बुधवार, १३ ऑगस्ट, २००८

शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.

शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजिक येऊ लागल्यावर जनतेत घबराट उडाली. खेड्यापाड्यांतील लोक सैरावैरा पळू लागले. ही त्यांची केविलवाणी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी या तीन अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती , त्याचे हे प्रत्यंतर होते. ' मी शिवाजीच आहे. आम्ही मराठे आहोत. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही ' अशा आशयाचे धीराचे आश्वासन सैनिक देत होते. त्यामुळे घबराट थोडीबहुत कमी झाली.

या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायतखानला समजत होत्या. पण तो इतका गाफील होता की , त्याचा ' शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यांवर विश्वासच बसेना.

दुधन्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवर महाराज येऊन पोहोचले. त्यांनी आपला अधिकृत वकील (बहुदा वल्लभदास) खानाकडे पाठविला आणि ' मला एक कोटी रुपये खंडणी द्या. मी शहरात येतही नाही. येथूनच परत जाईन. तुमच्या शाहिस्तेखानानं गेली तीन वषेर् आमच्या मुलुखाची भयंकर लूट आणि नासाडी केली. बेअब्रुही केली. त्या नुकसानीच्या भरपाईखातर मला तुम्ही ही खंडणी द्या. ही खंडणी तुम्ही एकटेही देऊ शकाल. ( म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे. खाल्लेला!) पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे. त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा. ' या आशयाचा सविस्तर मजकूर महाराजांनी सुभेदाराला विदित केला. पण सुभेदाराने हेटाळणी करून हे आवाहन फेटाळून लावले.

मग मात्र महाराज चिडले. गाफील खान चिडला नाही. त्याने विनोदी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला. अन् सुरतेसकट तो या मराठी लाव्हारसात एक हजार मोगल सैन्यानिशी बुडाला. सुरतेच्या रक्षणांस म्हणजेच युद्धास त्याने उभे राहावयास हवे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजेच जॉर्ज ऑक्झींडेन याने स्वत: सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली. पण तरीही तो बेपर्वाच. उलट त्याने जॉर्जलाच म्हटले की , ' तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहाद्दूर समजले जाता. अन् तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुरटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता ?'

या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला. त्याला मुख्यत: आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती. हा शिवाजी जर आपल्या वखारीवर चालून आला तर ? राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारींची याच शिवाजीने (मार्च १६६० ) कशी धूळधाण उडविली ते त्याला माहित होते.

जॉर्ज ऑक्झींडेन आपल्या वखारीत परतला. त्याच्यापाशी काळे अन् गोरे नोकरलोक होते फक्त दोनशे. त्याने एक विलक्षण गोष्ट केली.या दोनशे लोकांच्या खांद्यावर बंदुका दिल्या. यात मजूर , कारकून आणि सैनिक होते. ते आता सर्वचजण सैनिक बनविले गेले. अन् जॉर्जने या दोनशे लोकांसह बँड वाजवित निशाणे घेऊन सुरत शहरात रूटमार्च काढला. जॉर्ज स्वत: त्यात होता. हे संचलन सुभेदाराने स्वत: आपल्या हवेलीतून पाहिले. सुभेदाराला ही केवळ थट्टा चेष्टा वाटली तो हसला.

हा पहिला दिवस. (दि. ६ जाने. १६६४ ) सुरतेबाहेर एक बाग होता. कालाबाग. त्यातील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी महाराज एका खुचीर्सारख्या बनविलेल्या उंचट आसनावर बसले. एवढ्यात एक गंमत घडली. सुरतेत धर्मप्रचाराचे काम करणारा , कॅप्युसिन ख्रिश्चन मिशनचा मिशनरी रे अॅम्ब्रॉस हा महाराजांस भेटावयास बुऱ्हाणपूर दरवाज्याबाहेरच्या कालाबागेत आला. परवानगी घेऊन तो समोर आला. त्याने महाराजांस नम्रतेने विनंती केली की , ' मी ख्रिश्चन मिशनरी आहे. आमचे एक चर्च , मठ आणि रोगग्रस्तांवर उपचार करण्याकरिता हॉस्पिटल आहे. आपले आणि औरंगजेब बादशाहांचे काही राजकीय भांडण आहे. आमचा त्यात काहीच संबंध नाही. तरी मी आपणांस विनंती करतो की , आपण निदान माझ्या गोरगरीब रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये. '

या आशयाच्या त्याच्या बोलण्यावर महाराज त्याला म्हणाले , ' कुणी सांगितलं तुम्हाला की , मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून! तुम्ही लोक गरिबांकरिता फार चांगले काम करता , हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही आधीपासूनच घेतली आहे. तुम्ही निर्धास्त असा.

' रे. अॅम्ब्रॉस परत गेला खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनांच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती.

मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज श्रीमंतांकडूनच फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यातही टक्केवारी होती। खंडणी घेतल्यावर , त्या त्या धनिकाला रसीद दिली जात होती.

सुभेदार इनायतखान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार सैन्यानिशी लपून बसला. त्याने सुरतेेचे धड रक्षणही केले नाही वा खंडणी देऊन शहर वाचविलेही नाही. बेजबाबदार.

सुरत शहराच्या बाहेर पण नजिकच एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराथी विधवाबाई राहत होती. तिचा पती धनिक होता. या बाईच्या घराला चुकूनमाकूनही कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाऱ्यावर पाठविले होते.

खंडण्या गोळा केल्या जात होत्या. पण जे त्या देण्याचे नाकारीत होते , त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकरचाकर कैद करून कालाबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले ' देणे ' मुकाट्याने देऊन टाकले होते. पण मग रूटमार्च काढणाऱ्या इंग्रजांचे काय ? जॉर्जने आपल्या वखारीच्या तटांवर तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते. त्यांचे युनियन जॅक वखारीवर फडकत होते. स्वत: जॉर्ज सुसज्ज होता. फक्त दोनशे लोक! हजार लोकांच्या निशी इनायतखान किल्ल्यात लपून बसला होता. दरवाजे बंद होते. किल्ल्याचे आणि विवेकाचेही.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.

महाराज माणसं माणिकमोत्यांप्रमाणेच निरखून पारखून घेत असत. त्यांत ते ९९ टक्के यशस्वीही ठरले. पण तरीही दक्षता घ्यायची ती घेतच असत. सिंहगडाला जसवंतसिंहाचा वेढा पडण्यापूर्वी का कोण जाणे , पण सिंहगडावरती फितवा फितुरीचा संशय शिवाजीमहाराजांच्या मनांत डोकावला. त्यावेळी महाराज स्वत: सिंहगडावर जाऊन आले. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी गडाची तबियत तपासली. अन् त्यांच्या लक्षात आलं की , गडाची तबियत एकदम खणखणीत आहे. नंतर गडाची ही निरोगी तबियत प्रत्ययासही आली. एप्रिल प्रारंभ ते २८ मे ६४ पर्यंत मोगली राजपूत सरदार जसवंतसिंह राठोड सिंहगड घेण्यासाठी गडाला १ 3 महिने धडका देत होता. गड अभेद्यच राहिला. झेंडा फडकतच राहिला. सिंहांना मात्र टेंगळे आली.

स्वराज्याचा हा बिकट डाव खेळत असताना प्रामाणिक निष्ठावंत आणि कष्टाळू अशा प्रजेने आणि सेनेने महाराजांना जी साथ केली , त्याला तोड नाही. प्रजेनंही साथ दिली याला पुरावा काय ? शाहिस्तेखानच्या आणि नंतर मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यावरील चाललेल्या अतिरेकी आक्रमणांच्या काळात मावळातील प्रजा सर्व सोसून , शरणागतीचा विचारही मनात न आणता लोहस्तंभासारखी उभी राहिली. प्रजा म्हणजेच जनता , अशी उभी राहिली तरच शिवाजी महाराज , विन्स्टन चचिर्ल , अन् हो चिमिन्ह हे यशस्वी होत असतात.

महाराज शत्रूला विचार करायलाही अवधि देत नव्हते. शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला. संपला. या काळात महाराजांचे हेर , बहिजीर् नाईक , त्याच्याबरोबर बहुदा वल्लभदास अन् सुंदरजी परभुजी गुप्त रूपानं सुरतेच्या टेहळणीस महाराजांनी रवानाही केले. या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली. कोण कोण लक्षाधीश आणि कोट्याधीश आहेत हे तर टिपून पाहिलेच. पण सुरतेची लष्करी आणि आरमारी परिस्थिती त्यांनी बरोबर न्याहाळली. सुरत सुस्त होती. सुभेदार होता इनायतखान. पैसे खाण्यात पटाईत. पैसे खाण्याची त्याची ' मेथड ' आज आपल्याला नवीन वाटणार नाही. आपण अनुभवी आहोत. बादशाहाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याची संरक्षक संख्या तो ' कॅटलॉग ' वर दाखवित होता. पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार सैन्य त्याच्यापाशी होते. बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटात गुडूप होता. आता ही गोष्ट बहिजीर्सारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल काय ? मराठ्यांच्या हितासाठी अशी चतुराई करून इनायतखानसाहेब मराठी स्वराज्याचीच केवढी सेवा करीत होते , नाही!

शिवाजी महाराज आपल्यापासून काहीशे फर्सुख (आठ मैल म्हणजे एक फर्सुख) लांब आहे. तो इकडं कशाला येईल ? आपण अगदी निर्धास्तपणे पैसे खातखात बादशाहचं राज्य सांभाळीत बसायला हरकत नाही. असा अतिव्यवहार्य विचार करून खान सुभेदारीच्या लोडाला टेकलेला होता. सुरतेतील एकूण संपत्तीचा आणि शांत स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हेर राजगडाला परतलेही होते. आता महाराज सुरतेच्या स्वारीवर सुखरूप कसं जायचं अन् डबोलं घेऊन सुखरूप कसं यायचं याचाही तपशील ठरवित होते. त्रास न होता हे साधायचं होतं. वाटेत कुठे कुठे अडचणी आणि शत्रूचा अडसर येऊ शकेल , शक्यतोवर असाच मार्ग ठरविणे आवश्यक होते. शांततेच्या मार्गाने सर्व काही साध्य करायचे अशी नाहीतरी आमची भारतीय परंपरा आहेच.

