गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

मराठी भाषेची ताकद.

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
 ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे


------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच पावला!

पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले. पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!

धन्यवाद.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

केल्याने होत आहे रे...


आंतरराष्ट्रीय समुदाय, प्रश्न, डावपेच, परस्पर सहकार्य- यासंदर्भात भारताची भूमिका, परराष्ट्र धोरण हे सगळं भारतीय तरूण विशेषतः मराठी तरुणांच्या कक्षेबाहेरचे विषय. या सगळ्याची स्वअनुभवातून ओघवत्या भाषेत मांडणी केली आहे आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ संदीप वासलेकर यांनी. डोंबिवली सारख्या शहरातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे वासलेकर आणि त्यांची स्ट्रॅटेजिक फोरसाईट ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विविध देशांना त्यांचं धोरण ठरवण्यात मार्गदर्शन करतात. जगामध्ये संघर्ष टाळावा आणि शांततेने प्रश्न सुटावेत यासाठी ते आणि त्यांची संस्था सातत्याने प्रयत्नशील असतो.वासलेकरांचे देशोदेशीचे अनुभव आणि पुस्तकातील त्यांचे वैचारिक लिखाण मराठी तरुणांना क्षितिजापलीकडला विचार करायला प्रवृत्त करेल यात शंकाच नाही. राजहंस प्रकाशित या पुस्तकाचा गेल्या काही दशकातील सर्वोत्तम मराठी वैचारिक लिखाणामध्ये या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.मराठी राजहंस प्रकाशन प्रकाशित आणि संदीप वासलेकर लिखित 'एका दिशेचा शोध' या पुस्तकातील हा एक भाग खास वाचकांसाठी.

केल्याने होत आहे रे......

विशेष दक्षता विभागाच्या एक उच्चपदस्थ महिला अधिकारी मला भेटावयास आल्या. त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक योजनेचा प्रस्ताव बनवण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्या विषयावरील औपचारिक बोलणी झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो. गुप्तहेर खाते , नक्षलवादी प्रदेश , शहरी कायदा व सुव्यवस्था अशा चौफेर अनुभवातून आमची चर्चा सुरू होती. त्यानंतर याला कारणीभूत असणा-या घटकांचा शोध घेत घेत आम्ही एकंदरीत व्यवस्थेपर्यंत पोहोचलो. त्याचवेळी त्यांच्या बोलण्यात कमालीचे नैराश्य आले. त्या म्हणाल्या , '' आज जरी मी एवढया मोठया पदावर असले , तरी अनेक गोष्टी जवळून बघताना खूप वाईट वाटते. सध्या जे काही चालले आहे , ते बदलेल , असे मुळीच वाटत नाही.

नेहमीप्रमाणे निवडणुका होतात. सत्तेवरील पक्ष बदलतात किंवा तेच राहतात. काही खात्यांत चांगले कार्यक्रम व योजना राबवल्या जातात. थोडी रस्तेबांधणी , महाविद्यालयांचा विस्तार , संगणकाशी संबंधित उद्योग , शेतकऱ्यांची कर्जमाफी , कर्जमेळावे असे कार्यक्रम होतात. काण ते वरवरचे असतात. कारण तळागाळातील लोकांपर्यंत त्याचा फायदा किती पोहोचतो , हा संशोधनाचाच विषय ठरेल. काही नेते त्याला अपवाद आहेत. कोण त्यांचे धडाडीने काम चालते ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच. आपल्याच मतदारसंघात ते नवे प्रकल्प आणतात , रोजगारनिर्मिती करतात. त्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत संकुचित लाभ होतो. हे सारे काही पाहिल्यानंतर एक समाज किंवा देश म्हणून अकारण समाधानकारक का पातळीवर गेलो आहोत , असे वाटत नाही. सरकार बदललेच , तर सुरुवातीच्या काळात थोडेफार चांगले कार्यक्रम राबवले जातात. पण गरीब व सामान्य जनतेला काही विशेष फरक पडत नाही. वेळप्रसंगी आमच्या बदल्या केल्या जातात. चक्र असेच सुरू राहते. सर्वच पक्षांत थोडयाफार फरकाने साम्य दिसते.
पैशांचा स्वार्थ , आपल्या मुलांना किंवा नातलगांना राजकारणात आणण्याचा मोह असे हे मायाजाल पसरलेले आहे. परिस्थितीत बदल होणार नाही म्हणूनच मन निराश होते. या साऱ्या वातावरणामुळेच बेरोजगारी , गुन्हेगारी , भ्रष्टाचार , दहशतवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. मला तरी यातून कुणी सुटका करेल , असे वाटत नाही. ''

सरकारी सेवेत असणारे अधिकारी अनौपचारिक वातावरणातही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. मात्र या अधिकारी महिलेची व्यथा मनापासून होती. त्यामुळेच तिला ती लपवता आली नाही. तिचे हे विचार प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणता येतील. कारण अनेक संवेदनशील अधिका-यांच्याही अशाच प्रतिक्रिया आणि वेदना आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीची आणि भोवतालच्या वातावरणाची जाणीव आहे. भविष्याकडे बघण्याची दृष्टीदेखील आहे.

म्हणूनच अशा बजबजपुरीपेक्षा अनेकजण आपल्या मुलामुलींना परदेशी स्थायिक होण्यास प्रोत्साहित करतात. या निर्णयातच त्यांचे देशाच्या भविष्याबद्दलचे मत व्यक्त होते.
आपल्या देशाची परिस्थिती बघता सर्वसामान्य लोक मनातून निराश असल्याचे जाणवते. प्रत्येकाचा स्तर , त्यांच्या भोवतालचे घटक काहीही असू शकतात. पण ज्यावेळी सामूहिक पातळीवर विचार होतो , त्यावेळी आपल्या देशाची परिस्थिती निराशाजनक असल्याचेच सर्वांचे मत असते.

त्यासाठी सरसकट सर्वजण राजकारण्यांवर खापर फोडतात. हे चुकीचे नसले तरी इतर बाबीही त्याला कारणीभूत असतात , त्यांचा विचार करून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर कृती करण्याचे धारिष्टयदेखील सहसा कुणी दाखवत नाही , ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

आपल्या समाजाचा किंवा देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास फक्त राजकारण्यांवरच अवलंबून असतो , हा समज चुकीचा आहे. हे निश्चित की , ही मंडळी त्याला आडकाठी आणू शकतात. कारण तेवढे सामर्थ्य व शक्ती आपणच त्यांना दिलेली असते. सुधारणा करण्याचे प्रभावी माध्यम त्यांच्याकडे असूनही तशी त्यांची मानसिकता नसते. याबाबत मला आलेले दोघा दिग्गज राजकारण्यांचे अनुभव बोलके आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार मानल्या गेलेल्या एका नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने मला भोजनासाठी निमंत्रित केले. आज ते हयात नाहीत. हा प्रसंग घडला तेव्हा त्यांच्या पक्षाचे सरकार महाराष्ट्रात होते.

भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी विषय काढला. ते म्हणाले , '' तुझ्याशी एक बोलायचे आहे. मुंबईची सिंगापूरसारखी स्थिती कशी करता येईल , यासंबंधी तुझ्याकडे काही कल्पना आहेत का ?'' आमचे अरे-तुरेचे संबंध होते. मी सांगितले , '' मी काही नगर विकासशास्त्रातला तज्ज्ञ नाही , मी काय सल्ला देणार ?'' ते हसून म्हणाले , '' अरे , नगरविकास तज्ज्ञ मला नेहमीच भेटायला येतात. या विषयावर एक मंत्रीही आहे व अनुभवी अधिकारी आहेत. मी त्यांच्याशी नेहमीच बोलतो. काण तुला जगाचा अनुभव आहे , सर्वसाधारण तज्ज्ञ विचार करू शकणार नाहीत अशा सूचना तू देशील , अशी माझी
अपेक्षा आहे. म्हणून सहज विचारले. '' मी थोडा वेळ विचार केला आणि सांगितले , '' मुंबई हे अतिशय अस्वच्छ शहर आहे. जर सर्व पक्षांचे कार्यकर्ते , सेवाभावी संस्था ,
महानगरपालिका व राज्य सरकार एकत्र आले आणि सर्वांनी संपूर्ण शहर सिंगापूरसारखे स्वच्छ करायचे ठरविले , तर कमीत कमी वेळेत ते शक्य होईल. सुलभ शौचालयाला अथवा गाडगे महाराज प्रकल्पाला मोठे अनुदान देऊन अनेक शौचालये बांधावी लागतील. महानगरपालिका कचऱ्यांच्या
गाडया वाढवू शकेल. या दोन खर्चाच्या बाबी आहेत. बाकी सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार व लोकांची इच्छाशक्ती यांच्यावर अवलंबून आहे. अर्थात ही एक स्वच्छता मोहीम सुरू करून नटांबरोबर पेपरात फोटो झळकवून थांबणार असेल , तर मात्र परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. तर अगदी गल्ली- बोळांतील नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे. जिथे कचऱ्यांच्या कुंडया नाहीत तिथे त्या महानगरकाालिकेने पुरवल्या पाहिजेत. कचरा
सकाळी नेऊन त्याचे खत उत्पादन करण्यासाठी शहराबाहेर प्रकल्प केले पाहिजेत व कायमची यंत्रणा निर्माण केली पाहिजे. ''

माझ्या या मतामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. थोडे नाराज होत ते म्हणाले , '' अरे , काय फालतू कल्पना दिलीस. मला वाटले , तू जगभर फिरतोस तर एखाद्या परदेशी सरकारबरोबर किंवा जागतिक बँकेबरोबर सहकार्य करून कोटी रुपयांच्या योजना बनवशील. शहर चकचकीत होईल. नवीन इमारती , हवेतील रेल्वे आणण्यासाठी योजना तयार करशील. '' मला ते पटले नाही. मी उत्तर दिले , '' ते नंतर बघता येईल. पहिल्यांदा शहर स्वच्छ झाले आणि लोकांना आपल्या नागरिकत्वाची जाणीव झाली ,
तर आपण खूप मोठे यश मिळवू. स्वच्छतेमुळे आरोग्य , पर्यावरण व पर्यायाने राहणीमान सुधारेल. एकदा स्वच्छतेचा प्रश्न सुटला की घर , रस्ते ,
पर्यावरण हे प्रश्न नागरिकांना प्रेरित करून सोडण्यास मदत होईल. त्यासाठी कमीत कमी सरकारी खर्च होईल. '' त्यांना तेसुध्दा पटले नाही. '' मी उगाच विषय काढला , एरव्हीदेखील तू कधी काही काम घेऊन येत नाहीस. सध्या आमचे सरकार आहे. काही
काम असेल , तर नक्की सांग. '' असे बोलून त्यांनी हा विषय संपवला.

त्यानंतर एक वर्षाचा काळ उलटला. निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचे सरकार आले. सत्तेत असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने मला भोजनाच्या निमित्ताने चर्चेसाठी बोलावले. सध्या ते नेते फारसे प्रसिध्दी झोतात नाहीत. त्यांनी थेट प्रश्न केला की , '' महाराष्ट्राचा ग्रामीण भाग वर आला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का ?''

मी म्हटले , '' मी काही कृषितज्ज्ञ नाही व ग्रामविकास कार्याचा मला अनुभव नाही. आपल्या पक्षात शेती , सहकार , ग्रामविकास यांचा दांडगा अनुभव असलेले अनेक नेते आहेत. मी त्यांना काय सांगणार ?'' ते म्हणाले , '' तुमचा जगभरचा अनुभव आहे. आम्ही रोज ज्या गोष्टींचा विचार करत नाही. अशा काही गोष्टी आपण सुचवू शकाल , असे
आमचे काही सहकारी म्हणाले. ''

शेतकरी आणि ग्रामीण विकास यांना केंद्रस्थानी ठेवून विकास प्रक्रियेतील काही मुद्दयांचा परामर्श घेत मी त्यांना सुचवले की , शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होते म्हणून सहकार व शेतीमाल बाजार समिती या दोन प्रक्रिया आल्या. त्यामुळेच काही शेतकऱ्यांना फायदा झाला. पण आता सहकार क्षेत्रात व शेतीमाल बाजार समितीत अनेक हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे गरीब शेतकरी गरीबच राहिला. जर
सहकार व शेतीमाल बाजार समितीत सुधार केला , शेतकऱ्यांचा माल चांगल्या दराने विकणे शक्य व्हावे म्हणून मुक्त अर्थव्यवस्था आणली व त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही , याची खबरदारी घेण्यात आली ; तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यांच्याकडे पैसे आले , तर ते उत्पादन वाढविण्यासाठी खते व सिंचन या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतील. गावागावात छोटी व वातानुकूलित गोदामे बांधली , तर त्यांना घाईघाईत
स्वस्तात माल विकण्याची गरज राहणार नाही. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रशिक्षण , विमायोजना , कर्जव्यवस्था यांची सोय केली ; तर त्यामुळे ते उत्पादन वाढवू शकतील. खेडयात शेतीमालापासून खाण्याचे पदार्थ बनवण्याचे कारखाने टाकण्यासाठी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले , तर शेतकऱ्यांची मुले शेतीपासून शेतीसंबंधी औद्योगिक व्यवसायाकडे वळतील. ''

त्यांना माझे हे विचार अपेक्षित नव्हते. ते म्हणाले , '' हे सर्व सोडा! यात फक्त काही शेतकऱ्यांचा फायदा होईल , पण इतरांचे नुकसान होईल. सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल , अशी एक योजना माझ्याकडे आहे. त्यासाठी तुमची मदत मिळेल , अशी अपेक्षा आहे. ''
'' अशी कोणती योजना आहे व मी काय मदत करणार ?'' मी आश्चर्याने विचारले.
'' प्रत्येक शेतकऱ्याला एक संगणक देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मदत हवी आहे. '' ते थेट मुद्दयावर आले. '' प्रत्येक शेतकरी संगणक घेऊन काय करणार ? प्रथम सहकार व शेतीमाल बाजार समितीत सुधार केले पाहिजे. जी पडीक जमीन आहे , ती शेतीसाठी वापरली गेली पाहिजे आणि हे सर्व करण्यास फारसा वेळ खर्च होणार नाही. '' हे माझे म्हणणे त्यांना पटले नाही. आम्ही भोजन लवकर संपविले व मी घरी परतलो.

