येतात , त्यांना ठीक माहिती देण्यासाठी एकही अधिकृत वाटाड्या नाही. रायगडाची अवस्थाही फारशी चांगली नाही. या गोष्टी आमदारांना ठाऊक नसतीलच , असे नाही.

पण रायगड वा शिवनेरी अथवा अन्य गड-किल्ले दुरुस्त केल्याने त्यांना काय फायदा ? मुंबईत स्मारक केले , तर त्याची पायाभरणी , उद्घाटन , नंतर दरवषीर् वर्धापनदिन यानिमित्ताने मिरवता येणे शक्य आहे. शिवाय शिवाजी महाराजांसाठी ' लढण्याचे ' भांडवल करून पुढील निवडणुकीत भाबड्या शिवप्रेमींकडे मताचा जोगवाही मागता येईल. राजकारणात राहायचे आणि कायम सत्तेचीच गणिते मांडायची , तर हा विचार योग्यच म्हणावा लागेल. पण आपले लोकप्रतिनिधी शिवाजी महाराजांच्या नावाचेही ' माकेर्टिंग ' करत आहेत , हे जनतेला ज्या दिवशी कळेल , त्या दिवशी या तथाकथित ' राष्ट्रवादीं ' ची ते कशा पद्धतीने संभावना करतील , याचा विचारच केलेला बरा.

समर्थांनी म्हटले की , ' शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप। शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।। ' महाराजांच्या मानसिक आश्रितांना हे उमगले नाही , तर जनताच त्यांना शिवराजांच्या प्रतापाची प्रचीती आणून देईल. थोडक्यात , अद्याप वेळ गेलेली नाही. शिवाजी महाराजांचे ' आंतरराष्ट्रीय ' ख्यातीचे स्मारक मुंबईतच उभारण्याचा दुराग्रह धरण्याऐवजी रायगड , शिवनेरीसारख्या किल्ल्यांची डागडुजी करून ती उत्तम पर्यटनस्थळे बनवावीत व तेथे सैनिकी प्रशिक्षणासारखी व्यवस्था करावी , हेच उत्तम.

शिवचरित्रमाला भाग १५५ शिवरायांचा आठवावा साक्षेप.

शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्
रतीक बनायला हवे होते. पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे... शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने हे खडे बोल...
........................................
- बापू म. राऊत

आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे.

पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंगरक्षक मुसलमान होता , तर अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् होता. याचा भावार्थ असा की , त्यावेळी समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नव्हती. जे शिवरायांचे मुस्लिम सैन्य होते ते मोगलांविरुद्ध लढे , तर मुसलमान राज्याच्या पदरी असलेले हिंदू सैनिक शिवरायांविरुद्ध लढत.

इतिहासकार काफी खान म्हणतात की , शिवराय आपल्या सैनिकांना मशीद , कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसे. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यात मुस्लिम व ख्रिश्चनांना नोकरी देत असत. फ्रेंच प्रवासी बनीर्यर याने म्हटले आहे की , शिवरायांनी कांपुचियन मिशनरी फादर अब्रोस याच्या घराचे व इतर वस्तूंचे मोठ्या आदराने रक्षण केले. शिवाजी महाराजांनी म्हटले होते की , फेंच पादरी ही चांगली माणसे असतात , त्यांना उपसर्ग होता कामा नये. परंतु , आज त्यांच्या नावाचा उद्घोष करणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले करतात , नन्सवर बलात्कार करतात. महाराजांच्या गुरूंपैकी संत याकूब बाबा हे मुस्लिम संतही होते. हे पाहता , खरेतर आज शिवराय सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते. पण , त्यांना हिंदुत्ववाद्याच्या हातातील मुस्लिमविरोधी अमोघ हत्याराची अवकळा आणली जात आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध आपली मते प्रस्थापित करण्यासाठी जे महाराजांच्या नावाचा वापर करतात , त्यांना सामान्य लोकांनी सुनावले पाहिजे की , शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेत राजा म्हणून कधीही धर्मावरून भेद केला नाही. आपल्या धर्माइतकाच दुसऱ्याचा धर्मही श्ाेष्ठ व उच्च आहे असे त्यांचे मत होते.

शिवराय इतर मराठा सरदारांप्रमाणे मोगल सेनेचे मांडलिक बनले नाहीत. ते परकीय सत्तेच्या विरोधात संघर्षरत राहिले. वारसा हक्काने ते राजा बनले नव्हते , तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते.

पण आज शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास लोकांना सांगत आहेत. शिवरायांच्या प्रखर बुद्धीला व पराक्रमाला ते नाकारत आहेत. दांभिक माणसे शिवाजीच्या यशाचे श्ाेय अध्यात्म व भवानीदेवीला देत आहेत. शिवाजी महाराजांना भवानी प्रसन्न झाली , म्हणून ते यशस्वी झाले , असे भोळ्याभाबड्या लोकांना सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की , भवानी तलवार म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार पोर्तुगीज बनावटीची होती.

सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याच्या महाराजांच्या प्रयत्नांना ब्राह्माण कारकुनांचा विरोध असे. राज्याभिषेका-नंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती दिली होती , पण , त्यांनाही ब्राह्माणांकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी ' ब्राह्माण म्हणोनी कोणाचा मुलहीजा करणार नाही ' अशी सक्त ताकीद दिली होती.

हिंदूधर्मरक्षक म्हणून शिवाजीला मिरवणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की , याच हिंदू धर्माने व त्याच्या रक्षकांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. 44 व्या वषीर् मुंज व एकदा झालेला विवाह दुसऱ्यांदा करावयास लावला होता. महाराजांना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगास महाराष्ट्रात पाठविले होते. शिवाजीवर विजय कसा मिळवावा या चिंतेत तो असताना इथल्या ब्राह्माणांनी त्यासाठी देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्युघंटा वाजवीत होते , तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भिक्षुकशाही मात्र धामिर्क प्रतिक्रांतीद्वारे मोगल साम्राज्यशाहीचे मरण लांबणीवर टाकत होती.

शिवरायांच्या संघर्षकाळात त्यांचे सर्व सैनिक मावळे होते. त्यांत आदिवासी , कुणबी , अस्पृश्य व मुस्लिम होते. या सर्व मावळ्यांना शिवाजीने ' मराठा ' बनविले , असे ग्रँट डफ यांच्या ग्रंथात नमूद केले आहे. शिवरायांनी स्त्रियांचा मान राखला होता. शिवाजीच्या काळी गोरगरीबांच्या लेकी-सुना या पाटील-वतनदाराच्या उपभोगवस्तू होत्या. पण शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. 1678 साली सकुजी गायकवाड या सेनापतीने सावित्रीबाई देसाई या किल्लेदार बाईस हरवून विजयाच्या उन्मादात तिच्यावर बलात्कार केला. हे शिवरायांना समजले , तेव्ह त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावून जन्मभर तुरुंगात टाकले.

एकदा राज्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या मुलीला सर्वांसमक्ष उचलून नेली व उपभोगली , तेव्हा शरमेने तिने जीव दिला. महाराजांनी पाटलाला मुसक्या लावून पुण्यात आणले गेले व त्याचे हातपाय तोडले. रयतेच्या अब्रूचे रक्षण करणाऱ्या शिवाजीचा आदर्श त्याचे उठसूठ नाव घेणारे पाळतात काय ? अत्याचाऱ्यास शिक्षा होते काय ?

तथाकथित शिवभक्त व कट्टर हिंदुत्ववादी शिवाजीचा हा आदर्श पाळून त्यांच्या डोक्यावर मानाचा तुरा लावतील काय ?

शिवचरित्रमाला भाग १५४ आधुनिक त्रिमूर्ती.

भारतीय राजकारणात छत्रपती शिवाजी , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही
आधुनिक त्रिमूर्ती आहे. त्यांच्यातल्या या सूत्राची ओळख करुन देणारा हा लेख...

.............................

- ज्ञानेश महाराव

माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली त्याच्या कार्य-स्मरणाची असते. भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वांत छत्रपती शिवराय , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. या तिघांच्या नेतृत्वात , कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं ? हे तिघेही लोकनेते होते. तथापि , त्यांच्या नेतृत्वाला निश्चित विचारतत्त्वांची बैठक होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागतात आणि तत्त्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत , असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. परंतु हे तीन लोकनेते या इतिहासास अपवाद ठरले , म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक झाले.

छत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याचीच नव्हे , तर स्वराज्याची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्याचा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूतीर्ंच्या स्वराज्य , स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांत आहे. या तीन तत्त्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली भारतीय लोकशाही हेच या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे ; परंतु हेच कार्य विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. आज या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यात फार मोठं वैचारिक अंतर आहे. ते त्यांच्या कार्याचा घोर अपमान करणारे आहे. ' डॉ. आंबेडकरांचा विजय असो ' म्हणताना ' जय शिवाजी! जय गांधीजी ' असाही गजर व्हायलाच हवा. तसंच ' शिवाजीमहाराज की जय ' चा नारा लगावताना महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचाही जयजयकार करण्यास विसरू नये.

या तिघांचं जीवनकार्य हे राष्ट्रउभारणीचं शास्त्र आहे. तथापि , त्याचा संस्कार करवून घेण्याऐवजी त्यांची नावं शस्त्रासारखी एकमेकांविरोधात वापरली जात आहेत. महात्माजी काँग्रेसवाल्यांचे , डॉ. आंबेडकर दलितांचे आणि शिवराय दोघांनाही विरोध करणाऱ्यांचे ; अशी या विभागणी झालीय. ती राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यामुळे समाजात अहंकार बळावतोय , मूर्खपणा वाढतोय.