राजगड- त्र्यंबकेश्वर-जव्हार-गणदेवी-उधना ते सुरत असा हा सामान्यत: मार्ग होता. साधारणपणे हा मार्ग सह्यादीच्या घाटवाटांतून आणि जंगलातून जाणारा आहे. सुमारे पाच हजार घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे पाच हजार घोडे महाराजांचे बरोबर निघाले. महाराज सुरत काबीज करायला निघालेले नव्हते. शक्यतो रक्तपात न करताच खंडणी मिळविण्यासाठी ते जात होते. वाटेत जव्हारचा राजा आडवा येतो की काय अशी नक्कीच धास्ती होती. त्याशिवाय लष्करी धास्ती शेवटपर्यंत कुठेच नव्हती. महाराजांनी जी ' पुढची ' दक्षता घेतली होती ती विचार करण्यासारखी आहे. सुरत तापी नदीच्या खाडीवर आहे. सुरतेच्या उत्तरेस , ईशान्येस आणि पूवेर्स महाराजांनी आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या सुरतेपासून काही किलोमीटर अंतरावरती ठेवलेल्या स्पष्ट दिसतात. या स्वारांना छबिन्याचे म्हणजेच गस्तीचे स्वार म्हणतात. सुरतेतील आपला कार्यभाग पूर्ण होईपर्यंत उत्तर आणि पूर्व बाजूंनी मोगलांचे कोणी सरदार आपल्यावर चालून येऊ नयेत अशी रास्त अपेक्षा त्यांची होती. पण समजा अहमदाबाद , पाटण , पावागड , सोनगट वा बुऱ्हाणपूर येथे मोगली ठाणी होती. त्या ठाणेदारांनी आपल्याला विरोध करण्यासाठी चाल केली तर ? त्या संभाव्य मोगली हल्ल्यांची वार्ता आपल्याला खूप आधीच अचूक कळावी ही योजना महाराजांनी केलेली होती.

अन् तसेच घडले. महाराज त्र्यंबकेश्वरहून दि. १ जानेवारी १६६४ रोजी जव्हारपाशी सिरपांव येथे पोहोचले. सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबात विरोध केला नाही. महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी पाच जाने. १६६४ रोजी म्हणजे सुरतेपासून अवघ्या १० कि. मी. वर पोहोचले.

सुरतेचा सुभेदार इनायतखान पूर्ण गाफील होता. जगाचा नियमच आहे , गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है। सुरत बंदर हे मोगल साम्राज्याचं आथिर्क वर्म होतं. सुरतेत येणाऱ्या मालावर बादशाहला प्रचंड जकातीचे उत्पन्न मिळत असे. सुरत ही जागतिक कीतीर्ची बाजारपेठ होती. येथील जकातीचे उत्पन्न जहाँआरा बेगम ( औरंगजेबाची बहीण) हिला मिळत असे. म्हणजे आता महाराजांनी मोगलांच्या नाकावरच नेम धरला होता.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे 'गुप्त' योगदान!

शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हे ऑपरेशन लाल महाल इतके प्रभावी , चमत्कृतीपूर्ण , धाडसी आणि अद्भूत घडले की , साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला. सव्वा लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मूठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. ' शिवाजीराजा ' म्हणजे , महंमद घोरीपासून (१२ वं शतक) ते थेट औरंगजेबापर्यंत (१७ वं शतक) झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता. या सुलतानांपुढे ठाकलेलं ते आव्हान होतं. हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती. त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय् साधुनाम् त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं.

लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली. तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही. पण अनेकजण विशेषत: शाही कुटुंबातली माणसं अन् विशेषत: औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की , सीवाने ही मुलगी पळवून नेली.

हे सर्वस्वी असत्य होतं. पुरावा तर अजिबातच नव्हता. एक गोष्ट लक्षात येते की , स्वत: औरंगजेबाने असा आरोप शिवाजीराजांवर कधीही केलेला , नंतरसुद्धा सापडत नाही. जहाँआराच्या पत्रांत मात्र ती हा आरोप अनेकदा करते. जाणूनबुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांना दिव्यदृष्टी देणारा ' प्रॉफेट ' अजून जन्माला आलेला नाही.

शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६ 3 एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही. पण या मोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच , खूपच कमी होते.

या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला. आत्ताच सांगून टाकतो की , हा वेढा एप्रिल ६ 3 पासून २८ मे १६६४ पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला. याच काळात (दि. ५ ते १० जानेवारी १६६४ ) महाराजांचा सुरतेवर छापा पडला. हे मी आत्ताच का सांगतोय ? सुरतेवरच्या छाप्याकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या सिंहगडला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे ५ कि. मी. अंतरावरून गेले. या गोष्टीचा , वेढा घालणाऱ्या या दोन राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. याचा अर्थ असाच घ्यायचा का की , सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन् त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते.

मोगलांचे हेरखाने ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का! इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा. पुणे ते नैऋत्येला 3 ० कि. मी.वर सिंहगड आहे. सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच २० कि. मी.वर राजगड आहे. महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमअंगाने , लोणावळा , कसारा घाट , दूगतपुरी , त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दि. 3 १ डिसेंबर १६६ 3 या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच. राजगड ते सूरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी 3 २५ कि. मी. आहे. म्हणजे नकाशात असे दिसेल की , सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे दोनशे कि. मी. मोगली अमलाखालील मुलूखांत घुसले. पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ता नाही.

हे मी सांगतो आहे , यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना ? अगदी सरळ गोष्ट आहे की , कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत , त्या कोणाच्या भरवशावर ? हेरांच्या भरवशावर। हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही. मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो , पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावे लागले. पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला , दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला. हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का ? पण यश आले नाही.

आमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे. अज्ञातात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचे वाचन , मनन आणि अनुकरणही आम्ही केले पाहिजे. असं केल्यानं काय होईल ? आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणे ठरेल!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.

सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते. अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो. शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते. भव्यदिव्य , उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता. पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला , ' महाराज , आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे , किल्ले , बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली. आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे ? आपण कुठे थांबणार आहोत ?

' या आशयाचा प्रश्ान् रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा , ' राहुजी , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलुख आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे. '

म्हणजे अवघा भारत मुक्त करावा , त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे , असा महाराजांचा मनोसंकल्प होता. शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण कधी विचारात घेतो का ? हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिक दप्तरखान्यातील एका पोर्तुगीज पत्रात डॉ. पांडुरंग पिसुलेर्कर यांच्या अभ्यासात आला. मला स्वत: डॉ. पिसुलेर्करांनीच हा सांगितला. अन् म्हणाले , ' शिवाजीराजाचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे.

' अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसणारे शिवचरित्र सूचक उपनिषदांसारखे आहे। आम्हाला त्यावर भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे. पुढे राजस्थानात रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता. वास्तविक तो महाराष्ट्रापासून त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस. पण दष्टा प्रतिभावंत. त्याने छत्रपती शिवाजीराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे. तो म्हणतो , हा शिवाजीराजा कसा ?

' दिल्लींदपदलिप्सव :'

म्हणजे हा शिवाजीराजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा ' आहे. उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही. ते सदैव जागे आणि सक्रिय असतात. महाराज तसेच होते.

असो. आता पुन्हा एकदा शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण डोकावू. शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६ 3. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६ 3 या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ' तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ' त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.

आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला.

याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ' बडफुकन ' या शब्दाचा अर्थ ' बडा सेनापती ' मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ' शाहिस्तेखानकी बुरंजी ' या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.

' अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?

शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती , याचे हे उदाहरण आहे.

आज मात्र या आसामातील जनतेला , किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितच नाही. पण रागावयाचे कशाकरिता आपण ? आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे ? पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का ? अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत ?

मित्रांनो , मी एक लहानसा प्रयत्न केला। ओरिसा म्हणजे उडिया. आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश. उडिया भाषेत शिवचरित्र मी चार वर्षांपूवीर् प्रसिद्ध केले. कटक येथे प्रकाशान झाले. गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीत. अधिक काय लिहावे ?

शाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लछितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांची आठवण करून दिली.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा........

ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र. लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली. खान वाचला. सिंहगडकडे सुखरुपपणे पसार झालेल्या शिवाजीमहाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान , म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे , तर इराण , तुर्काण इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमीकावा रणवाद्यांसारखा दणाणला असता.

गनिमी कावा हे मराठ्यांचे खास खास युद्धतंत्र आहे. या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजे चीनचा माओत्सेतुंग आणि व्हिएटनामचा होचिमिन. ते सत्यही आहे. पण आपण माओ आणि मिन यांनी स्वत: वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्याचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा तैलनिक अभ्यास जरुर करून पाहावा.

लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय ? फक्त घाबरट. दहशत. भाबड्या कल्पनांची विनोदी कारंजी. याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपीय डॉक्टर्स राहत होते. डॉ. थिवेनो आणि डॉ. सिडने ओवेन. या दोघांनी या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलं आहे. ' या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की , शिवाजी हा नक्की चेटूकवाला असावा असे लोकांना वाटते. त्याला पंख असावेत. त्याला गुप्त होता येत असावे ' म्हणजे केवळ अफवा , कंड्या आणि अतिशयोक्ती.

हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हतं. आज आपण तो केला पाहिजे.

लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तर आमच्या हातून पुन्हा ' कारगिल ' सारख्या चुका होणार नाहीत. ' तेजपूर ' सारखा गाफिलपणा होणार नाही. आणि आमच्या संसदेवरच म्हणजे आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा टाकणार नाहीत. पाहा पटते का ?

शाहिस्तेखान मात्र कायमचा दु:खी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजीमहाराजांची. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना!

खानाच्या बाबतीत आणखी काही दु:खी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहिशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजले नाही. पुढच्या काळात (म्हणजे इ. १६९५ ) प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे याचे हातून याच शाहिस्तेखानचा एक मुलगा , हिम्मतखान हा तमीळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता. पण या साऱ्या दु:खांची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली.

त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ताखान पेठ असे नाव पडले होते.

प्रचंड सैन्य , खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही. चाकण जिंकले. त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले. मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला. पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्याएवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले , तर समजू शकते. कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते. पण केवळ खुचीर्वर बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालविले तर ते त्याचेही आणि कार्याचेही अफाट नुकसान असते.

अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थांत आणि मुख्यत: शासकीय नोकरशाहीत पाहतो. अशा माणसांच्या कारभारातून ' मेरा भारत महान ' जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय ? सर्वच क्षेत्रांत आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे! घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो. त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात. अब्जावधी रुपयांची नासाडी करून , लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत. आपल्याला तातडीने गरज आहे. संताजी घोरपड्यांची , हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची. रागावू नका. हा मी उपदेश करत नाही. आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारखा ऐंशीवं ओलांडलेला नागरिक अपेक्षा करतो आहे. आकांक्षा ठेवतो आहे. त्या पूर्ण व्हाव्यात , त्यापुढती गगन ठेंगणे , माझ्या तरुण मित्रांनो!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.

मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असलेला लाल महाल आणि स्वाभाविकरित्या झोपेचीच पेंग येत असलेले पहारेकरी एकदम हल्ला झाल्यानंतर गोंधळून जावेत , त्यांनी केवळ आरडोओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावे हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती. केवळ ' केऑस ' काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे ,
तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे , कणेर् , तुताऱ्या , ताशे , मफेर् इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता. तो अगदी तसाच घडला. काही मावळे नगारखान्यात घुसले. त्यांनी त्या झोपलेल्या वादकांना कसे उठविले असेल याचा तर्क करता येतो. भूतपिशाच्चे जणू अचानक आपल्याला झोडपताहेत असेच त्या वादकांना वाटले असेल.
अर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्ये मराठ्यांच्या दमदाटीवरून जोरजोरात वाजवावयास लागली. काय घडतंय ते त्या वादकांना कळेचना. ते फक्त वाजवीत होते. कारण पाठिशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यासारखे उभे होते. लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगारखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण कल्पक होता. अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत अन् किंकाळ्या फोडीत होता. त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकरच होता.
सर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक हल्ल्याने ( सरप्राईजअॅटॅक) किती गोंधळ उडाला असेल याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घाबरून उठलेला शाहिस्तेखान स्वत: माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला. पण शस्त्र कोणचे होते ? धनुष्यबाण! अशावेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल काय ? तलवार , पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करावयास धावेल ना ? पण खान धनुष्यबाण घेऊन धावला. काय उपयोग ?
त्याचा मुलगा अबुल फतेखान हा जर त्याचवेळी अचानक आडवा आला नसता , तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता. पण पोरामुळे बाप वाचला. इथं या अबुल फतेखन पुत्राचं खरोखर कौतुकच वाटते. बापासाठी त्याने आपला प्राण खचीर् घातला.
खान मात्र आल्याजिन्याने धावत होता. महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते. माडीवरती खानाच्या दालनाला लागून ( बहुदा) दक्षिणोत्तर असा एक मोठा दरुणी महाल होता. त्या मोठ्या दिवाणखाण्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या. त्या जाग्या होऊन मोठमोठ्याने ओरडत , किंकाळत होत्या. तिथे एकदोन जमिनीवरची शमादाने होती. त्याचा प्रकाश कितीसा असणार ? काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता. फक्त घबराट उडाली होती.
खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. पुसटत्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला. तेथे एक मोठा जाडसर पडदा (बाड) होता. खानाने घाईत तो हाताने उडवला. तो आत शिरला. महाराजांनी त्या बाडावर आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला. पडदा फाटला गेला.
खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. काहीतरी भयंकराहूनही भयंकर घडतंय या जाणिवेने त्या त्याहून भयंकर घाबरल्या. केवळ कल्लोळ! पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते. खान घाबरून एका खिडकीबाहेर घाईघाईत चढून खाली दबला. हा सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन केलेला अंदाज आहे. महाराजांना वाटले खान येथेच आहे. म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वमीर् लागून खान मेला. अन् महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले.
संपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता.
महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे , उजव्या हाताची तलवारीखाली तुटली.
आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले. लाल महालाबाहेर या साऱ्या कल्लोळाने खडबडून उठलेले छावणीतील खूप मोगली सैनिक जमा झाले होते. त्यांना काहीच बोध होत नव्हता.
खूप मोठा तपशील उपलब्ध असलेले हे ' ऑपरेशन लाल महाल ' असे घडले. हा थोडक्यात अहवाल. मुख्य आहे तो निष्कर्ष. केवळ लष्करी सैनिकांनी आणि सेनाधिकाऱ्यांनीच या ऑपरेशनचा विचार करावा. चिंतन , मनन करावे , असे नाही. योजनाबद्ध काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विषयांतील प्रत्येक कार्यर्कत्याने या इतिहासाचा सूक्ष्मविचार करावा. वर्तमानकाळात याचा कल्पक योजना म्हणून उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही ? ' मॅनेजमेंट ' आणि प्रचंड प्रकल्प हाताळणाऱ्यांनी या लष्करी कथेचा अभ्यास करून पाहावा. त्यातून प्रेरणा , योजना आणि शेवटी यश काबीज करता येईल. पाहा पटते का ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.

राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि। ५ एप्रिल १६६ 3, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजचे घाटात आले. कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा-चौदा किलोमीटरवर आहे. महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या. सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले.

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती अशी. शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते. मोगलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्तीकरता छावणीच्या दक्षिणअंगास रात्रीची फिरती ठेवली होती. हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते. या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे. पण पुढेपुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते. हे गस्तवाले साधारणत: मध्यरात्री दिडदोन वाजपर्यंतच गस्त घालीत. नंतर हळूच छावणीत परतून येत. ही गोष्टी महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली. महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला.

गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते. महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली. हे बिलंदर सैनिक , जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले. चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ' आम्ही रोजचेच गस्त घालणारे. आम्हाला ओळखलं नाही ? गस्तीहून परत आलो! ' असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले. चौकीदारांना वाटलं की होय , ही रोजचीच गस्तीची मंडळी. परत आली आहेत. चौकीदारांची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूवेर्च्या बाजूस पोहोचले. येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता. उंच भिंत होती. त्या भिंतीत जाण्यायेण्याचा एक दरवाजा होता. पण खानानं तो दगडामातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता.

या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली. माणूस आत जाईल एवढं भगदाड. हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते. भगदाड हळूहळू पुरेसे पडले. महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले. अर्थात सभोवती सामसूमच होती.

ज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इथपर्यंत आले , त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले. महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता. खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते. या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला.

इथे महाराजांचा एक अंदाज चुकला. भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते. तेथे काही पाण्याचे बांधीव हौद होते. लाल महालाची ही पूवेर्कडील बाजू होती. या बाजूने लाल महालातून परसांगणात यावयास दोन दारे होती. दोहीत अंतर होते. यातील एक दार असेच दगडामातीने चिणून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा , तयार केली होती. तेथील आचारी पाणके इत्यादी सुमारे तेरा-चौदा नोकर तेथेच मुदपाकखान्यात रात्री झोपत असत. ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत. हे नोकरचाकर अजून उठलेले नसावेत , असा महाराजांचा अंदाज होता. पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते. आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले. आता ? आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता ? आता फक्त एकच करणं शक्य होतं. एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी गुपचूप घुसायचं अन् साऱ्या नोकरांना कापून काढायचं. निरुपाय होता. हे करणं भाग होतं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर् सर् सर् सर् जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं.

चिणलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले. मिणमिणत्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं. मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला. आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला. तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला. त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचा एक मुलगा , अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता. तो खडबडून बाहेर आला. अंगणात , आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला. खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.

महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी , सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात. पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारे गुप्तहेरच होते. मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे , कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे. अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड , मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.

आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या , कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग , मुदपाकखाना , पुरुषांच्या खोल्या इतर खोल्या , त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला , तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल , तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे.

हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी ' देवाणघेवाण ' करू लागला , तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष , बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली. पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या. महाराजांनी त्याला जरब दाखविलीच.

आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे कवितेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ' कमांडोज ' नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे. महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते. पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. ' ऑपरेशन लाल महाल ' असेच या छाप्याला नाव देता येईल. ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच. मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की , आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते! रामनवमी.

याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला ? आला ना! मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार. छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडर््याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते.

छाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे , कुठेकुठे , कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की , या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ' रिहर्सल ' केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की , असे घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते. आपण तपशील पाहूच.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.