यानंतर काही महिन्यांनी मला असाच एक अनुभव आला पण आंध्र प्रदेशच्या बाबतीत. तिथले शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजकारणी भेटले. त्यांच्याकडे अशीच संगणकाची योजना होती व ते त्यासाठी निधी कुठे मिळेल , याची चौकशी करत होते.
आत्मकेंद्री राजकीय मनोवृत्ती ही स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतीयांची फार मोठी शोकांतिकाच बनली आहे. राजकारणातले खेळाडू बदलतात , पण त्यांचे राजकीय डावपेच कायम राहिले आहेत. कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलतात , पण त्यांची मानसिकता कायम राहिली आहे.

स्वार्थाचे स्वरूप बदलले , पण लोभी वृत्ती कायम राहिली आहे. यात भरडली जाते ती सामान्य जनता. पण त्याचे कुठलेही सोयरसुतक कुणालाच नाही. एखाद्या नेतृत्वाविषयी नाराजी असली , तरी जनतेला अपेक्षित असलेला नेता मिळत नाही. नवीन नेतृत्व कोणाचे याबाबत पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घ्यायचे व जनतेने निमूटपणे त्याचा स्वीकार करावा , हेच हायकमांडना अकोक्षित असते. प्रामाणिक , दूरदर्शी , कल्पक व यशस्वी व्यक्तींना सामान्य
लोक नेतृत्वपदी नेऊ शकतात व कोणत्याही पक्षातल्या श्रेष्ठींना व कार्यकर्त्यांना अशा नेतृत्वाचा स्वीकार करण्यासाठी भाग पाडू शकतात , असा आपल्या लोकशाहीचा सिध्दांत असला तरी तो केवळ विचारापुरताच ; प्रत्यक्षात आचरणात तो येत नाही.

आम जनतासुध्दा या प्रक्रियेत तितकीच जबाबदार आहे. राजकारण्यांना गेंडयाच्या कातडीचे म्हणताना आपण आपल्या विकासाबाबत कितपत संवेदनशील व जागरूक आहोत , ते तपासले पाहिजे ; कारण आपल्या भावनांचा उद्रेक राजकारण्यांवर दबाव टाकण्यासाठी होऊ शकतो. पण ' मला काय त्याचे ? मी का म्हणून पुढाकार घ्यायचा ? आपण कशाला वैर घ्यायचे ? ज्याला भांडायचे असेल तो बघेल ना! ' असे आपण स्वत:शी आणि
आपल्या कुटुंबाशी बोलताना नक्कीच म्हणत असतो. यातून आपणच आपल्या प्रांताचे आणि देशाचे नुकसान करतो आणि आपणच त्याला कारणीभूत आहोत , ही जाणीव आपल्याला त्याप्रसंगी होताना दिसत नाही.

याच्या अगदी विरुध्द दृश्य अमेरिकेत दिसते. तेथील नागरिक आपल्या देशाविषयी किती भावुक आणि हळवे असतात , हे मला माझ्या व्याख्यानादरम्यान दिसून आले.
जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्या देशात खूप निराशा आली होती. सरकारी कर्ज वाढले होते. अर्थव्यवस्था कोसळेल अशी भीती होती. इराकमध्ये अमेरिकेचे सैनिक मारले जात होते. आशियातील दोन-तीन देश वगळता जगात सर्वत्र अमेरिकेची नाचक्की झाली होती. अशा परिस्थितीत एका सुप्रसिध्द संस्थेने कॅलिफोर्नियात बर्कले येथे माझे व्याख्यान ठेवले होते. शेवटी प्रश्नोत्तराचा तास होता. एका महिलेने मला अमेरिकेविषयी जागतिक मत विचारले. मी प्रांजळपणे सांगितले , '' तुमचा देश सामर्थ्यवान असूनही त्याला किंमत राहिली नाही. अमेरिका मोठी झाली ; कारण स्वातंत्र्य , विश्वास व कायद्यावर आधारित राज्याचा तुम्ही पुरस्कार केला. आज या मूल्यांची गळचेपी झाली आहे. दहशतवादाविरुध्द
युध्दात अथवा इराकमधल्या युध्दात तुम्हांला लष्करी विजय मिळेल. पण तुमच्या सरकारने त्या मूल्यांचा म्हणजे तुमच्या देशाच्या आत्म्याचा पर्यायाने तुमच्या देशाचाच पराभव केला आहे. जगातले लोक तुम्हांला एक स्वपराभूत देश समजून हसतात. '' माझे भाषण संपल्यावर ती महिला व श्रोतृवृंदातील अनेक लोक अक्षरश: रडू लागले. मी रात्री आयोजकांना सांगितले , '' ज्या देशाचे नागरिक एवढे संवेदनशील आहेत , त्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. ''

त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत बराक ओबामा या तोपर्यंत अपरिचित असलेल्या कृष्णवर्णीय नेत्याने अशा लोकांना दिलासा दिला. ओबामांकडे पैशाचे पाठबळ नव्हते , संघटना नव्हती. त्यांनी इंटरनेटचा वापर करून डेमोक्रेटिक पक्षावरील क्लिंटन पति-पत्नीचे वर्चस्व मोडून काढले. नंतर रिपब्लिकन पक्षाचा पराभव करून ते राष्ट्राध्यक्ष झाले. सत्तेवर येताच लगेच त्यांनी सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली. देशाच्या इतिहासात प्रथमच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळण्याचा हक्क दिला. गरिबांसाठी घरांची सोय करण्याच्या योजना आखल्या. सर्व गरिबांना आरोग्यविमा मिळण्यासाठी नवीन कायदा आणला. श्रीमंत व्यवस्थापनांच्या वेतनावर निर्बंध आणले.
अध्यक्ष ओबामा यांनी सहा महिन्यांत अमेरिकेची जगातील पत वाढविली. अरब राष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारले. चीन व रशिया बरोबरचे वैमनस्य दूर केले. केवळ पाकिस्तान-अफगाणिस्तानाबाबत अवलंबलेले चुकीचे धोरण वगळता ओबामा यांनी अंतर्गत व बाह्य असे बरेच बदल केले.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबामा डेमोक्रेटिक पक्षाच्या साहाय्याने वर आले नाहीत. त्यांना पक्षात काहीही स्थान नव्हते. माझ्या भाषणात अश्रू ढाळणाऱ्या व देशप्रेम वाटणाऱ्या असंख्य सामान्य नागरिकांनी स्वत:च चळवळ उभी करून ओबामांचे नेतृत्व तयार केले. त्या मोबदल्यात त्यांनी खाजगीरीत्या कोणालाही काही दिले नाही. एक परिवर्तनाच्या मार्गावर असलेला देश दिला. सत्तेवर कोण बसणार याचा निर्णय ज्या देशात
धनाढय लोक घेत असत , त्या देशात सर्वसाधारण नागरिकांनी पैशाविना एक नूतन नेतृत्व निर्माण केले.

याउलट भारतातील लोकशाही सरंजामी वृत्तीची आहे. पाच वर्षातून निवडणुका घ्यायच्या आणि मतदारांचा कौल मागायचा. या लोकशाहीच्या राजवटीत मग आपली मुले , नातलग यांना सत्तेवर बसवायचे , अशी वृत्ती नेत्यांमध्ये बळावली आहे. कोणत्याही पक्षाचा विजय झाला , तरी देशातील किंवा राज्यातील काही कुटुंबांचीच सत्ता येते. उरलेले लोक या कुटुंबांचे गुलाम असतात. जनतेलाही या गोष्टी कळतात , पण वळत नाहीत.

अमेरिकेच्या लोकांनी बुश व क्लिंटन या कुटुंबशाहीला झिडकारले आणि ओबामा यांना नेते केले. अमेरिकेत लोकशाही बळकट असल्यामुळे हे बदल झाले आहेत. अमेरिकेत बदल होण्याआधी सुमारे वीस वर्षे पूर्व युरोपातील देशांत रक्तहीन राजकीय बदल झाले. या सर्व देशांत साम्यवादी राजकीय पध्दत होती. राज्यकर्त्यांना रशियाच्या सैन्याचा पाठिंबा होता. गुप्तहेरखाते पाठीशी होते. तरीही पोलंडमध्ये लेच वालेसा या साध्या कामगाराने व झेक
प्रजासत्ताकामधील वासलाव हावेल या नाटयकाराने लोकांना स्फूर्ती दिली. लोकांनी दडपशाही झुगारली व स्वत:च्या देशाला स्वत:च्याच राज्यकर्त्यांच्या पोलादी पकडीतून मुक्त केले. हळूहळू ही लाट सर्व पूर्व युरोपात पसरली. अर्धा खंड स्वतंत्र झाला. आता सुबत्तेच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात जगभरात असे परिणामकारक बदल होत गेले आहेत. त्याचा उदय युरोपातील पूर्व जर्मनीतून झाला , असेही म्हणता येईल.

बर्लिनची भिंत पूर्व आणि पश्चिम युरोकाच्या विभाजनाचे प्रतीक होती. त्या भिंतीपलीकडे उंटेर डेन लिंटन हा महामार्ग सुरू होतो. तिथे सुरुवातीलाच रशियाचे दूतावास आणि त्याच्या बाजूलाच कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय होते. पूर्व जर्मनीतील दडपशाहीची सूत्रे या ठिकाणाहून हलायची. पूर्व जर्मनीच्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. विजेची प्रचंड कमतरता होती. वर लष्कराची दडपशाही. त्यामुळेच पूर्व जर्मनीचे लोक
भिंत ओलांडून पश्चिम जर्मनीत जाण्याचा प्रयत्न करायचे. काहीजण त्यात यशस्वी होत , तर काही पूर्व जर्मनीच्या सैनिकांच्या गोळीचे शिकार व्हायचे. उंटेर डेन लिंटनला जवळच असलेल्या फ्रेडरिशस्ट्रास रस्त्यावर चार्ली नावाचा चेकनाका होता. तिथून पश्चिमेकडील नागरिक आपल्या पूर्वेकडील नातलगांना भेटण्यासाठी येत. जर्मन नागरिकांना व्हिसा मिळत नव्हता. काण पूर्व जर्मनीतल्या भारतीय विद्यार्थ्यांना मात्र मुक्तपणे शिक्षण
घेता येत होते. त्यांना भेटायला येणारे नातलग चार्ली नाक्यावर रेल्वेगाडीत चढत व तिथून पूर्व जर्मनीत येत असे. या नातलगांची सैनिकांकडून तपासणी होत असताना त्यांचा अविर्भाव पाहून पोटात भीतीचा गोळा येई. थोडक्यात सांगायचे , तर उंटेर डेन लिंटन व फ्रेडरिशस्ट्रास हे दोन्ही महामार्ग म्हणजे मृत्यूकडे नेणारे रस्तेच अशी परिस्थिती साधारणत: 1989 पर्यंत होती. बर्लिनची भिंत तोडल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली .
नागरिकांचा रोष पाहून लष्करच घाबरून पळून गेले. त्यामुळे रक्ताचा एकही थेंब न सांडता पूर्व जर्मनीतील साम्यवादी राजवट इतिहासजमा झाली.

मी अनेकदा उंटेर डेन लिंटन आणि फ्रेडरिशस्ट्रासला गेलो. आता परिस्थिती खूपच वेगळी आहे. वेगवेगळया प्रकारची रेस्टॉरंट्स , महागडया गाडयांची दुकाने यांची तेथे वर्दळ आहे. ऐश्वर्यसंपन्नता आहे व लोक मनमुरादपणे स्वातंत्र्याचा उपभोग घेत असल्याचे चित्र दिसून येते.

कोप-याकोप-यावर संगीतशाळा व भव्य ऑपेरा थिएटर्स आहेत. उंटेर डेन लिंटनच्या आइनस्टाइन कॅफेमध्ये दुपारी बसायला जागा मिळत नाही. हीच परिस्थिती फ्रेडरिशस्ट्रासच्या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या भोजनासाठी असते. परदेशी पर्यटक मोठया संख्येने येत असतात. त्यावेळी आठवण म्हणून ते बर्लिनच्या तुटलेल्या भिंतीचे तुकडे विकत घेताना दिसतात.