महात्माजी आणि आंबेडकर या दोघांनीही शिवरायांच्या समताधिष्ठित राज्यपद्धतीला आदर्श मानलं आहे. खेडे स्वयंपूर्ण व्हावे , ग्रामविकास व्हावा या गांधीविचारांची बीजे शिवशाहीत आहेत. शिवरायांच्या भूमीत कार्यर्कत्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजी साबरमतीचा आश्रम बंद करून र्वध्याला आले. काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारताच ' शिवाजीमहाराज की जय! तिलकमहाराज की जय! ' म्हणत भारतभर फिरले. महात्माजींना आंबेडकरांच्या कार्याबद्दलही आस्था होती. दोघांत वैचारिक मतभेद होते. कारण दोघांचे मार्ग भिन्न होते. परंतु उद्दिष्ट एकच- मानवतेचं रक्षण व मानवतावादाला बढावा देणे हेच असल्यामुळे उभयतांना परस्परांबद्दल आस्था होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर म्हणाले , ' आज मी समाधानी आहे. गांधींना दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. '

डॉ. आंबेडकरांच्या नियोजित ग्रंथलेखनात महात्मा फुले यांच्या चरित्राप्रमाणे महात्मा गांधींच्याही चरित्राचा समावेश होता. ते जाहीरपणे म्हणाले होते , ' माझ्यापेक्षा गांधींना अधिक कोण ओळखतं ? म्हणून मीच त्यांचं चरित्र लिहिणार आहे. ' गांधीजींच्या जिवाचीही चिंता आंबेडकरांना होती. त्यांनी गांधींना अनेकदा सावधही केलं होतं. ते गांधींना म्हणालेही होते , ' एक वैश्य , बनिया ब्राह्माणांसकट सर्वांचे नेतृत्व करतो , ही गोष्ट चातुर्वणीर् ब्राह्माणांना माहीत नाही , असं समजू नका ; पण एक गोष्ट तेवढीच खरी की , जोवर तुम्ही ब्राह्माणांचे हितसंबंध जोपासता तोवर तुमच्या महात्मापणाला धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही ब्राह्माणांच्या हिताला बाधा आणाल , तेव्हा तुमची काय गत होईल , ते मी सांगण्याची गरज नाही. ' हे शब्द नथुरामने खरे केले. गांधींबद्दल आंबेडकरांच्या मनात असलेली ही आस्था त्यांच्या अनुयायांनीही आपल्याला रुजवायला पाहिजे होती. सत्तास्वार्थासाठी दलित नेत्यांकरवी दलित समाजाला वापरणारी काँग्रेस वाईट , म्हणून काँग्रेस ज्यांना आपल्या मोठेपणासाठी वापरते ते गांधीजीही वाईट , हा अविचार आंबेडकरांना मानणाऱ्यांनी झटकला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दुरावा असण्याचं कारणच नव्हतं. कारण सामाजिक समानतेच्या बाबतीत शिवाजी महाराज काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी महार-मांग या शूर जातींतील वीरांना गडकरी , सैन्याधिकारी पदी नेमून त्यांचा सन्मान केला होता. शिवशाही स्थापताना त्यांनी जातीचा अधिकार मोडून काढला. गुणांना , कर्तबगारीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच वाई परगण्यात नागेवाडीची पाटीलकी नागनाक महाराला मिळाली. अष्टप्रधान मंडळात वेगवेगळ्या जातींच्या मंडळींची सारख्याच उंचीची बैठक पाहून देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाराज कडाडले , ' शिवशाहीत सर्वच बैठका एकाच उंचीच्या असतील , एकच फक्त त्यापेक्षा उंच असेल. ते जनताजनार्दनाने दिलेलं राजसिंहासन. ' रयतेचा राजा असा शिवरायांचा लौकिक होता. जनतेच्या सुख-दु:खांची त्यांना जाण होती , तसंच आपल्या जबाबदारीचंही भान होतं. लोकनेते म्हणवून घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बरेच किल्ले जिंकले , नवे किल्ले बांधले. पण तिथे त्यांनी आपल्या नावाचा शिलालेख नाही बसवला. त्यांचा पुतळाही त्यांच्या निधनानंतर अडीचशे वर्षांनी आकारास आला. याउलट स. का. पाटलांसारख्यांनी आपल्या हयातीतच ब्राँझचा टोलेजंग पुतळा तयार करवून मुंबईत ठाकूरद्वारच्या उद्यानात बसवला. स. का. पाटील जाऊन पंचवीसेक वर्षंच झालीत , पण त्यांचं नाव विस्मरणात गेलेय. मात्र शिवरायांंचा पराक्रम प्रथम कळतो आणि त्यांचा भव्य पुतळा पाहूनही त्यांचा पराक्रम श्रेष्ठच राहतो.

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या पराक्रमाची थोरवीही अशीच आहे. ही माणसं दगडाच्या इतिहासासाठी नव्हती. ही दगडातून इतिहास निर्माण करणारी माणसं होती. ती वाटून घेण्यासाठी नाहीत. संपन्न भविष्याची वाट दाखवण्यासाठी आहेत. त्या तिघांपुढे एकाच वेळी नतमस्तक होणं , हीच खरी त्यांना आदरांजली आहे , त्यांच्या विचारतत्त्वाची आचारक्रांती आहे.