गेल्या चार वर्षांत (इ. स. १६५९ ते ६२ ) असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं , महाराजांच्या योजने आणि आसेप्रमाणे कर्तबगारीची शर्थ केली होती. त्यातील कित्येकजण रणांगणावर ठार झाले होते. जिवा महाला सकपाळ , रामाजी पांगेरे , शिवा काशीद , मायनाक भंडारी , बाजीप्रभू , कावजी मल्हार , बाजी पासलकर , वाघोजी तुपे , बाजी घोलप , अज्ञानदास शाहीर , कान्होजी जेधे आता किती जणांची नावं सांगू ? या स्वराज्यनिष्ठांच्या आणि कर्तबगारांच्या रांगाच्यारांगा महाराजांच्या पाठिशी उभ्या होत्या. त्यामुळेच स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं. कुणाचं नाव विसरलं तरी स्वर्गातून माझ्यावर कुणी रागावणार नाही.

पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते. होते त्यांनाही अन् जे गेले त्यांनाही. शाहिस्तेखानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची (म्हणजे पराभवाची) तयारी केली. त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहजगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठविली. तीही मार खाऊन परतली. आपल्या लक्षात आलंय ना ? की , शाहिस्तेखान एका चाकणच्या मोहिमेशिवाय कुठल्याही मोहिमेवर स्वत: गेला नाही. अन् प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वत: भाग घेताहेत.

इ. स. १६६३ साल उजाडलं. शाहिस्तेखानानं स्वत: जातीने एक प्रचंड मोहिम योजिली. कोणती ? स्वत:च्या मुलीच्या लग्नाची! खरंच! आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचं लग्न ठरविलं. लग्न अर्थात पुण्यात , लष्करी छावणीत होणार होतं. लाल महालाचं मंगल कार्यालय झालं होतं. मुलाच्या आईचं नाव होतं. दहरआरा बेगम. ही अर्थात खानाची बहीणच. तिच्या नवऱ्याचं नाव जाफरखान. हा यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता. तो या लग्नासाठी पुण्यास येणार होता. आला ही. प्रचंड लवाजमा. प्रचंड थाटमाट. वेगवेगळ्या लग्नीय समारंभांची रेलचेल. खाणंपिणं. सगळी छावणी लग्नात मग्न. शाहिस्तेखानाची केवढी ही टोलेजंग लग्नमोहिम!

अन् समोर दक्षिणेकडे अवघ्या पन्नास किलोमीटरवर एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटीत होता ; त्याचं नाव शिवाजीराजा.

शाहिस्तेखानाचं हे काय चाललं होतं ? तो शिवाजीराजासारख्या महाभयंकर कर्दनकाळावर मोहिम काढून आला होता की , आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता ? या खानाला विवेकशून्य , बेजबाबदार आणि चंगळबाज म्हणू नये तर काय म्हणावं ? त्याला शिवाजीराजा समजलाच नाही। त्याला गनिमी कावा उमजलाच नाही. त्याला इथला भूगोल कळलाच नाही. आता या मोगली चैनी पुढे बेचैन शिवाजीराजांचा आपण अभ्यास करावा. वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणशिवाय शाहिस्तेखानानं काय मिळविलं ? काहीही नाही. हा तीन वर्षाचा हिशोब. अन् आता मुलीचं अफाट खर्चानं लग्न. पुढं काय झालं ते मी सांगतोच. पण आपल्याला ते आधीच माहितीच आहे की! शाहिस्तेखानाची प्रचंड फटफजिती.

एक मात्र सांगितलं पाहिजे. खानानं स्वराज्याचं , त्याने कब्जात घेतलेल्या भागाचं फार नुकसान केलं. लूटमार , स्त्रियांची बेअब्रू , मंदिरांची नासधूस , खेड्यापाड्यांचा विध्वंस. मात्र आश्चर्य वाटतं की , पुण्यात तो जिथं राहत होता त्या लालमहाल वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबागणपती मंदिराला त्यानं उपदव दिला नाही. आळंदी , चिंचवड , देहू , थेऊर इत्यादी देवस्थानांनाही त्याने त्रास दिल्याची एकही नोंद सापडलेली नाही.

शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव. तो औरंगजेबाचा मामा होता. ' शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेब बादशाहची दुसरी प्रतिमाच ' असं त्याचं वर्णन एका मराठी बखरीत आले आहे. पण औरंगजेबातला एकही सद्गुण या मामात दिसत नाही.

खानाकडचा लग्नसोहळा प्रचंड थाटामाटात दोनतीन आठवडे चालू होता। या संपूर्ण छावणीच्या अवस्थेची माहिती महाराजांना राजगडावर समजत होती. त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा. उत्पटांग डाव ते खानावर टाकू पाहात होते. याचवेळी त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकीलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवावयाचे ठरविले. पाठविलेही. पण खानाने सोनो विश्वनाथांची भेट घ्यावयाचेच नाकारले. टाळले. या बिलंदर शिवाजीराजाच्या कलंदर वकिलांशी भेटायलाच नको. पूवीर् अफझलखान , सिद्दी जौहर , कारतलबखान यांची या मराठी वकिलांनी कशी दाणादाण उडविली हे त्याला नक्कीच माहिती होतं. तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून असेल पण त्याने भेट नाकारली. म्हणजे परीक्षेला बसायलाच नको म्हणजे मग नापास होण्याची अजिबात भीती नसते.

सोनो विश्वनाथ राजगडास परत आले. काही घडलेच नाही त्यामुळेच या महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला होत नाही.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.

दारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे. त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा. ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये.

अन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे. शिवाजीराजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली. हौस निर्माण केली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ' हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे ' ' राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. ' एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की , ' अशुद्ध अन्न सेवो नये ' अशुद्ध अन्न म्हणजे ? अयोग्य , पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमाने मिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा! शिवाजीराजांसारखा विरक्त , उपभोगशून्य छत्रपती. चक्रवतीर्. जिजाऊसाहेबांच्यासारखी ' कादंबिनीव जगजीवनदान हेतू: ' असलेली आई , राजमाता. नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली. या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उधळपट्टी केल्याची एकही नोंद , उल्लेख गवसत नाही.

कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे. धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ' मृत्तिकेसमान ' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम. या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते. मठ करून ताठा करणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ' इस्टेटी ' निर्माण करणारे नव्हते. म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती. याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते. स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं. पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं. माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता.

इ. स. १६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले. प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते. अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते. त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव. पण याच साऱ्या घाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक. याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता. या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले या शाहीराचेही. जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खचीर् पडले त्यांच्या बायकापोरांना ' अडीचसेरी ' म्हणजे पेन्शन दिले. कोणालाही उणे पडू दिले नाही.

आज आपणही पाहतो ना! आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना , लोकसेवकांना , कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात. अशोकचक्र , परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात. महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं नेहमीच.

अशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण , पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं. ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले. मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की , जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं. नामदारखान आपल्या पूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला. सारी मोगली मोहिम साफ फसली. ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली. नक्की तारीख सापडत नाही. या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते. महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे ? महाराजांना विश्रांती सोसत नव्हती. त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही. स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली ?

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.

संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जिंकलं. जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळच आली नाही. तेथील शाही जाहगिरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला. त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले.

गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक प्रचंड डोंगरी किल्ला होता. त्याचं नाव प्रचीतगड. गडावर आदिलशाही सत्ता होती. तानाजी मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला. केवढं नवल! सहा सहा महिने लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक दिवसभरही झुंजवता आले नाहीत. मराठ्यांनी गड घेतला. झेंडा लागला. महाराजांना विजयाची वार्ता गेली. ते पालखीतून प्रचीतगडावर निघाले. बरोबर थोडं मावळी सैन्य होतं. महाराज गडावर पालखीतून येत आहेत हे पाहून गड जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला. आपला विजय बघण्यासाठी खास महाराजस्वारी जातीनं येत आहे हा खरोखर दुमिर्ळ योग होता. तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून आल्यासारखं झालं. गडावरचे लोक गर्जत होते ; वाद्य वाजत होते. महाराज गडावर आले.

दरवाज्यातून आत प्रवेशले. मावळ्यांना आनंदाचं उधाण आलं होतं. जणू इथूनच महाराजांची पालखीमधून त्यांनी मिरवणूक सुरू केली. महाराज लोकांचे स्वागत हसतमुखाने स्वीकारीत पालखीत बसले होते. यावेळी वारा सुटला होता. भळाळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडपं हेलावत होती. महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत होता. नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता. तो वाऱ्याने उडत होता. मिरवणूक चालली होती. एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला. शेला खेचला गेला. ते पाहू लागले. भोई थांबले. काय झालं तरी काय ? पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं गेलं होतं. बोरीला काटे असतात. शेला अटकला. महाराज बघत होते. त्यांना गंमत वाटली.

मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले. शेला निघाला. पण महाराज हसून सहज गंमतीने म्हणाले , ' या बोरीनं मजला थांबविले. येथे खणा ' मावळ्यांनी पहारी , फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली. केवळ गंमत म्हणून महाराज बोलले. सगळ्यांचाच उत्साह दांडगा. अन् खणताखणता पहारी लगेच अडखळल्या. माती दूर केली. बघतात तो सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन मिळाले. ते धन कुठे गेले ? महाराजांच्या घरी ? ' कमिशन ' म्हणून काही ' हप्ते ' कोणाकोणाला मिळाले का ?

नाही , नाही , नाही! हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले.

इथे एक गोष्ट लक्षात येते. महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर , कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे असं प्रचीतगडावर. हे धन स्वराज्याचं. म्हणजेच रयतेचं. म्हणजेच देवाचं.

पूवीर् महाराजांच्या आजोबांना , म्हणजे मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या शेतातच भूमीगत धन मिळालं. ते मालोजींनी श्रीधृष्णेश्वराचे मंदिर , शिखर शिंगणापूरचा तलाव , एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलं. आपल्या आजोबांचा हा वारसा महाराजांनी आजही सांभाळला. योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं धन मालोजीराजांनी आणि आता शिवाजीराजांनी जनताजनार्दनाच्या पायांपाशी ' श्रीकृष्णार्पणमस्तु ' म्हणत खजिन्यात जमा केलं. देवाचं दान आण जनतेचं धन असेच वापरावयाचे असते. त्याचा अपहार करणे हे महत्पाप.