काही वर्षांपूर्वी ज्या रस्त्यांना मृत्यूचे महामार्ग समजले जात होते , त्याच ठिकाणी इतक्या अल्पाववधीत झालेली प्रगती व परिवर्तन हे फक्त सामान्य नागरिकांचे परिश्रम , प्रयत्न , आत्मविश्वास व निर्धार यांच्यामुळेच शक्य झाले. शेतकरी किंवा बांधकाम करणाऱ्या मजुराने दिवसभर घाम गाळायचा , तर बँकेतल्या कारकुनाने किंवा सचिवालयातल्या अधिकाऱ्याने सारखे चहाला जायचे , असे आपल्यासारखे प्रकार जर्मनीत चालत नाहीत.
तिथे कामगार असो किंवा उच्च पदावरील अधिकारी सर्वजण कठोर परिश्रम करतात. म्हणूनच हा देश दुसऱ्या महायुध्दात बेचिराख होऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ शकला. उंटेर डेन लिंटन व फ्रेडरिशस्ट्रासचे सध्याचे परिवर्तन फक्त स्वातंत्र्य मिळाल्यामुळे झालेले नाही , तर सामान्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती , सामूहिक प्रयत्न , भ्रष्टाचाराला मूठमाती आणि राजकारण्यांपासून ते तळागाळातील नागरिकांपर्यंत समान वागणूक व आदर यांनीच ते घडवले आहे.

हिंसक क्रांतीने विशेष काही साध्य होत नाही , हे गेल्या ५०० वर्षांच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल. १७८९ साली फ्रान्सची राज्यक्रांती झाली. क्रांतिकारकांनी धर्मगुरूंना पळवून लावले. देशाच्या राजाला आणि महाराणीला पकडून भर रस्त्यावर सुळावर चढवले. काण काय निष्पन्न झाले ? त्यांच्यातीलच नेपोलियन बोनापार्टला क्रांतिकारकांनी सम्राट बनवले. पुन्हा एकदा राजेशाही आली. नेपोलियनने शेजारच्या राष्ट्रावर हल्ला
केला. शेवटी त्याचा वॉटर्लू येथे दारुण पराभव झाला. त्यानंतर त्याचा पुतण्या सम्राटपदी विराजमान झाला. त्याला सत्तेवर आणण्यासाठी धर्मगुरूंनी मदत केली. आपल्या खाजगी महत्त्वाकांक्षेपायी त्याने जर्मनीवर हल्ला केला. त्यात फ्रान्सचा पराभव झाला. त्यानंतर तिथे दहशतवाद पसरला. संसदेवरही मोठया प्रमाणावर हल्ले झाले.

रशियात १९१७ मध्ये हिंसक क्रांती झाली आणि जगात पहिल्यांदाच साम्यवादी सत्ता आली. स्टॅलिनसारखा क्रूर नेता सत्तेवर आला. नंतर ख्रुश्चेव , ब्रेझनेव्ह , आंद्रापोव यांनी हेरांना हाताशी धरून जनतेवर अतोनात अत्याचार केले. शेवटी मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी देश व साम्यवाद मोडीत काढला. नंतर बोरिस येल्स्तीन यांनी तर रशियाचा जवळजवळ लिलावच केला.

इराणमध्ये आयातुल्ला खोमेनी यांच्या मार्गदर्शनाखाली १९७९ मध्ये क्रांती झाली. त्याची परिणती म्हणजे नंतरच्या तीस वर्षात देशाचे उत्पन्न तीस टक्क्यांनी घटले. गुप्त पोलीस , दहशतवादी बसीज संघटना व धर्मगुरूंनी स्त्रियांना काळया बुरख्यात बांधले. शेजारी अफगाणिस्तानमध्ये १९९३ मध्ये तालिबानने क्रांती केली. तत्कालीन पंतप्रधानांना फाशी दिली गेली. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने तालिबानचा
आश्रय घेतला. अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानावर हल्ला करून तालिबान राजवट मोडीत काढली. अमेरिकेने इराणचीही आर्थिक नाकेबंदी केली आहे. तिथले धर्मावर आधारित सिंहासन त्यामुळे डळमळीत झाले आहे.
याउलट महात्मा गांधींपासून मार्टिन ल्यूथर किंगपर्यंत व नेल्सन मंडेलांपासून लेच वालेसाकार्यंत ज्यांनी रक्तहीन क्रांती करून बदल घडवून आणले , ते शाश्वत ठरले. ' अहिंसैव जयते। ' हे ब्रीद या परिवर्तनाबाबत सांगता येईल.

अहिंसक परिवर्तनाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि मानसिकता तयार व्हायला हवी. अन्य देशांमधील नागरिकांनी आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ठेवलेली मानसिकता व अवलंबिलेले मार्ग जाणून घेतले , तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो.

मला स्टॉकहोमच्या वास्तव्यात तीन अनुभव आले. ते लोकांची बदललेली मानसिकता व कोणतीही चुकीची गोष्ट न स्वीकारण्याचा बाणेदारपणा दर्शवतात.

एकदा मी रस्त्यात एक गोड पदार्थ खाऊन वरचा कागद तसाच टाकला. माझी चूक झाली होती , हे कळले. पण कंटाळा आल्याने मी तसाच पुढे गेलो. थोडया वेळाने एक वृध्द गृहस्थ धावत माझ्याकडे आले. मला नम्रपणे म्हणाले , '' तुम्ही आमच्या देशात पाहुणे दिसता , म्हणून रागावत नाही. आम्हांला रस्त्यात कचरा टाकलेला आवडत नाही. मी तुमचा कचऱ्याचा कागद माझ्या खिशात उचलून ठेवला आहे. तो मी पुढील कचरापेटीत
टाकेन. पण तुम्ही अशी चूक पुन्हा करू नका. ''

एकदा मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरत होतो. माझा मुलगा साहिल त्यावेळेस सात वर्षांचा होता. अचानक तो गाडीतून बाहेर पडला व रस्त्यात स्केटिंग करू लागला. दुपारची वेळ होती. सर्व घरे बंद होती. पण थोडयाच वेळात जवळच्या सर्व घरांचे दरवाजे उघडले. अनेक लोक बाहेर आले. ते म्हणाले , '' तुम्ही परदेशी दिसता , आमच्या देशात मुलांनी हेल्मेट घातल्याशिवाय स्केट वाकारणे अवैध आहे. मुलगा चुकून पडला , तर डोके फुटण्याचा धोका आहे. '' नंतर एकाने मला कागद दिला. त्यावर हेल्मेट विकणाऱ्या जवळपासच्या दुकानाचा पत्ता होता. मी माफी मागून तेथून निघालो.

अशीच एक दुपार होती. आम्ही गाडीने बाहेरून घरी चाललो होतो. मागून एक गाडी आली व आमच्या गाडीला धक्का देऊन वेगाने पुढे निघून गेली. आम्ही सुखरूप होतो. गाडीला थोडा मार लागला होता. कोणाशी भांडण नको , म्हणून आम्ही पुढे प्रवास सुरू ठेवला. पण रस्त्यातल्या सर्व गाडया थांबल्या. सर्व वाहनचालक एकमेकांना अपरिचित होते. एकाने आमची गाडी कोपऱ्यात थांबवण्याची सूचना केली. जवळ येऊन तब्येतीची चौकशी केली. दुसऱ्याने धक्का देणाऱ्या गाडीचा पाठलाग केला व क्रमांक नोंदवून घेतला. तिसऱ्याने पोलिसांना फोन केला. थोडयाच वेळात पोलिसांची गाडी आली. त्यांनी वायरलेसवरून संदेश पाठविले. केवळ पंधरा मिनिटांत आम्हांला मार देणाऱ्या गाडीला घेऊन दुसरी पोलीस गाडी
आली. आमची व रस्त्यातील लोकांची साक्ष घेतली. दोषी वाहनचालकास दंड भरण्यासाठी पावती दिली. आम्हांला आमचा दोष नसल्याचे पत्र दिले. व आमची गाडी दुरुस्त करण्यासाठी विमा कंपनीस सुपूर्द करण्यास सांगितले. काही क्षणांत पोलीस , धक्का देणारी गाडी , आम्ही व इतर सर्व आपापल्या मार्गाने निघून गेलो. हा सर्व प्रकार अर्ध्या तासात संपला. अपघात झाला , तेव्हा पोलीस जवळ नव्हते. केवळ नागरिकांनी स्वत:हून
जबाबदारी घेतल्याने आम्हांला न्याय मिळाला. आरोपीला दंडपत्र मिळाले.

मुंबई-पुण्याला अपघात झाला , तर आपण जखमींना मदत करायला घाबरतोच. पण आपण आरोपींना पकडण्यासाठी धावत नाही. मवाली लोक रेल्वेगाडीत महिलांना त्रास देताना अनेकदा आपण पाहतो व तोंड वळवतो. कधी आपण एखाद्या गुंडाला चोरी करताना किंवा धाकदपटशा दाखवताना पाहतो व आपण काही पाहिलेच नाही , असा आविर्भाव आणतो. यामुळे समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फावते. हळूहळू दहशतवादी
अशा संवेदना नसलेल्या समाजाचा फायदा घेतात. १९९२ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आरडीएक्स हा स्फोटक पदार्थ आला. तो आलाच कसा ? तटरक्षक दल , कस्टमचे अधिकारी , किनाऱ्यावर राहणारे लोक काय करत होते ? गुन्हेगारी व दहशतवादास सक्रिय विरोध केला नाही , तर आपणच त्याची शिकार बनू , हे त्यांच्या लक्षात आले नाही का ? हल्ला झाल्यावर आपण केवळ जखमींना मदत केली आणि गुन्हेगारीकडे
दुर्लक्ष केले तर हा एक प्रकारचा दांभिकपणा झाला.

मी चीनच्या दौऱ्यात बीजिंगपासून साधारणत: 250 किलोमीटर अंतरावरील खेडयातील काही शेतकऱ्यांच्या घरी गेलो. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या घरी वीज , कापणी , संडास , फोन , टीव्ही अशा सोयी-सुविधा होत्या. ते शेतकरी दुग्धव्यवसायात होते व खूष होते. केवळ दहा वर्षांत तिथल्या प्रत्येक गाईचे दूध उत्पादन सुमारे दहापट वाढले. त्यामुळे भांडवल न वाढवता शेतकऱ्यांची आवकही वाढली. त्यांना मिळणारा नफा मुलांचे शिक्षण , दुग्धव्यवसायाची वाढ व इतर ग्रामीण विकासात गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात येतो. भारतीय गायी व म्हशी यांच्या दुग्ध- उत्पादन वाढीसाठी सामान्य शेतकऱ्याला भारतात नियमित मार्गदर्शन मिळते का ? अर्थात पुण्यातले चितळे बंधू , गुजरातमधील अमूल असे थोडे अपवाद आहेत. पण भारतीय शेतकरी गरीबच राहिला आहे. शेतकऱ्यांची मुले कुपोषणाला बळी पडतात. मागच्या दहा-पंधरा वर्षांत शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र त्यामुळेच सुरू झाले.

चीनमध्ये सुबत्ता असली , तरी तिथले सगळेच शेतकरी फारसे समाधानी आहेत असे नाही. चीनमध्ये लोकशाही नसूनही ते मोर्चे , अधिकाऱ्यांविरुध्द मोहीम वा तत्सम मार्गांनी विरोध करत असतात. असे विरोधाचे प्रकार मोठया संख्येने घडतात , असा अंदाज आहे. चिनी शेतकरी नक्षलवादाचा मार्ग वापरुन हिंसाचार माजवत नाहीत की आत्महत्या करत नाहीत ; तर ते आधुनिक तंत्रज्ञान , व्यवस्थापन व जरूर तेव्हा दडपशाहीला विरोध करून
आपले जीवन पुढे नेतात.

चीनचे प्रमुख राजकीय नेते नेहमी शेतकरी , गरिबी व उपासमार यांविषयी बोलत असतात. अमेरिकेचे राजकारण , नट-नटयांचे आयुष्य , उद्योगपतींबरोबर पंचतारांकित मेजवान्या असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी ते कधीही आपला वेळ वाया घालवत नाहीत. याचा अर्थ चिनी नेते फार स्वच्छ आहेत , असेही नाही. अनेक राजकीय नेत्यांची मुले भांडवलदार बनली आहेत व त्यांना सरकारकडून कंत्राटे मिळतात. पण शेतकऱ्यांना कळल्यावर
शेतकरी अशा प्रकल्पांना विरोध करतात. चीनचे राजकारण बहुतांशी विकासाचे आहे. राजकर्त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सतत होत असला , तरी त्यातील बेरजेचे राजकारण आपण लक्षात घेतले पाहिजे. तेथील सरकारने आर्थिक सुधारांचा प्रारंभ शेतीपासून केला. शेतकऱ्यांनी नक्षलवादाऐवजी सनदशीर विरोध व आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून शेतीचा विकास केला.

सामाजिक परिवर्तन करणे म्हणजे सर्व जुने टाकून देणे नव्हे. परिवर्तनाचा असा अर्थ लावणे चुकीचे होईल. अनेक देशांनी शेकडो वर्षे आपले सरकार , संस्था व विचार यशस्वीपणे चालवले आहेत. दमास्कसला गेल्यावर मी तेथील जुन्या बाजारात जातो. हा बाजार गेली अडीच हजार वर्षे अस्तित्वात आहे. त्यात विकल्या जाणाऱ्या वस्तू काळानुसार बदलल्या , पण दुकाने ख्रिस्तपूर्व काळापासून आहेत ; तरी सतत भरभराटीला असलेली दिसतात. या बाजाराच्या समोर उम्मायुद मशीद आहे. तेथे गेली अडीच हजार वर्षे लोक प्रार्थनेसाठी जातात. पहिल्यांदा तिथे रोमन लोकांचे उंच स्तंभ
असलेले प्रार्थनास्थळ होते. मग ख्रिश्चन लोकांनी चर्च बांधले. त्याच जागेवर आठव्या शतकात मुस्लीम राजकर्त्यांनी मशीद बांधली. आज तिथे
मशिदीत अजूनही पूर्वीचे चर्च व त्याआधी असलेल्या रोमन प्रार्थनास्थळाचे भाग व्यवस्थित जत करून ठेवले आहेत. मागच्या अडीच हजार वर्षांत
दमास्कसमध्ये धर्मांतर झाले , पण जुना बाजार व त्याच्या समोर असलेले प्रार्थनास्थळ आहे तसे राहिले. नवीन धर्माचे प्रार्थनास्थळ बांधताना आधीच्या धर्माचा आदर करून त्यांच्या प्रार्थनास्थळाचा महत्त्वाचा भाग सुरक्षित ठेवण्यात आला.

इटलीत गेल्यानंतर मी आवर्जून ' फॅब्रियानो ' या कागदाच्या दुकानात जातो. तेथे चित्रकलेसाठी लागणारे उत्कृष्ट दर्जाचे कागद मिळतात. कागदापासून बनवलेल्या आकर्षक भेटवस्तूही या ठिकाणी मिळतात. हे दुकान १२६४ सालापासून आहे. अजूनही एकच कुटुंब ते दुकान चालवते.

आता त्याच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. आपण कधी सातशे पन्नास वर्षांचे दुकान चालवू शकू ? एखादी इमारत तीस-चाळीस वर्षांची झाली की ती बिल्डरला विकून पैसे घेण्यात आपण धन्यता मानतो. मायकल एंजेलो हा सुप्रसिध्द चित्रकार ' फॅब्रियानो ' तून कागद विकत घेत असे. सध्या युरोच्या नोटा या दुकानातील कागदावरच छापल्या जातात.
झुरिकजवळ एगिलासो नावाचे एक खेडे आहे. -हाइन नदीच्या काठी , द्राक्षांच्या मळयांनी वेढलेले आणि घनदाट जंगलाच्या बाजूलाच वसलेले हे गाव आहे. एका उन्हाळयात तिथल्या एका हॉटेलमध्ये माझे वास्तव्य होते. ते पाचशे वर्षांचे जुने आहे. तिथल्या खोल्यांमधील कपाटे अडीचशेतीनशे वर्षांपूर्वीची आहेत. इतकी वर्षे या हॉटेलचे व्यवहार अखंडपणे सुरू आहेत. गावात फेरफटका मारला , तर पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीची जुनी
घरे अजूनही आढळतात.

लंडनमधील ऑक्सफर्ड व केंब्रिज विश्वविद्यालयेदेखील पाचशे वर्षांहून अधिक काळ जुनी आहेत. त्यांत अखंडपणे विद्यादान सुरळीतपणे सुरू आहे. आपण आपला भूतकाळ विसरलो आहोत. राजस्थानमधील काही प्रासाद आज हॉटेलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. रायगड व सिंहगडासारखे किल्ले उपेक्षित राहिले आहेत. भूतकाळातील अनेक मौल्यवान गोष्टींचा दुर्मीळ खजिना आपण दुर्लक्षित केला आहे. आपण राष्ट्रीय अस्मितेत रमत
नाही. महापुरुषांचे पुतळे रस्त्यावर उभारले की आपले काम झाले , अशा थाटात आपण वावरतो. ' फॅब्रियानो ' चे मालक अजून एक हजार वर्षे आपले दुकान चालावे , यासाठी प्रयत्न करताना दिसतात. तर आपल्याकडे नालंदासारखे जगद्विख्यात विद्यापीठ बंद होते , याची आपल्याला काहीच खंत
वाटत नाही. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या निधनाला अजून एक शतकही झाले नाही ; तोच शांतिनिकेतनला जी अवकळा झाली , ती बघून
आपली मान शरमेने खाली झुकली पाहिजे. आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. प्रामाणिकपणे आपण ते केले पााहिजे.
मॅक्डोनाल्ड - कोकाकोला - हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सिनेमे यांच्यातून आपण बाहेर आले पााहिजे. भारतासारख्या अतिशय समृध्द परंपरेचा कसोशीने सांभाळ केला पाहिजे. आपण केवळ ऐतिहासिक वैभवाच्या गप्पा न मारता आपल्या संस्था हजारो वर्षे कशा चालतील व त्यांतून सकारात्मक बदल कसे होतील , याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वासही असायला हवा. भारतात बेरजेचे समाजकारण ,
अर्थकारण व राजकारण आणले ; तर पुढील अनेक मार्ग सापडू शकतील. आपली सामाजिक मनोवृत्ती सर्वसामान्यकाणे बेरजेची नाही. कुणी पुढे जायला लागला की त्याचा पाय कसा खेचायचा , हे आपल्याला चांगले ठाऊक आहे. पण या धडपडीत आपणसुध्दा पडतो , हे आपल्या ध्यानात येत नाही. बेरजेच्या राजकारणात जर दुसऱ्याला हात दिला , तर दोघेही वर पोहोचू शकतात.

तुर्कस्तानचे पंतप्रधान अर्दोगान , इस्त्रायलचे मंत्री एफ्रेम स्नेह , अरब महासंघाचे प्रमुख आम्रे मुसा , जर्मनीचे उका-परराष्ट्रमंत्री हॉयर , उत्तर आयर्लंडचे माजी सभापती लॉर्ड ऑल्डरडाइस , अमेरिकेचे प्रसिध्द संसदपटू सॅम ब्राऊनबॅक , कॅनडाचे माजी पंतप्रधान पॉल मार्टिन अशा अनेक नेत्यांनी त्यांच्या राष्ट्राच्या विकासाच्या मुद्दयांसंदर्भात माझ्याशी चर्चा केली , सल्ला मागितला. त्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. परक्यांकडून ते नवीन कल्पनांची मागणी करतात ; तसेच स्वत:च्या देशातील विरोधी पक्षनेत्यांबरोबरही देशहितासाठी नेहमी चर्चा करतात. राष्ट्रांची जडणघडण करताना राजकारणातील लढाई ते आड येऊ देत नाहीत. त्यामुळेच त्या देशांची प्रगती होते.

औद्योगिकदृष्टया सुधारलेल्या देशांमध्ये कामगार उगीचच संपांवर जात नाहीत. जपानमध्ये संपाची व्याख्या काळी फीत दंडाला लावून नेहमीपेक्षा जास्त जोम लावून काम करणे , अशी आहे. युरोप व अमेरिकेत कामगार संघटना आणि उद्योगसमूहांचे मालक एकत्र बसून संपूर्ण कामगारवर्गाचे भले कसे होईल , कामगार उत्पादन कसे वाढवू शकतील याच्यावर विचारविनिमय करतात.
विविध पक्षांमधील स्पर्धा हा लोकशाहीचा भाग झाला. पण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोहिमा आखणे हे लोकशाही समाजात परिपक्व झाल्याचे लक्षण आहे. उद्योगपती व कामगार संघटना यांनी एकत्रित येऊन पर्यावरणाचा संतुलन सांभाळणारी उत्पादने वाढवणे आणि नफ्यात कामगारांना योग्य प्रमाणात हिस्सा देणे , हे सुधारलेल्या अर्थकारणाचे द्योतक आहे. सारे जग पुढे धावत आहे , आपण वजाबाकीच्या गणिताने मागासलेले राहिले आहोत. जेव्हा आपण विधायक दृष्टिकोन स्वीकारू , तेव्हाच आपल्याला एक योग्य दिशा सापडेल. अन्यथा पुढच्या पिढीलाही आपण काही देऊ शकणार नाही. त्यांच्या अधोगतीला आपणच जबाबदार असू. दिवसेंदिवस वाढणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्यापुढील आव्हानांना मोठी परिमाणे मिळत आहेत. अशा तुफानात आपल्याला एकमेकांच्या मदतीने आपल्या देशाची नौका वल्हवायची आहे.
जगातील अनेक देशांनी भूकंप , प्रलय अशा अनेक प्रकारच्या संकटांतून आपल्या नागरिकांना सावरले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पैसे कमविण्याचे नवे मार्ग अशी भावना काही स्वार्थी प्रवृत्तीच्या राजकर्त्यांमध्ये तसेच स्वयंसेवी संघटनांमध्येही दिसून येते. पण परदेशात तसे नाही.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात व जपानमध्ये नेहमीच भूकंप होत असतात. कधी ते ५ वा ६ रिश्टर स्केलवर होतात. कॅलिफोर्नियात अथवा जपानमध्ये एकही व्यक्ती दगावत नाही. तेथील घरांची बांधणी , भूकंपाचा विचार करणारे स्थापत्यशास्त्र व शहरांची बांधणी करताना भूकंप झाल्यास मनुष्यहानी होऊ नये , याची योग्य ती काळजी घेतली जाते. ज्या देशांत घरे बांधताना काळजी घेत नाहीत , राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी गैरमार्गाने इमारती बांधण्यास परवानगी देतात , बांधकाम करणारे नफा वाढवण्यासाठी कमी दर्जाचा माल वापरतात , सामानात भेसळ करतात ; अशा देशांत भूकंप झाल्यास हजारो नव्हे , तर लाखो लोक मरतील.

एखाद्या मोठया भूकंपात किती लोक मरतात हे त्या देशात राज्यकारभार व प्रशासन कसे चालते आणि लोकांची सामाजिक मूल्ये काय आहेत , यावर जास्त अवलंबून आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे अथवा मानवी बेदरकारकाणाच्या वृत्तीमुळे निर्माण होणा-या अनेक आव्हानांमध्ये जीवितहानी हे भयंकर संकट आपल्यापुढे असते. ही मनुष्यहानी दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्तरावर यशस्वी प्रयत्न करता येणे शक्य आहे.

नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित संकट - अशावेळी मृत्यूवर विजय मिळवत आपण इतरांना कसे जीवदान देतो , याला महत्त्व आहे. बिघडलेली राजकीय व सामाजिक परिस्थिती असो किंवा नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती अथवा इतर समस्या - या सा-या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनावर फार मोठे परिणाम करतातच , कारण त्या आपले सामाजिक स्वास्थ्यदेखील बिघडवू शकतात. त्यामुळे हातपाय गाळून बसण्यापेक्षा अशा परिस्थितीवर थेट मार्ग काढला पाहिजे. अशक्य असे काहीच नसते. आपल्यात माणुसकी आहे , पण सामाजिक घडी व न्यायासाठी चाड असणेही आवश्यक आहे. अर्थात एका रात्रीत सर्वच लोक बदलणार नाहीत. कोणीतरी , कुठेतरी बदल करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे.

एकदा सुरुवात झाली तर एक वेळ अशी येते , जेव्हा बदल मोठी गती घेतो. आपल्या नकळत सर्व समाज बदलून जातो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकेत गुलामगिरीचा काळ होता. ती नष्ट होईल व कृष्णवर्णीय व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल , असे कोणाला पूर्वी स्वनातही वाटले नव्हते. काण काही लोकांनी गुलामगिरीस विरोध केला. अशक्य वाटणारा बदल शक्य झाला. सुमारे १९०० पर्यंत लोक विमानतळावर , सिनेमागृहात , रस्त्यात धूम्रपान करत. त्यामुळे कर्करोग होतो , हे लोकांना समजले. प्रथम विमानात धूम्रपान करण्यास बंदी आली. मग विमानतळावर बंदी आली. नंतर सार्वजनिक जागी , सरकारी इमारतींत आणि इतर अनेक ठिकाणी बंदी आली. हळूहळू लोकांनी धूम्रपान सोडले.
मी माझ्या घरातही धूम्रपान करू देत नाही. जवळच्या मित्रालाही धूम्रपान करायचे असल्यास बाहेरून धूम्रपान करून मग घरात ये , असे सांगतो. माझी कोणाशीही मैत्री कमी झाली नाही , उलट मित्रांचे धूम्रपान कमी झाले. पूर्वी स्त्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड-अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले , तेव्हा ३३ टक्के जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

आपल्या सभापती एक दलित महिला नेत्या आहेत , सर्वांत मोठया पक्षाच्या अध्यक्ष एक महिला आहेत , एका मोठया राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत व राष्ट्रपती एक महिला आहेत. ज्याप्रमाणे गुलामगिरी , धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा होत आहेत ; त्याप्रमाणे भ्रष्टाचार , सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे.

आपल्याला आपली शहरे आणि गावे सुधारण्याची इच्छा असेल , तर त्यासाठी फार मोठा अवधी नको किंवा मोठी गुंतवणूक नको. हे सर्व सध्याच्या आर्थिक चौकटीत करणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे ती समाजाभिमुख नेते आणि जागरूक तळमळ असलेल्या नागरिकांची. आपली प्रगती वेळ अथवा पैशांच्या अभावी खुंटलेली नाही. जेव्हा आपल्याला दूरदृष्टी असलेले नेते व जागरूक आणि सक्रिय नागरिक मोठया प्रमाणात मिळतील , तेव्हा अल्पशा अवधीत व थोडयाशा निधीत बेरोजगारी , रोगराई व भूक हे प्रश्नही सुटतील.