एक गोष्ट सांगू का ? महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज कधीही नव्हते. किंवा खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी अवस्थाही कधी निर्माण झाली नाही. याचे एक कारण समजले ना ? अपहार , भ्रष्टाचार , पिळवणूक , लुबाडणूक हे शब्दच स्वराज्यात असता कामा नये हा आदर्श महाराजांनी घालून दिला. स्वराज्याचा खजिना नेहमीच शिलकीचा होता.

जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की ,

' जीहुनिया धन उत्तम वेव्हारे

उदासविचारे वेंच करी '

चांगल्या मार्गाने , खूप धन मिळवा आणि उदार मनाने खर्चही करा , हा महराजांचा आदेश होता आणि आहे.

प्रचीतगडची ही तानाजीची मोहिम इ. १६६१ च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली.


-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.

महाराजांनी या कोकण दौऱ्यात चिपळूणजवळ श्रीपरशुरामाचे दर्शन घेतले। मुक्काम केला. पूजाअर्चा झाल्या. विपुल दानधर्म केला. याच श्रीपरशुरामावर यापूर्वी हाबश्यांचे हल्ले होत होते. आता हे स्थान निर्धास्त झाले. (मार्च अखेर १६६१ ) अधूनमधून महाराज अशा धर्मकार्यात उपस्थित राहून आनंद लुटीत. पण ते उत्सवबाज नव्हते. यानंतर पाचच महिन्यांनी महाराजांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीची स्थापना केली. हा स्थापनेचा कार्यक्रम मोरोपंत पिंगळे यांच्याहस्ते झाला.

देऊळ छोटे , साधे पण रेखीव केले. श्रीभवानीच्या पूजाअचेर्ची छान पण साधीसुधी व्यवस्था त्यांनी लावून दिली. या श्रीस्थापनेच्या कार्यक्रमाला महाराज स्वत: उपस्थित नसावेत की काय अशी शंका येते. कारण त्या तपशीलांत तसा उल्लेख नाही. ' मी उपस्थित असल्याशिवाय हा उद्घाटनाचा कार्यक्रम करू नये ' असा महाराजांचा कधीही हट्ट नसे! महाराजांच्या जीवनात मीपणाला महत्त्व नव्हते. म्हणून स्वराज्यातील भूमीपूजने , कोनशीला आणि उद्घाटने कधी कुठे खोळांबलेली दिसत नाहीत!

विसरायला नको , म्हणून आत्ताच सांगतो. प्रतापगडावर देवीच्या पूजाअचेर्ची सर्व व्यवस्था महाराजांनी यथासांग नेमून दिली. वेदमूतीर् विश्वनाथभट्ट हडप यांचेकडे पूजाअर्चा सोपविली. त्यांना लिहिलेल्या पत्रातील महाराजांचे एक वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. '............... श्रींची ' नित्यनैमित्तिक पूजाअर्चा आणि कायेर् यथासांग करावीत. (गडावरील) अन्य कोणत्याही कारभारात लक्ष घालू नये '

महाराजांच्या या सूचक शब्दांवर अधिक भाष्य करण्याची जरुर आहे का ?

महाराज या कोकणस्वारीत थेट राजापुरावर धडकले। त्यांचा सारा रोख होता राजापुरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवर तेथील उपद्व्यापी अकरा इंग्रजांवर हेन्री रिव्हींग्टन हा या अकरांचा प्रमुख अधिकारी होता. गिफर्ड , डेनियल , इमॅन्युएल , रिसर्चस , रेडॉल्फ टेलर इत्यादी बाकीचे होते. इंग्रज म्हटलं की तो महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच पाताळयंत्री राजकारणी असायचाच. हेही अन् विशेषत: हेन्री तसाच होता. पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला. ( इ. स. १६६० , ५ मार्च ते पुढे) तेव्हा या हेन्रीने आपल्याबरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या. स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. पूवीर् महाराजांशी केलेला ' मैत्रीचा करार ' मोडून इंग्रज हा उपद्व्याप करीत होते.

शिवाजीराजाचा जौहरच्या हातून आणि पुण्यास येऊन बसलेल्या शाहिस्तेखानाच्या हातून पूर्ण नाश होणार आहे. असा या इंग्रजांना साक्षात्कार झाला असावा. म्हणून महाराजांशी केलेला करार मोडून हे इंग्रज जौहरच्या मदतीला आले होते. कारण जौहरला जय मिळणार अन् पुढे आदिलशाहकडून आपल्या ईस्ट इंडिया कंपणीला सवलती आणि जागा व्यापाारसाठी मिळणार ही यांना खात्री वाटत होती.

पण झाले उलटेच. जौहरचा पराभव झाला. इंग्रजांना धड दारूगोळ्याचे आणि खर्चाचे पैसेही मिळाले नाहीत. कसेबसे तोंड लपवित , पळून हे लोक पन्हाळ्याहून राजापुरास आले होते.

यांचाच काटा काढण्यासाठी महाराज आता राजापुरावर येत होते. हे इंग्रज इतके विलक्षण राजकारणी होते म्हणजेच ( निब्बर निर्लज्ज होते) की , मराठा राजा शिवाजी राजापुरावर येतोय हे समजताच जणू काही आपण महाराजांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहोत अशा थाटात महाराजांच्या स्वागतासाठी राजापुराबाहेर सामोरे आले. पुढे आले. महाराजांनी पाहिले आणि त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकुम केला.

' या टोपीकरांना गिरफ्तार करा. ताबडतोब आणि यांची येथील राजापुरची वखार जप्त करा. आणि कुदळी लावून खणून काढा.

' इंग्रजांना बोलायला जागाच नव्हती. जसल्याला तसलंच थेटलं म्हणजे बरं असतं. हे इंग्रज व्याघ्रगडच्या कैदेत डांबले गेले.

राजापुरच्या या छाप्यात महाराजांना धनदौलत खूप मिळाली. पण एक अमोल नररत्न त्यांना गवसले. त्याचे नाव बाळाजी आवजी चित्रे. हिरे , मोती , सोनं याची गरज होती. पण महाराजांची सर्वात आवडती लाडकी संपत्ती म्हणजे त्यांचे जिवलग. एकेक माणूस ते स्थमंतकाहूनही अधिक प्रेमाने हृदयाशी जपत होते. आपल्या मित्रांविषयी त्यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार मधासारखे ओथंबलेले आढळतात.

महाराजांची संघटन भूक बकासुराहूनही मोठी होती. ते माणसं मिळवीत होते. त्यामुळे मुलुख आणि गडकोट आपोआपच मिळत होते. या बाबतीत महाराजांच्या पाठीशी उभी होती त्यांची आई , जिजाऊसाहेब , तिचं प्रेम महाराजांवर जेवढं होतं , तेवढंच साऱ्या मराठ्यांवर होतं. अपार , कितीतरी उदाहरणं आहेत. जिजाऊसाहेबांचं आईपण जुन्या कागदपत्रांत सापडतं. पण त्यातल्या दोन ओळींच्या मधल्या कोऱ्या जागेत बिन शब्दांनी लिहिलेलं अधिक सापडते. ते वाचण्यासाठी पर्ल बकच. मॅक्झिन गाकीर्चं आणि साने गुरुजींचं मायाळू मनच हवं. पायाळू माणसालाच जमिनीखाली लपलेलं पाणी सापडतं. या मायाळूंचंही तसंच होतं.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.

उंबरखिंडीच्या मोहिमेत कारतलबखान उझबेग याची अगदी नाचक्की झाली. समृद्ध साहित्याने सुसज्ज असलेली फौज कमी सैन्यबळाच्या आणि तुटपुंज्या युद्धसाहित्याच्या शिवाजीराजापुढे का मार खाते आहे , याचा सूक्ष्म अभ्यास तर राहोच , पण साधा वरवरचा विचारही कोणत्याही मोगली सेनापतीने कधीच केला नाही.

सहज बोलतो , पाहा पटतं का! आजही आमचे कारखाने आजारी पडतात। कायमचे बंदही पडतात. तोट्यात तर नेहमीच असतात. घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी वाङ्मय समृद्धही होत असते. असं का होतं ? या सर्व आमच्या पराभवाचं नातं कारतलबखान आणि शाहिस्तेखानसारख्या बेशिस्त अहंकारी , अभ्यासशून्य , कुचराईबाज , उपभोगवादी , निष्ठाहीन म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळलं आहे का ? तेच नातं आम्हाला उदात्त आणि उत्तुंग , विश्वकल्याणकारी म्हणूनच अनुकरणीय शिवाजीराजांशी जोडता येईल का ?

हीच वरील अवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रांत आणि विषयांत अनुभवास येते आहे। आम्ही निखळ आनंदाने , एकजुटीने , शिस्तीने , अनुशासनाने खेळांच्या क्षेत्रात तरी वागायला नको का ? म्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल की! या सर्व अपयशांच्या मुळाशी एकच कारण आहे. आम्हाला ' राष्ट्रीय ' चारित्र्यच नाही.

दिल्लीत औरंगजेब फार मोठ्या अपेक्षेने शाहिस्तेखानाच्या दक्षिण मोहिमेवर लक्ष ठेवून होता। पण ते त्याचं लक्ष केवळ आशाळभूत ठरलं. शाहिस्तेखानाला आता महाराष्ट्रात उतरून अडीच वषेर् झाली होती. खर्च अफाट आणि मिळकत जवळजवळ शून्यच. टोळधाडीप्रमाणे मराठी मुलखाला आणि मराठी संसारांना ओरबाडीत , कुरतडीत तो बसला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल येथील जनतेत फक्त दहशतच होती.