त्याची सुरुवात कोणीतरी करायला हवी. कोणी एका मानवाने जमिनीवर रेघ मारली व ही जागा माझी आहे , असे जाहीर केले व खाजगी मालमत्तेची कल्पना रूढ झाली ; कोणी एका मानवाने हातात नांगर धरला व संपूर्ण जगात शेतीची कल्पना रूढ झाली ; कोणी एका मानवाने दोन दगड घासले , ठिणगी उडाली व ऊर्जेची कल्पना अस्तित्वात आली ; कोणी एका मानवाने धातू वाकविला व उद्योग जन्मास आला ; कोणी एका मानवाने १ , ० , १ , ० अशी द्विमान अंकमोजणी वापरली व संगणकशास्त्र उदयास आले ; कोणी एका मानवाने काव्य म्हटले व साहित्य जन्मास आले ; कोणी एका मानवाने गुहेच्या भिंतीवर छोटया दगडाने रेघा मारल्या व कलेचा उदय झाला ; कोणी एकाने परमेश्वराची कल्पना मांडली व धर्माचा उदय झाला ; तर कुणी दुर्बीण तयार केली अन् आपल्या मनाचा विस्तार वसुंधरेपलीकडे पसरला. कोणी अज्ञात व्यक्तीने केलेल्या छोटया बदलामुळेच मानवी संस्कृती निर्माण झाली. काही शोधांचे जनक आपणांस माहिती आहेत. पण ज्यांनी मूलभूत शोध लावले त्यांची आपल्याला काहीच माहिती नाही. वेद व उपनिषदे कोणी लिहिली ते सारे ॠषीमुनी आपल्याला ठाऊक नाही. त्याचा वापर करून साम्राज्य बनवणारे आधुनिक धर्मगुरू आपल्या माहितीचे आहेत.

जगातील अलीकडचे अनुभव लक्षात घेतल्यानंतर हेच स्पष्ट होते की , राजकीय व सामाजिक बदल करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. नागरिकांनी धैर्य व सक्रिय जागरूकता दाखवली , तर एक नवीन उष:काल शक्य आहे. हे करत असताना बदलाची सुरुवात आपल्यापासून करावी लागेल , हे लक्षात घेतले पाहिजे. भ्रष्टाचार व स्वत:च्या कुटुंबाचेच भले करणारे राजकारण समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. मुलांना आपल्या धंद्यात ओढून न घेता स्वतंत्र आयुष्य जगण्याचे शिक्षण दिले पाहिजे.

पात्रतेपेक्षा केवळ घराणेशाही अथवा सत्ता आपल्या हातातून निसटून जाऊ नये , या भावनेतून जेव्हा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर , अभिनेत्रीची कन्या अभिनेत्री , पोलीस अधिका-याचा मुलगा पोलीस होणे बंद होईल ; तेव्हाच खासदाराचे पुत्र व कन्या खासदार - आमदार होऊ नये , असे आपल्याला वाटू लागेल. आपण आपल्या घरात मुलाची लायकी अथवा आवड नसताना त्याला आपल्या व्यवसायाचा वारसदार करत असलो ; तर राजकीय नेतेही आपल्या मुलांना वारस म्हणून निवडत असल्यास त्यात गैर ते काय ?

घराणेशाहीला आळा घालण्याबरोबरच लाचलुचपत देणे बंद करणेही सामान्य लोकांची जबाबदारी आहे. आपली नैतिक अधोगती राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नाही. स्वत:ला पांढरपेशे समजणारे बँकांचे व वित्तीय संस्थांचे अधिकारी आर्थिक घोटाळे करतात , शेअर बाजारात उचापती करतात. ब-याच उद्योजकांना ओळखीने अथवा लाच खाऊन कर्ज देतात , दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत. आपणांस जर स्वच्छ राजकारण हवे असेल , तर प्रथम स्वच्छ अर्थकारण लागेल. त्यासाठी लोकांनी जागरूक राहून आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. हे काम सेवाभावी संस्थाच करू शकतात , कारण प्रसारमाध्यमे मोठया उद्योगसमूहांच्या हातात आहेत. सेवाभावी संस्थांनी इंटरनेटसारखे नवीन माध्यम किंवा पथनाटय अथवा रस्त्यांवरील सभांसारखे जुने मार्ग अवलंबून घोटाळे करणा-या उद्योजकांची माहिती लोकांसमोर आणली पाहिजे.

अशा उद्योजकांच्या मालावर व शेअरवर ग्राहकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. काही उद्योगसमूह रत्नांचा व्यवसाय करताना आफ्रिकेतील गरीब देशांचे शोषण करतात व स्थानिक जमातींमध्ये आपल्या फायद्यासाठी संघर्ष घडवतात , अशी माहिती बाहेर आली ; व्हा युरोप , अमेरिकेतील ग्राहकांनी अशा उद्योगसमूहांच्या रत्नांवर व दागिन्यांवर बहिष्कार टाकला. सर्व समूह त्यामुळे वठणीवर आले व त्यांनी आपल्या व्यवसायाची तत्त्वे कायमची बदलली. भारतातही जागरूक नागरिक असा धडा शिकवू शकतात. आपल्याकडे माणुसकी , उद्योजकता , लोकशाहीची कल्पना व इतर मूल्ये आहेत. त्यांपैकी काही मूल्यांविषयी आपल्या मनात संभ्रम आहे , तर काही मूल्ये आपल्याला कालबाह्य वाटू लागली आहेत. आपल्याकडे जे आहे त्याचा सकारात्मक उपयोग करून अहिंसेच्या मार्गाने बदल केले , तर एका नवीन समाजाची निर्मिती होईल.

माझ्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली. त्यानेही ती ऐकली होती. एका तळयाकाठी शंभर माकडे बसली होती , ती रताळी खात होती. रताळयाला लागलेल्या मातीसह माकडे ती खात होती. चुकून एका माकडिणीच्या हातून रताळे तळयात पडले. तिने ते उचलले तेव्हा ते पाण्याने स्वच्छ झाले होते. माकडिणीला स्वच्छ रताळयाची चव आवडली. तिने दुसरे रताळे स्वत:च पाण्यात टाकले. स्वच्छ झाल्यावर चवीने खाल्ले. तिचा आविर्भाव पाहून दुस-या माकडिणीने रताळे पाण्यात टाकले. तिलाही चव आवडली. तिने सगळी रताळी धुऊन खाल्ली.

हळूहळू तिसरे , चौथे व पाचवे माकड पहिल्या दोन माकडिणींना बघून पाण्यात रताळी टाकून स्वच्छ करून खाऊ लागले. इतर माकडांनीही त्यांचे अनुकरण केले. हळूहळू करत शंभराव्या माकडाने रताळे धुऊन खाल्ले , तेव्हा चमत्कार झाला. त्या बेटावरील सर्व माकडे रताळे धुऊन खाऊ लागली. ज्या माकडांनी पहिल्या शंभर माकडांना रताळे धुताना पाहिले नव्हते , त्यांनाही ही सवय लागली. काही आठवडयांनी इतर बेटांवरील माकडेही रताळे धुऊन खाऊ लागली. काही महिन्यांत ही नवीन सवय संपूर्ण प्रदेशभर पसरली व माकडांची रताळे खाण्याची पध्दत कायमची बदलली. घाणेरडी रताळी व अस्वच्छ राजकारण आणि घोटाळयाचे अर्थकारण यांत फरक नाही. आपल्याला त्यांची जणू सवय झाली आहे. काहीजणांनी ती नाकारली , तर हळूहळू ही सवय सर्वत्र पसरेल.

जगात सर्वत्र रचनात्मक बदल होणे शक्य आहे. तुर्कस्तान , मलेशिया , सिंगापूरसारख्या देशांत ते अल्पावधीत झाले आहेत. त्यासाठी रक्तरंजित क्रांतीची , पैशाच्या पाठबळाची गरज नाही. नागरिकांनी स्वत: स्वच्छतेपासून अनेक कार्यक्रम राबवले. भ्रष्टाचारी , सरंजामी व कुचकामी राजकीय नेत्यांवर पोकळ टीका करण्यापेक्षा आपण त्याबाबत किती दक्ष आहोत , हे राजकारण्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले पाहिजे व राजकारण्यांना त्यांच्या विश्वासार्हतेबाबत जाब विचारला पाहिजे. असे प्रत्येकजण करू लागला , तर समाज बदलू शकतो. हा विचारही दूध पिणा-या गणपतीप्रमाणे एका दिवसात जगभर पसरू शकतो. तो विचार पसरला व नागरिक कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहिले , तर फरक पडू शकतो.

संत रामदासांनी म्हटले आहे की , ' केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे. ' आपल्याला प्रथम आपले मन कुठे भरकटले आहे ते तपासून ठिकाणावर आणले पाहिजे. त्यासाठी काही प्रयोग करणे आवश्यक आहे. वेद , उपनिषदे , गीता , कौटिलीय अर्थशास्त्र या भारतातील ग्रंथांनी तत्कालीन ग्रीक व चिनी तत्त्वज्ञानाच्या जोडीने आधुनिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. आपणास त्यातून राजकीय व सामाजिक तत्त्वे शिकता येतील. किंबहुना त्याची अधिक गरज आहे. मागच्या पाचशे वर्षांत हॉब्स , लॉक , रूसो , कांट , रसेल यांनी ही तात्त्विक चर्चा पुढे नेली. आपली फारशी वैचारिक प्रगतीझाली नाही. त्यामुळे जगातील राजकीय व सामाजिक आदर्श आपण कसे अमलात आणू शकतो , याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. वेदांना विसरून मार्क्सला मिठी मारायची , आर्यभटला विसरून कोपर्निकसची पूजा करायची , कौटिल्यास बाजूला ठेवून केन्सकडून धडे घ्यायचे - ही सर्व वागणूक आपल्यात राष्ट्रीय आत्मविश्वास नसण्याची चिन्हे आहेत. पण त्याचबरोबर तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्रगतीची बढाई मारून आधुनिक ज्ञानाकडे पाठ फिरवणेसुध्दा मूर्खपणाचे आहे. एकविसाव्या शतकातला भारत हा पूर्व व पश्चिम दोन्हीकडच्या उचित तत्त्वांवर आधारित मार्गक्रमण करणारा असला पहिजे.

आपला सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास होण्यासाठी जबाबदार राजकीय नेतृत्व मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जनतेने पुढाकार घेऊन नेते घडवले पाहिजेत. त्यासाठी पक्षांची कुटुंबशाही व पारंपारिक राजकीय पध्दती झिडकारली पाहिजे. बदल आणताना हिंसेने काहीही साध्य होत नाही , हे लक्षात ठेवले पाहिजे. परिवर्तन म्हणजे सर्वच जुने मोडकळीस काढणे हेही चुकीचे आहे. हजारो अथवा किमान शेकडो वर्षे सामाजिक संस्था अखंडितपणे सुरळीत कार्यरत ठेवून त्यात सकारात्मक बदल करण्याची कला आपण शिकली पाहिजे. बेरजेचे राजकारण व अर्थकारण केले पाहिजे. आत्मविश्वास व चांगली मूल्ये यांच्या जोरावर दुराग्रही शक्तींना नमवले पाहिजे. आयुष्याचे मूल्यमापन यश किंवा अपयश याच्यावर न करता इष्ट की अनिष्ट या निकषांवर केले पाहिजे. त्यातून आपल्याला एक दिशा सापडेल.

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

ती माझ्याकडे बघते.

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

सोन्याचा गणपती



मानवी मनोऱ्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत किशोरचा बळी.







जीव फक्त ‘लाख’ मोलाचाच?

दहीहंडी फोडण्यासाठी चौथ्या-पाचव्या थरावर चढून ‘चमकेश’ आयोजकांना सलामी देता देता कोसळलेल्या ठाण्यातील किशोर कांबळे या गोिवदाचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. वृद्ध आई-वडील, एक अपंग आणि दोन लहान भावंडे असा परिवार किशोरच्या जाण्याने एका क्षणात उघडय़ावर आला. अवघे २० वर्षांचे तरुण वय असलेला किशोर कुठेतरी नोकरी शोधून आपले घर सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच दहीहंडीवर लावण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या आमिषाला बळी पडला आणि आयोजकांनी स्वत:ची हिडीस प्रसिद्धी व भपकेबाजीचे दर्शन घडविण्यासाठी गोविंदारूपी दहीहंडीच्या रूपात रस्त्या-रस्त्यांवर मांडलेल्या मानवी जीवाच्या जुगारात तो आयुष्य गमावून बसला. किशोरच्या बलिदानातून निदान या पुढेतरी दहीहंडीच्या उत्सवात मर्यादांचे भान ठेवण्याची सद्बुद्धी आयोजकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
२५-३० हजारांच्या हंडय़ा आता २५-३० लाख रुपयांवर गेल्या आहेत. धन, संपत्ती आणि काळ्या पैशांचे एकीकडे किळसवाणे प्रदर्शन होत असताना गोरगरिबांच्या जगण्याच्या वाटेवर मात्र अंधार दाटतो आहे. यातही उल्लेखनीय बाब म्हणजे करचुकवेगिरी करणाऱ्या एखाद्या सामान्य नगरिकाच्या हात धुवून मागे लागणाऱ्या आयकर खात्याच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांना २५ लाखांची दहीहंडी उभारणाऱ्यांकडे मात्र एवढा निधी कोठून आला, हे विचारण्यास कदाचित ‘वेळ’ मिळत नसावा. राजकीय लागबांधे एवढेच उत्तर असू शकते.
किशोरच्या घरी कुणी कमावते नाही. मोठा भाऊ अपंग, दोन लहान भावांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांचे पालनपोषण कसे करावे या विवंचनेत असलेल्या किशोरला दहीहंडीवर लावलेल्या लाखालाखांच्या बक्षिसांची भुरळ पडली. कोणतेही प्रशिक्षण नसताना १०-२० हजार रुपये तरी मिळतील, या अपेक्षेने गोविंदा मंडळात तो सहभागी झाला आणि पाचव्या थरावरून तीन ते चार वेळा खाली कोसळला. परंतु डीजेचा धुमाकूळ आणि ‘शोर मच गया शोर..’च्या बेधुंद गोंगाटात त्याच्या छातीत मुक्या माराने सुरू झालेल्या वेदना कुणालाच ऐकू गेल्या नाहीत. औषधोपचारांसाठी पैसा नाही म्हणून तो कुणालाही न सांगता सहन करीत घरी बसला आणि शेवटी त्यातच संपला. त्याच्या जाण्याने किती वेदना होत आहेत, हे दाखविण्यासाठी दहीहंडय़ांचा जुगार मांडणारी नेते मंडळीच पुन्हा त्याच्या घराकडे धावली आणि अवघे एक लाख रुपये एवढे त्याच्या आयुष्याचे मोल करून मोकळी झाली. पण तेवढय़ाने हा प्रश्न संपला नसून त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा गुंता कुणी सोडवायचा, याचे उत्तरही आता शोधावे लागणार आहे.
माणसातील माणुसकी आणि संवेदना संपल्या काय, असा प्रश्न करणारी ही घटना. लोकांच्या उत्सवप्रियतेचा लाभ उठवित स्वत:च्या राजकीय लाभासाठी त्याचे ‘इव्हेण्ट’मध्ये रूपांतर करणारे नवराजकारणीच या दुर्घटनांना जबाबदार आहेत. राजकारणातून पैसा आल्यानंतर त्याचे जाहीर प्रदर्शन करण्यासाठी असे जीवावर बेतणारे मानवी जीवाचे जुगार मांडले जात आहेत. आयकर खात्यासह त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. कुणीही उठतो आणि लाखा-लाखांच्या हंडय़ा जाहीर करून सळसळत्या तरुणाईला बक्षिसांचे आमिष देऊन या जीवघेण्या स्पर्धेत उतरवितो. ४०-५० फूट उंचीवर लावल्या जाणाऱ्या या दहीहंडय़ा तेवढय़ाच उंचीचे मनोरे लावून फोडण्यात प्रचंड साहस व कौशल्य लागते, हे मान्य केले तरी त्यातील जीवाची जोखीम व बघ्यांची विकृती याचे समर्थन कसे करता येईल? इमारतीच्या चौथ्या, पाचव्या मजल्यावरून अपघाताने एखाद्या जिवंत माणूस खाली पडतानाचा क्षण ज्यांना रोमहर्षक वाटतो, अशांची गणना विकृत माणसांतच केली जाते. दहीहंडीच्या सातव्या, आठव्या थरावर चढलेले लहान बालक ३५-४० फुटांवरून खाली कोसळते, तेव्हा टाळ्या आणि शिट्टय़ा मारणारे आयोजक व बघ्यांच्या गर्दीला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. कोसळणाऱ्यांपैकी किशोर कांबळे प्राणास मुकला. पण असे अनेक गोविंदा मणक्याला, पायाला, डोक्याला गंभीर इजा झाल्याने आजही मुंबई, ठाण्यातील इस्पितळात जायबंदी होऊन पडलेले आहेत. त्यापैकी किती जणांच्या वाटय़ाला जन्मभराचे अपंगत्व व विकलांगता येणार हे काळच ठरविणार आहे. त्यावर काय उपाय आहे, याचे उत्तर आज दहीहंडय़ांवर लाखोची बक्षिसे लावणाऱ्यांकडे नाही. एक दिवसाचा इव्हेण्ट होता. तो साजरा करून राजकारणी मंडळी मोकळी झाली, पण किशोर कांबळेसारख्या अनेक तरुणांच्या आयुष्यात व त्यांच्या कुटुंबांत कायमचा अंधार निर्माण करण्यास आपण कारणीभूत झालो याचे भान त्यांना नाही.
किशोरच्या मृत्यूमुळे निदान दहीहंडीच्या उंचीवर तरी कायदेशीर र्निबध यावेत आणि या उत्सवासाठी काही कठोर आचारसंहिता व नियम तयार केले जावेत अशी मागणी करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांनीही या घटनेनंतर तशी आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन पुढाकार घेतला तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. अन्यथा किशोरसारख्या अनेक तरुणांचे जीवन यापुढेही उद्ध्वस्त होतच राहील, याच कोणतीच शंका नाही!

मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवचकुंडले!

विळीवर भाजी चिरताना कधी कधी घाईगडबडीत अचानक बोट कापते आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात होते, मग आपण रक्त वाहणारा हात/बोट थेट वाहत्या पाण्याखाली धरतो, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बोट तोंडात घालतो किंवा हळद चेपून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करतो. मोठा अपघात झाला किंवा गंभीर भाजण्याच्या घटनेतही मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी पहिल्यांदा रक्तस्त्राव थांबविणे हे रुग्णाच्या जीवासाठी महत्त्वाचे असते. छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव काही वेळाने आपोआप थांबतो, पण गंभीर जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपल्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ रक्त गोठण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात.त्यामुळे ‘प्लेटलेट्स’ म्हणजे आपल्या प्राणांसाठीचे कवचकुंडल आहेत.
‘प्लेटलेट्स’रुपी या कवचकुंडलांविषयी अधिक माहिती देताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात ‘निमा’च्या महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य डॉ. अभय कानेटकर यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर अपघातात किंवा भाजण्याच्या दुर्घटनेत तसेच डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या गंभीर आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. आपल्या शरीरातील रक्तात हिमोग्लोबीन, कॅल्शिअम, पांढऱ्या आणि लाल पेशी, ऑक्सिजन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. तसेच आपल्या रक्तात ‘प्लेटलेट्स’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. रक्त गोठविण्याचे काम या ‘प्लेटलेट्स’ करीत असतात. एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये रक्तस्त्राव होण्याचा आणि तो थांबण्याचा काळ वेगवेगळा असतो. रक्तातील ‘प्लेटलेट्स’ हा घटक रक्त गोठविण्याचे (गुठळी तयार करण्याचे)काम करतो. जखमेच्या ठिकाणी प्लेटलेट्स एकत्र येतात आणि रक्तस्त्राव बंद होतो.
‘प्लेटलेट्स’साठी गोळ्या किंवा औषधे नाहीत
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले तर त्याला बाहेरून औषधे, गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन त्याची पातळी वाढवता येते. तसेच कॅल्शियमच्याही गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन ते वाढवता येते. मात्र रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्या तर कोणत्याही गोळ्या, औषधे किंवा इंजेक्शन देऊन त्या वाढविता येत नाहीत. संबंधित व्यक्तीला त्या रक्तावाटेच द्याव्या लागतात, असे सांगून डॉ. कानेटकर म्हणाले की, रक्ताच्या तपासणीमध्ये अन्य घटकांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’चे प्रमाणही तपासता येते. सर्वसामान्य माणसाच्या शरीरात अडीच लाख इतक्या संख्येत ‘प्लेटलेट्स’ असतात, सुदृढ व्यक्तीसाठी ही संख्या आवश्यक असते. त्यापेक्षा प्रमाण कमी असेल तर ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतात. काही वर्षांपूर्वी रक्तातून ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झालेले नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्तातील फक्त ‘प्लेटलेट्स’ची गरज असली तरी त्याला संपूर्ण रक्त द्यावे लागायचे. मात्र आता तसे होत नाही. रक्तातील घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त रक्तपेढय़ांमध्ये असते. या ठिकाणी प्रयोगशाळेत रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढून त्या वेगळ्या पिशवीत भरतात. त्यामुळे आता रुग्णाला फक्त ‘प्लेटलेट्स’ही देता येऊ शकतात.

एका पिशवीचा तिहेरी उपयोग
आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा रक्त जमा केलेली पिशवी रक्तपेढीत जमा केली जाते. या ठिकाणी रक्ताच्या प्रत्येक पिशवीतील लालपेशी (आरबीसी), हिमोग्लोबीन आणि ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या केल्या जातात. हे तीन घटक वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले जातात. त्यामुळे आता एका व्यक्तीने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन वेगवेगळ्या रुग्णांना होऊ शकतो. रुग्णाला ‘प्लेटलेट्स’ देण्याचे काम दोन प्रकारे होते. एक प्रकार म्हणजे रक्तपेढीत जमा झालेल्या रक्तातील वेगळ्या केलेल्या ‘प्लेटलेट्स’ ज्याला गरज आहे, त्याला देता येऊ शकतात. तर दुसरा प्रकार म्हणजे ‘प्लेटलेट्स’ दान (रक्तदान करण्याप्रमाणे ‘प्लेटलेट्स’ही दान करता येतात) करणाऱ्या दात्याच्या रक्तातून थेट ‘प्लेटलेट्स’ काढल्या जातात आणि त्या लगेच संबंधित रुग्णाला दिल्या जातात. रुग्ण आणि ‘प्लेटलेट्स’दाता हे एकाच वेळी रुग्णालयात हजर असतात. ही यंत्रणा डायलेसिस्सारखी असते. दात्याच्या रक्तातून काढलेल्या ‘प्लेटलेट्स’ रुग्णाच्या रक्तात मिसळल्या जातात.

‘प्लेटलेट्स’ची गरज
गंभीर अपघात, भाजणे यांसारख्या दुर्घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. अशा वेळी रक्तस्त्राव थांबवणे ही पहिली गरज असते. त्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या आजारात प्रतिजैविके देऊन ताप बरा केला जातो. मात्र ताप उतरला तरी रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी होत असतात. कमी झालेल्या ‘प्लेटलेट्स’ कोणतीही औषधे किंवा इंजेक्शनने भरून निघत नाहीत. त्यासाठी थेट रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण वाढविण्याची गरज असते. रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि एखाद्या अपघातात तो जखमी झाला, तर रक्तस्त्राव होऊन त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ‘प्लेटलेट्स’ची अत्यंत गरज भासते. रक्तदानाप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दानही करता येऊ शकते. मात्र त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होण्याची गरज असून ‘प्लेटलेट्स’ दान करणाऱ्या दात्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रक्तदान करणाऱ्यांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दान करण्यासाठी मोठय़ा संख्येने व्यक्तींनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही डॉ. कानेटकर यांनी व्यक्त केली.
- शेखर जोशी

सोमवार, २१ जून, २०१०

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते.

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...


परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!

मंगळवार, ८ जून, २०१०

रोज नवं आव्हान

करिअर निवडीसाठी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शनपर अशा 'महाराष्ट्र टाइम्स एचएससीनंतर काय?' या उपक्रमांतर्गत वाशी इथल्या आयसीएलई या कॉलेजमध्ये
पत्रकारिता क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देणारं सेमिनार नुकतंच झालं. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक दिवाकर देशपांडे आणि 'स्टार माझा'चे न्यूज अँकर मिलिंद भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

......

प्रिण्ट मीडिया :

पूर्वी पत्रकारितेला समाजसेवेचं स्वरुप होतं. पण, आता पत्रकारिता एक व्यवसाय झाला आहे. वृत्तपत्र तसंच नियतकालिकांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

आवश्यक कौशल्य :

विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या गुणांचा वापर करिअर घडवण्यासाठी केला पाहिजे. भाषेची, लिखाणाची तसंच वाचनाची आवड असेल, तर तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकता. प्रिण्ट जर्नलिझममध्ये (वृत्तपत्र, मासिकं, नियतकालिकं) संपादकीय आणि तांत्रिक असे दोन विभाग असतात. संपादक, उपसंपादक, वार्ताहर, छायाचित्रकार अशी कामाची वर्गवारी यात असते.

या क्षेत्रात काम करताना उत्तम निरीक्षणशक्ती, अचूकता, भाषेची जाण यासारखे गुण अंगी असावे लागतात. यासाठी वाचन सगळ्यात महत्त्वाचं असतं. भाषा आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील वाचन करावं लागतं. संपादकीय विभागाबरोबरच तांत्रिक विभागाचं कामही जबाबदारीचं असतं. पेपरचा खप, डिझायनिंग, फोटो प्रोसेसिंगसारखी तितकीच महत्त्वाची कामं इथे करावी लागतात. त्याचबरोबर आपल्या इण्डस्ट्रीची माहिती असावी लागते.