महाराज उंबरखिंडींच्या युद्धानंतर दक्षिण कोकणात , राजापूरच्या रोखाने मोहिमेवर होते। स्वराज्याला विरोध करणाऱ्या स्वकीयांना उदार मनाने वागवून आपल्या ' ईश्वरी कार्यात ' सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असे. संपूर्ण शिवचरित्र अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती अशी स्वकीय विरोधकांना महाराज समजावून सांगून , कधी मायेनं तर कधी रागावून स्वराज्यात येण्याचा आग्रह करत होते. कुणी आले , कुणी नाही आले. जे आले त्यांचे कल्याण झालं. कीतीर् झाली. पण जे कडवा विरोध करीत राहिले , त्यांचा अखेर कठोर हातानं त्यांनी समाचार घेतला. पण त्यांचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी स्वत:चीच शक्तिबुद्धी वापरली. त्यासाठी त्यांनी कोणाही शत्रूपक्षीय सत्ताधीशाची मदत घेतली नाही. उदाहरणार्थ , चंदराव मोऱ्यांचा अगदी दु:खी मनाने , निरुपायाने बिमोड केला. पण कोणा जंजिरेकर सिद्दीची , इंग्रजांची वा परकीय शक्तीची मदत घेतली नाही. अशीच उदाहरणे आणखी पाच तरी सांगता येतील. मी हे इथं एवढं आवर्जून का सांगतोय ? कारण पुढच्या इतिहासात पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली. उदाहरणार्थ तुळाजी आंग्ऱ्यांचा पराभव आणि बंदोबस्त करण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी इ. १७५५ मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्ऱ्यांचा बिमोड केला. इंग्रजांनी सुवर्णदुर्गाच्या समुदात आंग्ऱ्यांचं म्हणजेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचं आरमार समुदात बुडविलं. फडफडणाऱ्या आमच्याच भगव्या झेंड्यांसह हे आमचं आरमार समुदाच्या तळाशी गेलं. परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपणहून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात! अशा खूप चुका पेशवाईत झाल्या. शेवटी परकीय शत्रूंनी आम्हालाच गिळून टाकलं.

अशा चुका चुकूनही होऊ नयेत यासाठी महाराज अखंड सावधान होते.

इथं एक गम्मत झाली. (इ. १६६१ मार्च) महाराज दक्षिण कोकणात दौडत असतानाच त्यांनी तानाजी मालुसरे या आपल्या काळजातल्या सौंगड्याला एक कामगिरी सांगितली. कोणती ? संगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम त्यांनी तानाजीला सांगितले. आता बघा! एवढा मोठा तालेवार , भीमासारखा हा योद्धा , त्यानं दु:शासनासारख्या शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं अन् घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे ? अन् तो मराठा मर्द तेही काम प्रेमानं अन् हौसेनं जीव लावून करतोय बघा! उन्हातान्हात. दिवसभर केवळ श्रमदानी पद्धतीने नव्हे! फोटू काढला की ठेवलं घमेलं खाली. मग हारतुरे. महाराजांना आणि त्यांच्या जिवलगांना नाटकं करणं कधी जमलंच नाही.

संगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचे काम करीत असतानाच तानाजीवर एकदा सुर्व्यांच्या आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यांसकट उलटा हल्ला केला. जय झाला. सुर्वे पळाले. पुन्हा रस्ते दुरुस्ती सुरू. खरोखर या सगळ्या मावळी स्वभावांचं मूळ कशात आहे ? ते शिवाजीराजांनी या सौंगड्यांना सहज शिकविलेल्या स्वराज्यधर्मात आहे. हे वेगळंच निरोगी अन् हौशी वेड राजांच्या सौंगड्यांना लागलं. त्यातून उगविलेलं पिक निरोगी अन् सकस उगवलं.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.

कारतलबखान सुन्नच झाला। कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ' रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?'

त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?

' खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं ?'

यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ' हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश!

' खरंच होतं। खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ' आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात.

' महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ' एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?' ' जी , कबूल '

खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.

खान परत निघाला। मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.

शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.

एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना ? कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला. पण महाराज आधीच (बहुदा एक फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली. त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच.

महाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१ रोजी पाली , जांभूळपाडा , नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण त्यांची सावधता केवढी! त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवर सोपविली.

महाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धामिर्क होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

शिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा

शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला.

या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता की , त्याने म्हटले की , ' हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पण कोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.

' कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे , गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला.

खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली। खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे.

पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती. शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई रायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ' आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी.

' यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला की , ' मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी.

हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: हलकल्लोळ उडाला. मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना , तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ माजला. याचे नाव गनिमी कावा.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले। तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत. गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची.

तिथेच लढाई सुरू झाली। ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत. मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून ? यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं ? इतिहासाला माहीत नाही. पण सात पुत्रांचा हा बाप , निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता. त्यांची निष्ठा रुदासारखी होती.

' अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ। ' फुटो हे मस्तक , तुटो हे शरीर , हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. ' तोफेआधी मरे न बाजी , सांगा मृत्यूला! ' हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी , फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले.

इथे एक गोष्ट आठवते। दुसऱ्या महायुद्धात खारकोन्हच्या जवळ रशियांत जर्मन आक्रमक फौजेला अवघ्या बारा कामगारांनी असंच दीड दिवस झुंजून रोखून धरलं. शत्रूची मॉस्कोवर चाललेली धडक या बारा वेड्यांनी रोखून धरली. मॉस्कोकडून मदतीसाठी रशियन सेना येत होती. ती येईपर्यंत हे बारा झुंजले. सारे मरण पावले. मदत आली. जर्मन हल्ला माघारी फिरला. अखेर रशियाचा जय झाला. हे बारा कामगार रशियाचे बारा तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज.

बाजीप्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान असं आहे। भोर शहराजवळ पाच किलोमीटरवर ' सिंद ' या नावाचं एक छोटं संुदर गाव आहे. तिथं बाजींचा भव्य वाडा होता. भोवती अंगण होतं. आज काहीही शिल्लक नाही. जिथं बाजी राहिले , वावरले त्या वाड्याची ही अवस्था. त्यांच्या वाड्याच्या जागेत आज सार्वजनिक संडास बांधलेले आहेत.

जाता जाता एक गोष्ट सांगतो। याच युद्धकाळात (इ. स. १६५९ - ६० ) आपल्याला आठवतंय का ? शिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडांस आले , तेव्हा असाच तुफानी पाऊस होता. (श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै १६५९ ) या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांना त्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांचीही मने किती गलबलली असतील ? राणीसाहेब सईबाई यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या भेटीतील मानसिक हलकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का ? आपण शिवचित्र ओळखतो. शिवचरित्रही शक्य तेवढे जाणतो. पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूच शकत नाहीत.

राणीसाहेबांची आणि त्यांची ही शेवटचीच भेट. यानंतर फक्त एक महिना आणि सव्वीस दिवसांनी सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या. महाराज तेव्हा प्रतापगडावर होते.

जिजाऊसाहेबांची ही भेट झाल्यानंतर , महाराज अफझलवधानंतर ताबडतोब पुढच्या मोहिमेला गेले। मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या. मग महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची भेट पुन्हा केव्हा घडली ? दि. १७ ऑगस्ट १६६० म्हणजेच एक वर्ष , एक महिना आणि एक आठवडा , मायलेकरांची भेट नाही.

विशाळगडावरून महाराज राजगडला आले इतक्या दिवसांनी. महाराजांचा बाळ यावेळी सव्वातीन वर्षांचा झालेला होता. त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलं असेल ? आहे का कुणी कवी , कुणी कादंबरीकार , कुणी चित्रकार ? कुठे आहेत हे आमचे प्रतिभावंत ?

गेली दोन वर्षं (इ। १६५९ ते ६० ) दोन आघाडीवर , दोन जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान. कधीकधी शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत नाही. महाराज मात्र घेत असत. इथेच पाहा ना! शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली. आपल्या प्रमाणेच विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्याला शिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे. एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ला , किल्ले परिंडा हा काबीज केला! वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का ? पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला. त्याचा परिंडा जिंकला.

हे घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशाह भूकंपासारखा हादरला. शाहिस्तेखानाने , मदत तर राहोच पण आपल्यावर घावच घातला हे पाहून आदिलशाहने शिवाजीमहाराजांच्या विरुद्ध घडलेली युद्धआघाडी एकदम बंद करून टाकली. महाराजांच्यावर पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला. महाराजांनीही यावेळी आदिलशाहीविरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला. काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करावे.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.

शाहिस्तेखान पुण्यात आला (दि। ९ मे १६६० ) खानाने महाराष्ट्राच्या सरहद्दीवरून , म्हणजेच बुऱ्हाणपुरापासून कूच केले आणि तो पुण्यास आला. शिरवळ , सुपे , बारामती , सासवड ही अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला तात्पुरती मिळाली.

पुण्यात येऊन पोहोचायला त्याला साडेचार महिने लागले। एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे असलेली त्याची छावणी हलत होती. चालत होती. पण पळत नव्हती. छावणीचा खर्च डोंगराएवढा होता. त्यामानाने मिळकत नगण्य होती. तीही शाश्वत नव्हती.

आज मिळत होती अन् उद्या पुन्हा मराठे ती काबीज करत होते। या साडेचार महिन्यांच्या काळात फक्त पुणं तेवढं नाव घेण्यासारखं ( फक्त नावच घेण्यासारखं!) खानाला मिळालं. अन् ते त्याच्या हातात टिकलं. पण बाकी खर्च परातभर आणि प्राप्ती दोन बोटाच्या चिमटीभर असा हा शाही कारभार होता. काहीतरी औरंगजेबाला करून दाखविलं पाहिजे म्हणूनच की काय त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर (3 ० कि.मी.) असलेला चाकणचा भुईकोट जिंकायचं ठरविलं.

चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या नावाच्या शिवकिल्लेदाराच्या ताब्यात होता। चाकण कोटाचे क्षेत्रफळ कसंबसं अडीच एकरांचं होतं. किल्ल्यात कसेबसे तीन-सव्वातीनशे मावळे होते. हे एवढं टीचभर आकाराचं ठाणं जिंकायचा खानानं बेत केला.

२१ हजार फौज आणि मोठा तोफखाना घेऊन खान पुण्याहून चाकणला पोहोचला। तो दिवस होता २१ जून १६६० . या चार भिंताडांच्या चाकण कोटावर मोगली हल्ले सुरू झाली. अहोरात्र. एक महिना उलटला. किल्ल्याचा टवकाही उडू शकला नाही.

इथे एक गोष्ट लक्षात येते की , चाकणला खानाचा वेढा पडला। कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबांस (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते. सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता. चाकण एकांगी पडला होता. २१ हजार मोगली फौजेच्या आणि तोफांच्या गराड्यात , अंगठ्याच्या नखाएवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता. अखेर खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून बोगदा खणला आणि किल्ल्यास एकाचवेळी खूप मोठा सुरुंग लावला. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते.

पण दि। १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला. खिंडार पडले. खानाची फौज कोटात घुसली. चाकणकोट खानाने काबीज केला. वेढा घातल्यापासून ५४ दिवसांनी खानाला यश मिळाले.

त्याचेही कौतुक वाटतेच पण काम , काळ , वेग , खर्च आणि फौज यांच्या पंचराशीकांत हे शिवराज्य जिंकायला खानाला किती तपे लागणार होती! या त्याच्या तपश्ययेर्चा भंग करण्यासाठी अनेक मोहांच्या आणि बेमालूम चुकांच्या अप्सरा त्याच्याभोवती नाचत होत्याच.

तिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज धोंधों पावसातून विशाळगडकडे पसार झाले. सिद्दी जौहरसारखा अतिदक्ष शिस्तीचा , कठोर निष्ठेचा , इमानी आणि कडव्या कौशल्याचा सेनापती फसला. हे त्याचे अपयश एवढे असह्य आणि अपमानकारक होते की , त्याने अखेर विष पिऊन आत्महत्या केली.

महाराज पन्हाळ्याहून विशाळगडकडे सटकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवघे सहाशे मावळे होते। अर्धा लाख शत्रू फौजेच्या अजगरी विळख्यातून राजे गेले. त्यांचा पाठलाग सिद्दी मसूद (जौहरचा जावई) करीत होता. त्यानेही महाराजांना गाठायची शिकस्त केली. पण आपल्या छातीचा बांध करून उभ्या असलेल्या बाजीप्रभू देशपांड्यांनी आणि सहाशे मावळ्यांनी राजा वाचविला. बाजीप्रभूंच्या बरोबर त्यांचा भाऊ फुलाजीप्रभू हाही झुंजत होता. महाराज विशाळ्यावर पोहोचले. राजा वाचला. राज्य वाचलं. झेंडा वाचला. बाजीप्रभू , फुलाजीप्रभू आणि काहीशे मावळे ठार झाले. (दि. १ 3 जुलै १६६० ) शिवा काशीद या नावाचा सैनिक महाराजांना वाचविण्यासाठी महाराजांचं सोंग घेऊन पालखीत बसला होता. तो सिद्दीला सापडला. हसत हसत हा शिवान्हावी सिद्दीच्या हत्याराखाली मरून गेला. राजे वाचले. राज्य वाचले.

काय हो ही माणसं! वेडी! ठार ठार वेडी! हसत हसत मेली. सख्ख्ये भाऊ मेले. किती साधी माणसं , किती सामान्य माणसं. होय! हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे. सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडविला. महान राष्ट्र घडविले. हा कोण ? न्हावी! हा कोण ? भंडारी! हा कोण ? कुंभार! हा कोण ? माळी! हा कोण ? धनगर! हा कोण ? रामोशी! हा कोण ? महार! हा कोण ?... हा कोण ?..... हा कोण.... हे सारे मराठे! जो स्वराज्याकरता जगतो अन् मरतो , तो मराठाच. जो स्वराज्याला विरोध करतो , तो मोगल. सांगा बाळांनो तुम्ही शिवाजीराजांचे मराठे आहात की , औरंगजेबाचे मोगल ?

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.

९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यात आला। महाराज याच काळात म्हणजे ( दि. ५ मार्च ते १२ जुलै १६६० ) पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते. वेढा जबरदस्त होता. वेढा घालणाऱ्या सिद्दी जौहरची सेनापती व योद्धा या नात्यांनी योग्यता निविर्वाद फार मोठी होती. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान या दोन्हीही बड्या सेनापतीत फरक मात्र फार मोठा होता. शाहिस्तेखान हा अभ्यासशून्य होता. जौहर हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता. विशेषत: मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राची त्याला खूप मोठी जाण होती. म्हणूनच तो अतिशय सावधपणे पन्हाळ्याच्या वेढ्यात उतरला होता. त्याच्या दैनंदिन युद्धनेतृत्त्वात ठिसाळपणा , योजनेत विस्कळीतपणा , शाही सैन्यांत नेहमीच आढळून येणारा ऐषाराम , रणक्षेत्राविषयी अनभिज्ञता , अनुशासनाचा अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो होऊ देत नव्हता. त्याची शिस्त उत्तम होती. या सर्वच बाबतीत त्याची प्रत्येक व्यवहारावर करडी नजर होती.

त्याच्याबरोबर अफझलपुत्र फाझल महम्मद हा बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता। पण संपूर्ण लष्करी कारभार तो स्वत: दक्षतेने पाहात होता. त्याच्या हाताखाली काशी तिमाजी देशपांडे हा कारभारी होता. नेमकी शाहिस्तेखानची युद्धनेता या नात्याने अगदी उलटी प्रतिमा होती.

एकाचवेळी पुण्यात शाहिस्तेखान आणि पन्हाळ्याखाली सिद्दी जौहर हे अफाट सैन्यानिशी स्वराज्याबरोबर झुंजायला उतरले होते। येथे एक चित्र स्पष्ट दिसते. शाहिस्तेखानच्या समोर राजगडावरून नेतृत्त्व करीत होत्या जिजाबाई. त्यांनी शाहिस्तेखान स्वराज्यावर आल्यापासून ते शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटेपर्यंत , म्हणजे सुमारे सहा महिने राजगडावरून शाहिस्तेखानाच्या आघाडीवर अगदी समर्थपणे तोंड दिले आहे. या खानाने सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड , गराडखिंड या भागात प्रारंभी (मार्च ते मे १६६० ) हा स्वराज्यातील उत्तर आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे तीस हजार सैन्यानिशी तीन महिने खूप मोठा गहजब करून पाहिला. त्याला अजिबात यश आले नाही. याचे श्रेय नेतृत्त्वाच्या दृष्टीने जिजाऊसाहेबांनाच द्यावे लागले. हे श्रेय त्या काळात याच भागात मोगलांविरुद्ध छापे घालीत असलेल्या नेताजी पालकरांस नाही का ? आहे ना! नक्कीच आहे.

नेताजीने आपली कामगिरी खरंच चांगली केली। पण तो या काळात सतत धावत्या लढाया (छापेबाजी) करतो आहे. त्यात तो खेड-मंचरजवळ स्वत: जखमीही झाला. तरीही तो झुंजतो आहे. पण सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड इत्यादी स्थिर ठाणी थोड्याशा बळानिशी शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या काळात मावळ्यांनी जी अतिशय अवघड कामगिरी केली आहे , त्यामागे नेतृत्त्व आहे. राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांचे. याच काळातील मावळच्या मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे.

ते पत्र शिवाजीराजांच्या नावाने गेले असले , तरी ते नक्कीच राजगडावरून , म्हणजेच जिजाऊसाहेबांच्या आज्ञेने गेलेले आहे। त्या पत्रात म्हटले आहे की , '( आपल्या) मुलखांत मोगलांची धावणी सुरू जाहली आहे. तरी तुम्ही शिकस्तीने रयतेस सांभाळावे.

' मोगलांचे बळ फारच मोठे होते। त्यामुळे लुटालुट , जाळपोळ , वेठबिगारी , अत्याचार , मंदिरांना उपदव इत्यादी प्रकार सतत चालू होते. या सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे शिवाजीमहाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे.

एकूणच स्वराज्य किती भयंकर कठीण अवस्थेतून जात होते याची कल्पना येते। या काळात स्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला जाऊन कोणी मावळे सरदार फितुर झाल्याची उदाहरणे आहेत का ? होय! फक्त उदाहरणे आहेत. पहिले आहे बाबाजीराम होनप देशपांडे याचे , आणि दुसरे संभाजी कावजी याचे.

चरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे मराठी संसार पिळवटून निघत होते। त्यांत एखाददुसरे उदाहरण असे निघाले तर दु:खद असले तरी स्वाभाविक आहे. बाकीचे सारे स्वराज्य सह्यादीच्या शिळांसारखे घाव सोसीत अभेद्य राहिले. म्हणूनच अखेरचे चित्र असेच दिसले की , शाहिस्तेखानचाही पण पराभव आणि सिद्दी जौहरचाही पराभवच. कारण शत्रूशी झुंजणाऱ्या कडव्या शिवा काशीदांची , बाजी घोलपांची , बाजी प्रभूंची , वाघोजी तुप्यांची आणि फिरंगोजी नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्यसेना महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेची वाट बघतच तत्पर होती. जौहर आणि शाहिस्ता यांच्या दुहेरी आक्रमणात दिसून आली. मराठ्यांच्या सेनेची आणि संसारांचीही जिद्द , महत्त्वाकांक्षा , निष्ठा , शिवपेम आणि घोरपडीसारखा चिवटपणा , तीनशे वर्ष सतत आधीच्या लाचार गुलामगिरीनंतर हे सर्व राष्ट्रीय चारित्र्याचे सद्गुण राजापुरच्या गंगेसारखे उफाळून आले.