संधी :

पत्रकारिता फक्त वृत्तपत्रांमध्ये नसून वेगवेगळ्या मासिकांसाठीही करता येऊ शकते. मराठी भाषेमध्ये अनेक साप्ताहिकं तसंच नियतकालिकं निघतात. स्पर्धा वाढल्यामुळे मासिकांसाठी काम करताना चांगला पगारही मिळतो. फ्री लान्सिंग पद्धतीने एकाच वेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी तसंच मासिकांसाठी लिखाणाचं काम करता येतं. केवळ ग्लॅमर म्हणून या क्षेत्रात येण्याची इच्छा ठेवू नका. मेहनत करण्याची तयारी असेल तरच पत्रकारितेचा विचार करा.

इलेक्ट्रॉनिक मिडिया :

गेल्या काही वर्षांमध्ये न्यूज चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे इलेक्ट्रॉनिक जर्नलिझममध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या ग्लॅमरस क्षेत्राकडे अनेक मुलं-मुली आकषिर्त होत आहेत. पण, इथे प्रचंड संघर्ष आणि मेहनत आहे हेही तितकंच खरं आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे घड्याळाशी स्पर्धा असते. सतत एकसारख्याच उत्साहाने बोलता आलं पाहिजे. यासाठी अनेक विषयांचा अभ्यास आणि प्रभावीपणे बोलण्याचा सराव गरजेचा असतो. न्यूज अँकरिंगसाठी विविध क्षेत्रांतील मूलभूत माहिती असावी लागते. शुद्ध भाषा आणि स्पष्ट शब्दोच्चार हे न्यूज अँकरिंगसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. समोर स्क्रीनवर बातमी दिसत असली, तरी ती वाचायची नसते तर सांगायची असते. त्यामुळे गोष्टीसारखी (स्टोरी टेलिंग) बातमी सांगता आली पाहिजे. रिपोटिर्ंगसाठी एखाद्या घटनेचा मागोवा घेणं, सहनशीलता तसंच चौकसपणा अंगी असावा लागतो. बातमीचा गाभा आणि घडलेली घटना कथन करता आली पाहिजे. वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्यापूवीर् वृत्तपत्रांमध्ये काम केल्यास हे गुण विकसित होतात.

न्यूज रिपोर्टर तसंच अँकर याव्यतिरिक्त अनेक जागांवर काम करता येतं. कॅमेरामन, व्हिडीओ एडिटर, अॅनिमेटर, व्हिडीओ लायब्ररियन अशा पदांवरही जबाबदारीने काम करावं लागतं. अनेक न्यूज चॅनेल्सची स्वत:ची व्हिज्युअल लायब्ररी असते. ती सांभाळण्यासाठी नीटनेटक्या अशा माणसाची गरज असते. तुमच्याकडे जर व्यवस्थितपणा असेल, तर या पदावर तुम्ही काम करू शकता. अनेक वेळा एखाद्या घटनेचे व्हिज्युअल्स उपलब्ध नसतात. अशा वेळी ग्राफिक्स तयार करण्याचं काम अॅनिमेटरचं असतं. त्यामुळे अॅनिमेशनचं प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीही न्यूज चॅनेल्समध्ये संधी आहेत. व्हिडीओ शुटिंगनंतर तो एडिट करणं महत्त्वाचं असतं. एडिटिंगची आवड असणाऱ्यांसाठी वृत्तवाहिन्यांमध्ये एडिटरची जागा आहे. शूट केलेला व्हिडीओ कमीत कमी वेळात अचूकपणे एडिट करणं जबाबदारीचं आणि महत्त्वाचं असतं.

जर्नालिझमचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :

बारावीनंतर बीएमएम अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्याथीर् घेऊ शकतात. त्याचप्रमाणे पदवीनंतर मास्टर्स तसंच डिप्लोमाचे कोसेर्स असणाऱ्या अनेक संस्था आहेत.

पत्रकारिता आणि संज्ञापन विभाग, मुंबई विद्यापीठ

रानडे इन्स्टिट्यूट, पुणे

डिप्लोमा कोर्सेस :

गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेण्ट
झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, झेविअर्स कॉलेज

आई, असं का ग केलंस?

( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )


आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........
------

"मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी...!!!! "

गुरुवार, ६ मे, २०१०

गरीब मुलगा

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" "सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय.त्याने शिवलाय;पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा,मागून दोन ठिगळं लावलेली आहेत.चपला त्याला नाहीतच.मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो.तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर?गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे.शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत?
कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ,मोकळं होतं.त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,"पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराल सुबक परीच्छेद,समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई.माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये,या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!...,मी खूप कमी पडतोय. मयूर,गेल्या सहलीला आला नव्हता.अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती;पण त्याचं नाव यादीत नव्हतं.आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती.केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले.एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो.खरंच आहे,मुलांनी सुचवलेलं नाव.आर्थिक मदत,तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.'मयूर जाधव,सातवी अ,अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर?कारण थोडीथोडकी रक्कम नाही.या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी,त्याचे शालेय शिक्षण साहित्य,गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर,त्याची काळजीच करू नका.वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत,त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो.देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो.इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता.राग आवरावा तसा करारी चेहरा...
"सर,रागवू नका;पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
"अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?"
"चुकतही असेन मी.वाट्टेल ती शिक्षा करा;पण ते नाव ...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी,घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ......
मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....? "सर,मला मदत कशासाठी?गरीब म्हणून?मी तर श्रीमंत आहे."

त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते.
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला;पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,"ठीक आहे.तुला नकोय ना ती मदत,नको घेऊस;पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर,माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा,कुठल्याही विषयाच्या....त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय...खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना ? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.

सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"मयूर मलाच विचारत होता
आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच ......."
"सर,मदत कसली?माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल.शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर,मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते.तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात.चार पैसे मला मिळतात,ते मी साठवतो.सर,संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे.घरातले सगले काम करतात.काम म्हणज कष्ट.रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते.मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी.सर,माझ्या घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल.देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. .
.......सर,आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.

सर,शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान गातात!ऐकताना भान हरपून जातं."त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.
अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?" "सर,तेवढी फ़ुरसत कुठली?घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो." अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.
"मयूर मित्रा,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."

"म्हणूनच म्हणतो सर......!"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे,त्यात तू नक्कीच बसणार नाहीस.आमची निवड चुकली;पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल.शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी........."
"सर,एवढ्यात नाही.त्याला वर्ष जाउ द्या.मी लिंकनचं,सावरकरांचं चरित्र वाचलं,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर,हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली.माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या,योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा;पण सर,नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल.जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल...सर.....प्लीज.....!"

वाचनानं,
स्पर्धांतल्या सहभागानं,
कलेच्या स्पर्शानं,
कष्टानं.......
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती,
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती.
आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता.
त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता.
परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा !
श्रीमंत ! सर्वात श्रीमंत

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारीहातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघतानाभविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊनतिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहातानास्वतःशी स्मित करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुनतिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालयतिच्या बरोबरीने चढायचाय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंदतिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला,
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांनाडोळ्यावाटे मुक्त करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्यझऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला,
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठीतिचा चेहेरा पहात जायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

This poem is very close to my heart... and hope it touches yours too

असा हा आजचा महाराष्ट्र.

असा हा आजचा महाराष्ट्र

* 35 दिवसांत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
* सुमारे 21 हजार गावांचे घसे पडले कोरडे
* भारनियमनाचा हंगाम सुरूच राहणार
* महाराष्ट्राच्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज
* रोजगारनिर्मितीला नाही वेग, अनेक उद्योग जाताहेत महाराष्ट्राबाहेर.
* मुंबईसह ठिकठिकाणी मराठी शाळा बंद होताहेत.

राजकीय अजेंड्यावर...
* मराठी-अमराठी वाद
* चित्रपटाचे राजकारण
* परवान्याचे राजकारण
* जुन्या वादाची नव्याने धुणी-भांडी
* प्रतीकात्मक आंदोलने

कशी समजणार यांना महागाई
लोकप्रतिनिधींना महागाई लवकर का कळत नाही त्याचे हे एक कारण. प्रत्येक खासदाराला मिळणाऱ्या पुढील सवलती पाहा...
* मासिक वेतन 12,000 रुपये
* कामकाजासाठी मासिक खर्च 10,000 रुपये
* कार्यालयीन खर्च 14,000 रुपये
* प्रवासभत्ता (किलोमीटरला आठ रुपयांप्रमाणे) 48,000 रुपये
* अधिवेशन काळात रोज 500 रुपये
* रेल्वेत प्रथम वर्गातून देशभर कुठेही कितीही प्रवास
* विमानात बिझनेस क्‍लासमधून पत्नी किंवा पीए सोबत 40 वेळा मोफत प्रवास
* घरगुती वापरासाठी 50 हजार युनिटपर्यंत वीज मोफत
* स्थानिक संपर्कासाठी एक लाख 70 हजार कॉल मोफत
* कार्यालयासाठी काही अत्यावश्‍यक वस्तू / सुविधा
* प्रत्येक खासदारावर सरकारी तिजोरीतून दरमहा अंदाजे 2.66 लाख आणि वर्षाला 32 लाख रुपये खर्च
* सर्व म्हणजे 534 खासदारांवर वर्षाला सरकारी तिजोरीतले होतात 855 कोटी रुपये खर्च
* मंत्र्यांचा तोरा न्यारा

---सकाळ वृत्तसेवा

Orkut next generation (Marathi)

मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

Confidence Trust and Hope

I got these definitions in one of the forword, good ones


CONFIDENCE:
Once all village people decided to pray for rain. On the day of
prayer all people gathered and only one boy came with an
umbrella.... ... that's Confidence..


TRUST:
Trust should be like the feeling of a one year old baby when you
throw him in the air, he laughs.....because he knows you will catch
him.... that's Trust..


HOPE:
Every night we go to bed, we have no assurance to get up alive in
the next morning but still we have plans for the coming
day....that's Hope..


KEEP CONFIDENCE !
TRUST OTHERS !!
NEVER LOSE HOPE !!

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

नसतेस घरी तू जेंव्हा…

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो

पापड दाणे आणून
कबाबही मी करतो
चणाडाळीवरती कांदा
आणि लिंबू मारुनी ठेवतो

येतात टेग दाराशी
आणि घुसूनी जाती आत
खिडकशी टेकून कोणी
सिगरेट ओढण्या बसतो

त्या पार्टीत बडबडणारे
मज दिसती ते बालमित्र
त्यांच्याशीच मैत्री टिकावी
ह्यासाठीच पार्टी करतो

ना अजुनी संपली व्हिस्की
ना हवेत अजुनी गेलो
स्मीरनऑफची बाटली खुणावते
मी स्प्राइट आणायला जातो

तू सांग सखे मज आता
तू परत जशील केंव्हा?
मित्रांचे फोन येतात
आता परत पार्टी केंव्हा??

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो………

आई

गॉडस् गिफ्ट!

- शरद पवार

देव आपल्याला दिसत नाही... पण, त्याची अदृष्य शक्ती जाणवते! सामान्यांच्या दुनियेत जन्म घेऊन त्यांच्या


दु:खावर हळुवार फुंकर घालावी, अशी प्रार्थना आभाळातल्या देवाकडे करत असतानाच दैवी सूर उमटले...

ते होते गानकोकिळा लता मंगेशकर यांचे... त्यानंतर देवाच्या काठीचा आवाज ऐकायला आला... तो होता

मास्टर सुनील गावस्कर यांच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा! आणि मग साक्षात देवच दिसला... सचिनच्या रूपात!!

एका साध्या मध्यमवगीर्य कुटुंबात जन्मलेल्या या देवाची पाऊले कृष्णाच्या लिलेसारखी होती... नटखट आणि अवखळ! सचिन जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्यातील अद्भुत शक्तीचा साक्षात्कार होऊ लागला. त्याच्या खेळावर जीव ओवाळून टाकणारे करोडो चाहते आज जगभर पसरलेत. या साऱ्यांचा श्वासच सचिन आहे... गेल्या वीस वर्षांपासून!

..................


विश्वातल्या मान्यवर खेळाडूंचे सारे विक्रम मोडून सचिन जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज ठरला. क्रिकेटच्या दुनियेत त्याने नुकतेच गाठलेले यशाचे शिखर खरोखरच अलौकिक आहे. तमाम भारतीयांची मान गर्वाने उंच व्हावी अशा या लक्षणीय यशाला सलाम करताना सचिनचे अभिनंदन कसे करावे, त्यासाठी नेमके शब्द चटकन सुचत नाहीत. खरंतर मी स्वत: परमेश्वर मानत नाही, तरीही या क्षणी असे म्हणावेसे वाटते की तमाम भारतीयांसाठी सचिन 'गॉडस् गिफ्ट' ठरला आहे!

अर्थात त्याने हे यश मिळवले, ते कोणाच्या मेहेरबानीने नव्हे. लहानपणापासून अत्यंत कष्टाने मैदानावर जी मेहेनत त्याने केली, केवळ क्रिकेटवर सातत्याने लक्ष केंदीत केले, त्यामुळेच हा महान विक्रम तो करू शकला. मुंबई क्रिकेट क्लबचा अध्यक्ष या नात्याने सचिनची अनेक वैशिष्ट्ये जवळून पाहिली. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत! अफाट लोकप्रियता, जागतिक प्रतिष्ठा आणि क्रिकेटचे अनेक सन्मान मिळवल्यानंतरही यशाचा अहंकार त्याला कधी शिवला नाही. वांदे-कुर्ला परिसरात क्रिकेटचे एक नवे स्टेडियम अलिकडेच तयार झाले. सचिन मुंबईत असला की सकाळी तो या स्टेडियमवर दिसणारच. खेळाप्रमाणेच त्याची वेळही इतकी अचूक की स्टेडियमवर सचिनला पाहून सकाळी ९ वाजता आपले घड्याळ चेक करून घ्यावे. दररोज तासभरच्या सरावानंतर मोठेपणाचे सारे मान बाजूला ठेवून सचिन सामान्य मुंबईकरांप्रमाणे लहान खेळाडूंमधे मिसळतो. त्यांना मार्गदर्शन करतो. क्रिकेटवर सचिनची मन:पूर्वक भक्ती असल्याचा हा बोलका पुरावा आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष असताना प्रकर्षाने जाणवलेल्या आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारताबाहेर परदेशात जे सामने खेळले जायचे त्यात सचिन, राहुल दविड आणि अनिल कुंबळे हे तीन असे खेळाडू मी पाहिले की जे मैदानातल्या खेळाविषयी गंभीर असायचेच, याखेरीज त्यांच्या वर्तनात कमालीची शालिनता आणि विनम्रता जाणवायची. कोणत्याही प्रसंगाला अत्यंत सभ्यपणे सामोरे जातांना, भारतीय सुसंस्कृतपणाचे दर्शन या तिघांनी जगाला घडवले. क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिष्ठा वाढवणारे हे तिघेही माझ्या मते परदेशात देशाचे एका अर्थाने राजदूतच ठरले. विक्रमाचे जे शिखर सचिनने आज काबीज केले. त्यात खेळातले सातत्य, विनम्रता यांचा अर्थातच मोठा वाटा आहे. असे गुण जगात प्रत्येक खेळाडूत नसतात.

त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला...

- रमाकांत आचरेकर ,(सचिनचे गुरू व दोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक)

सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला बघता बघता वीस वर्षे झाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही... अजूनही तो शाळकरी सचिन मला आठवतो! कुरळ्या केसाचा, कमी उंचीचा. लाजराबुजरा! त्याचा मोठा भाऊ अजित त्याला माझ्याकडे घेऊन आला, तेव्हा एक क्रिकेटप्रेमी पालक आपल्या पाल्याला घेऊन आलाय, असं मला वाटलं. पण, पठ्ठ्याने हातात बॅट घेतल्यानंतर मी चक्रावूनच गेलो... क्रिकेटची देवदत्त देणगी घेऊनच तो जन्माला आलाय, असे स्पष्टपणे दिसले. त्याचा स्टान्स, बॅट पकडण्याची शैली, फ्रंटफूट, बॅकफूटवरचा सफाईदार वापर आणि सर्वात विशेष म्हणजे गोलंदाजांवर हुकुमत गाजवण्याची ताकद.

मला दुसरा अर्जुन सापडला होता : सचिन रमेश तेंडुलकर! कारण माझ्याकडे त्यावेळी आणखी एक अर्जुन होता. विनोद गणपत कांबळी!! विनोदची बॅटिंग भन्नाट होती... त्यालाही देवाने दोन्ही हाताने भरभरून दिले होते. विनोद सचिनपेक्षा खूप मोठा होईल, असे मला त्यावेळी वाटत होते. या डावखुऱ्या फलंदाजाची नजाकत, त्याची आक्रमकता भारी. सचिनपेक्षा एक पाऊल तो पुढे असायचा. पण... नंतर सचिन खूप मोठा मोठा होत असताना विनोदला ती गती राखता आली नाही. एका एकाचा नशिब असतं.

सचिनला बाद करण्यासाठी मी स्टम्पवर नेहमी एक रूपयांचं नाणं ठेवायचो. त्याचा बोल्ड काढणाऱ्याला गोलंदाजाला ते नाणं बक्षीस! पण, सराव संपेपर्यंत बोल्ड काढण्याची करामत कुठल्याच गोलंदाजाला करता यायची नाही आणि नाणं सचिन घेऊन जायचा. अशी असंख्य नाणी त्याच्याकडे जमा झाली असतील... आणि मुख्य म्हणजे आजही त्याने ती जपून ठेवलीत. त्याची सरावाची भूक कधी संपायचीच नाही. एकदा बॅट घेतली की तो तासनतास सराव करत राहायचा. शेवटी आम्हीच कंटाळायचो. त्याच्यातील गुणवत्ता पाहून मी त्याला एका दिवशी दोन, चार सामन्यात खेळवायचो. स्कुटरवर पाठीमागे त्याला बसवला की स्वारी खुश! मग त्याला आधीच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सरस खेळ करण्याचा उत्साह यायचा...

वांद्याहून शिवाजी पार्कला सराव व पुन्हा शाळा अशी छोट्या सचिनची धावपळ पाहून अजितला त्याची शाळा बदलण्यास सांगितली. मी शारदाश्रममध्ये असल्याने तो या शाळेत आला असता तर शाळेलाही आणि मला त्याच्यावर आणखी लक्ष करण्यास पुरेसा वेळ मिळाला असता... त्यांच्या घरच्यांनी मला छान प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कला काकांकडे राहायला आल्यानंतर तर तो क्रिकेटमय होऊन गेला... शाळेनंतर कीर्ती कॉलेजचाही मीच प्रशिक्षक असल्याने आमचं गुरू-शिष्याचं नातं आणखी गहिरं होत गेलं.

उण्यापुऱ्या पाच सहा वर्षात मला त्याचा लळा लागला. परदेश दौऱ्यावर जाताना तो माझा आशीर्वाद घ्यायला घरी येतो तेव्हा त्याचे जमिनीवर असलेले पाय पाहून मी थक्क होतो... एवढा मोठा माणूस होऊनही तो इतका नम्र कसा? असा प्रश्न मात्र मला पडत नाही. कारण ते तेंडुलकर घराण्याच्या संस्कारात आहे. म्हणूनच २० वर्षांनंतरही तो नवनवी शिखरे गाठत जातो तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटत नाही. सचिन तू आणखी बरीच वर्षे खेळत राहा... माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.

मोठा माणूस

- राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.

मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली.

पुरस्कारांपेक्षाही मोठा...

- राज ठाकरे
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.

सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.

सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.

सच्चा मित्र!

-अजित आगरकर, कसोटीपटू
आंतराष्ट्रीय कारकिदीर्ची वीस वर्षे... खरंच या पठ्ठ्याचे कौतुक करावं तितकं थोडंच. गेली अनेक वर्ष मी सचिनबरोबर खेळतोय, त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक यादगार खेळी तो खेळलाय. खरंतर मला आवडणारी त्याची एखादी खेळी सांगणं कठीणच! तरीही माझ्या डोळ्यासमोर येते ती शारजामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची वादळी खेळी. खरं, सांगू त्यावेळी मी संघात असूनही त्याचा खेळ पाहिला नव्हता. पॅव्हेलियनमध्ये बसून सचिन असाच खेळत राहो, अशी प्रार्थना करत होतो. आमचा फायनलमधील प्रवेश त्या सामन्यातील नेट रनरेटवर ठरणार होता. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढले होते. सचिनच्या अफलातून खेळीने संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नंतर हायलाईट्समध्ये तो सामना पाहताना सचिनची फलंदाजी मनसोक्त पाहिली. पाच षटकार, नऊ चौकारांसह त्याने १३१ चेंडूत १४३ धावा चोपून काढल्या होत्या. शारजातील त्या खेळीतील प्रत्येक फटका आजही डोळ्यासमोर येतो.

कटू प्रसंगांना तोंड देताना मित्र व संघसहकारी म्हणून सचिन सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मुंबई संघात पदार्पण केलं तेव्हा संजय मांजरेकर व सचिननेच प्रोत्साहन दिले. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. भारतीय संघात माझी निवड झाल्याची बातमी ऐकल्यावर खूप आनंद झाला होता, पण दडपणही आले. खूप अस्वस्थ होतो, चांगली कामगिरी होईल का, हेच विचार सतत मनात येत होते. त्यावेळी सचिनने एक मार्गदर्शक व मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून समजावले, अन् मनातली भिती कुठे पळून गेली ते कळलंच नाही.

कठीण प्रसंगात मित्र म्हणून त्याचा जसा पाठिंबा लाभला, तसंच त्याच्या असण्याने ड्रेसिंगरुमचे वातावरण खुलते. समोरचा माणूस दुखावणार नाही, हे लक्षात ठेवून तो छान गंमती-जमती करतो. ज्या खेळाडूंसह त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, असे त्याच्या पिढीतील फारसे खेळाडू आताच्या संघात नाहीत. नवे चेहरे संघात सामील झालेत. त्यामुळे सचिन मुंबईच्या ड्रेसिंगरुमध्ये असतो, तेव्हा ही सारी नवी पोरं र्नव्हस होतात, पण मनमोकळा स्वभाव व खिलाडूवृत्तीने सचिन ज्युनियर-सीनियर हे अंतर कधी कमी करतो, तेच कळत नाही. हा माणूस म्हणजे जणू सद्गुणांची खाणच! प्रत्येक खेळाडूचा एक आवडता फटका असतो सचिन मात्र प्रत्येक फटका लीलया खेळतो. कार, वॉचेस, म्युझिक त्याला प्रचंड आवडतं, सध्या आयपॉड वैगरेअसल्याने सीडीज, कॅसेट्स घेऊन जाण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत नाही.

गेल्या वीस वर्षांत सचिनच्या स्वभावात बदल झालेला नाही. माणुसकी तो जपतो. तो असाच अनेक वर्ष खेळत राहो, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ असाच सुरू राहो... सचिनला माझ्या मनापासून शुभेच्छा.

आजही नम्र, निरागस

- गौतम राजाध्यक्ष, फोटोग्राफर
सचिनचे फोटो पहिल्यांदा काढले ते षट्कार पाक्षिकासाठी. १९९३-९४ च्या सुमारास. सोबत संजय मांजरेकरही होता. तेव्हा कुरळ्या-कुरळ्या केसांचा अबोल, निरागस, गोड सचिन आणि धीट संजय या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामधला फरक ठळकपणे जाणवला. सचिन आजही तस्साच आहे. दरम्यानच्या काळात एका सोसायटी मॅगझिनसाठी, नंतर अजित तेंडुलकरने लिहिलेल्या 'असा घडला सचिन' पुस्तकाच्या कव्हरसाठी आणि तीन वर्षांपूवीर् माझ्या लेखासाठी त्याचे फोटो काढले. त्या प्रत्येकवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा कोवळा, निरागस भाव कायम होता. तो हसला की एक हजार वॉटचा बल्ब लावल्यासारखे वाटते. त्यामुळे एवढ्या वर्षांत उन्हात खेळून त्याच्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आलीही असेल, पण तो हसला की लहानगा सचिनच वाटतो. अजित त्याला फोटोसाठी घेऊन आला होता, तेव्हा त्याच्या सर्व सूचना सचिन निमूटपणे ऐकत होता. फोटोसाठी मी सांगेन तसे करण्याचा प्रयत्न करत होता. आजही तो तेवढाच आज्ञाधारक आहे. आजही कॅमेऱ्याला तो धीटपणे फेस करू शकत नाही, तो बावरतो. मी त्याला तसे सांगितल्यावर त्याने ते लगेच मान्य केले. जाहिराती, शुटींग ही माझी क्षेत्रे नाहीत, क्रिकेट हे माझे क्षेत्र आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे क्रिकेट हे त्याचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळेच तो एवढी मोठी मजल मारू शकला.

एखाद्या समारंभात तो आला की आवर्जून भेटतो, नमस्कार करतो, नम्रपणे बोलतो. मला त्याने कशाला एवढे महत्त्व द्यायचे? त्याने ओळख दाखवली नाही तरी त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. पण ग्रेट माणसांमध्ये इथेच फरक असतो. सचिनसारखी ग्रेट माणसे यशानंतर, अनुभवानंतर अधिक नम्र होत जातात.

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

सोळा हजारात देखणा...


ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे सामन्यातील १६ हजार धावांचा टप्पा गाठला. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग त्याचे अभिनंदन करताना.

आशीर्वाद बाबांचे...


सचिनला १९९९च्या वर्ल्ड कप सुरू असताना फार मोठी वैयक्तीक हानी झाली. या दरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. या सा-या दुःखातून तो सावरून परतला तर त्याने केनियाच्या विरुद्ध शतक झळकावले.

जीवाचा जीवलग


सचिनच्या हृदयाची चोरी केली ती गुजराती उद्योगपतीची डॉक्टर मुलगी अंजली मेहता हीने. १९९५ मध्ये त्यांचं शुभमंगल झालं. त्या सुखी दाम्पत्याला आता मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन अशी दोन मुलं आहेत.

' डॉन ' चा वारसदार


सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या ड्रिम टीममध्ये सचिन तेंडुलकर याला स्थान दिलं. ब्रॅडमन यांच्या टीममध्ये स्थान प्राप्त करणारा सचिन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. सचिनच्या खेळात मी स्वतःला पाहतो, असं ब्रॅडमन यांनी कबूल केलं होतं.