ही शिवगंगा बुद्धीमान , प्रतिभावात , कल्पक आणि तरीही अहंकाररहित आणि उपभोगशून्य युवा शिवाजीराजाच्या मस्तकातून खळाळत होती. म्हणूनच मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच पराक्रम गाजविण्यासाठी हसतहसत मुठी वळत होती.

आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश जनतेने आणि त्यांच्या पंतप्रधान चचिर्लने अनेक आघाड्यांवर जर्मनी अन् जपानसारख्या शत्रूंचा फन्ना उडविला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. ते कौतुक योग्यही आहे. पण अशाच प्रचंड आक्रमणातून हिंदवी स्वराज्य प्रतिपंच्चंदलेखे सांभाळीत व फुलवित आणि वाढवित नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही विसरता कामा नये.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


शिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.

शिवाजी राजांनी अफझलखानाचाच केवळ नव्हे , तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या। खरं म्हणजे औरंगजेबानं अफझलखानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजीराजांविरुद्ध आपली फौज पाठवायला हवी होती. जर त्याने तशी फौज पाठविली असती , तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं. आदिलशाहने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की , शिवाजी हे दुखणं तुमचे आमचे आणि आपल्या धर्माचेही आहे. म्हणून तुम्ही आम्हांस मदत करा. निदान याचवेळी तुम्हीही शिवाजीविरुद्ध मोहिम काढा. पण औरंगजेबाने कोणाच्यातरी पराभवाची वाट पाहिली. अन् मग अफझल-पराभवानंतर त्याने शाहिस्तेखानाच्याबरोबर ७८ हजार स्वारांची फौज पाठविली. यात पायदळ आणि तोफखाना वेगळा होताच. हे प्रचंड दळवादळ दख्खनवरती निघाले. त्याच्या दिमतीस या लष्करात ५९ सरदार होते. त्यात एक बाईपण होती. तिचे नाव रायबाघन. या प्रचंड फौजेचा रोजचा खर्च केवढा असेल!

याचवेळी सिद्दी जोहर सलाबतखान या कर्तबगार सरदारांस विजापुराहून आदिलशाहने पन्हाळ्याकडे रवाना केले। त्याची फौज नेमकी किती होती ते माहीत नाही. पण अर्धा लाख असावी. दिल्लीची मोगली फौज आणि सिद्दीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चाल करून आल्या. म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणेदोन लाख सैन्याच्या आणि भल्यामोठ्या तोफखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली. एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का ? नव्हती. पण हिम्मत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती. महाराज एकाचवेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत. पण दोन शत्रूच चालून आले तर ? तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा निश्चय.

एकूण मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावे ? नक्की आकडा सांगता येत नाही। पण ते अंदाजे फारफार तर २० हजारापर्यंत असावे. २० हजार! विरुद्ध दीड लाख! इथेच स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते. त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावे लागते. ते चारित्र्य मराठ्यांच्यात निश्चितच होते. या दुहेरी आक्रमणांचा शेवटी निकाल काय लागला ? दोघांचाही पराभव , स्वराज्याचा विजय. शत्रूच्या तोफांचा , हत्तींचा , खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरविणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव. या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे. नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग ? ते बळ नव्हेच. ती केवळ गदीर्. पण गुणवत्तेनी श्रीमंत असलेल्या मूठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल , तर गेंड्यांच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्या देऊन खड्ड्यात पाडता येतात.

शाहिस्तेखानाने एकूण आपल्या सव्वा लाख फौजेनिशी स्वराज्यावर चाल केली। फौज अफाट पण गती गोगलगायीची. सासवडहून पुण्याला तो दि. १ मे १६६० रोजी निघाला. आणि पुण्यास पोहोचला ९ मे १६६० ला. हे अंतर फक्त नऊ कोसांचे. म्हणजे 3 ० किलोमीटरचे. गोगलगायीपेक्षा खानाचा वेग नक्कीच जास्त होता!

त्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले अन् संरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळाले। ही मात्र गोष्ट खरी.

शाहिस्तेखानाला आता मोठी काळजी कोणाचीच नव्हती। कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते. भोवती सिद्दी जोहरचा अजगरी विळखा पडला होता. पण त्याला मराठी चुणूक समजलीच. तो शिरवळहून शिवापुराकडे आणि शिवापुराहून गराडखिंडीने सासवडकडे येत असता , मराठ्यांच्या , म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की , आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची हैराणगत केली. (एप्रिल शेवटचा आठवडा १६६० )

खान पुण्यास पोहोचला। त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला. मुठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचे प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरले. त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे हत्ती होते पाचशे! इतर हत्ती वेगळे.

खान आपला जनानखाना घेऊन आला होता। हत्ती होते आणि भलामोठा अवजड तोफखानाही होता. आता सांगा ? मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता ? या मोगली (आणि विजापुरी) सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही. या आमच्या डोंगरी दऱ्याकपाऱ्यांत त्यांच्या हत्तींचा अन् तोफांचा काय उपयोग ? शिवाय गळ्यात जनानखान्याचे लोढणं.

जाता जाता सांगतो , महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाही. धावता तोफखाना त्यांनी कधीच ठेवला नाही. अन् लढाईवर जाताना कोणीही , अगदी महाराजांनीसुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही. मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ ४० वर्ष सतत अनुभव आल्यानंतरसुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावर आला , तेव्हा त्याच्याबरोबर आणि जाफरखान वजीराच्याबरोबर , किंबहुना सर्वच सरदारांच्याबरोबर जंगी जनानखाना होता. कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती , तोफा आणि जनानखान्यानेच केला.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!

स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला। शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांची लष्करी प्रतिभा , म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण चपळ होती. हे मराठी कोल्हे कोणचा डाव टाकतील अन् केव्हा टाकतील याचा अंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता.

प्रतापगडच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नव्हे खात्रीच साऱ्यांना वाटत होती। त्यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते. खुद्द विजापूरच्या आदिलशाहला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती. जिवंत किंवा मेलेला सीवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच. पराभव! शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही. पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईला कोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण हिला लढाईच म्हणता येईल का ? फारतर झटापट किंवा चकमक म्हणावे लागेल. पूर्ण पराभूत होऊन (न लढताच) शाही फौज सुसाट पळाली. महाराज तिचा पाठलाग करीत होते. पण त्यांनी पाठलागही थांबविला अन् नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. किल्ला खूप मोठा होता. भोवती खंदक होता. पुन्हा इथं प्रश्ान् आलाच. मराठी सैन्याला तोफखाना नव्हता. अन्य हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते. महाराज स्वत: उभे होते.

इथे एक गोष्ट लक्षात येते की , वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते। कधीच परवडले नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त दोनदाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इ. १६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही , दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला. पण तो भुईकोट जिंकायला १४ महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यांमुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं , वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं ठेवणं अवघड होतं. गरिबी! काय करणार ? म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार , नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तार सह्यादीच्या आणि समुदाच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय इंग्रजी , फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. थोडेफार यशही मिळविले. पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले. पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत. आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती , तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती. महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला. बाकीसारे निरनिराळ्या बादशाहाचं इमानेइतबारे गुलामगिरीच करीत राहिले.

एक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे। महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीज आणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारी मंुबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ , चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती. (पुढे इ. स. १९६१ मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती!) त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही! पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत , कलकत्ता , मदास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती. सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता.

आता पाहा हं काय झालं ते! मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली। किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले की , हे इंग्रजांना , तुम्ही लौकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हांस आमच्याकडून शक्य ती मदत करू.

पाहिलंत ? आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात. मायबाप वाटतात. त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण शेजारीच कल्याण , भिवंडी , अलिबागपासून कुडाळ , ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला , अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा , घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत नाही. मुंबई घ्या , मुंबई आपली आहे , आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही. आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतो.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.

' हम लढाई करना चाहते नहीं , ऐसा बहाना बनाकर सीवाको धोका देना ' या आदिलशाहच्या हुकूमाप्रमाणेच अफझलखानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला। पण हा डाव त्याच्यावरच उलटला. महाराज अत्यंत सावध होते. अफझलखानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला. संभाजी कावजी कोंढाळकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला. महाराजांना संपवावयास आलेला खान स्वत:च संपला.

त्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता। खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे , मारणार आहे. याच्या अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांना समजलेल्या होत्या. त्यामुळे ते अत्यंत सावध होते. त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की , खानानेच महाराजांवर पहिला घाव घातला. अशा परिस्थितीत महाराजांनी जर बेसावध , भोळसट आणि आमच्या नेहमीच्याच भारतीय स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर ? तर महाराज मारले गेले असते. जगानेच ' हा सारा बावळटपणाचा परिणाम ' म्हणून महाराजांनाच दोष दिला असता. असली भारतीय वेंधळी उदाहरणे इतिहासात काय कमी आहेत ?

महाराजांच्या विचारसरणीवर आणि कृतीवर महाभारताचा , चाणक्यनीतीचा आणि योगेश्वर कृष्णनीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो। त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडींतून हेच दिसून येते.

खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडवली। पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केले नाही. कोणाचीही विटंबना केली नाही. हाल केले नाहीत. नंतर सर्वांना सोडूनच दिले. ही आमची संस्कृतीच होती. महाराजांना खानाचे प्रचंड युद्धसाहित्य , खजिना , हत्ती , घोडे वगैरे घरपोच मिळावे , तसे मिळाले.

मोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले। ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे , म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले. ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत. विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळविण्यासाठी ते आदिलशाही मुलुखावर आणि किल्ल्यांवर तुटून पडले.

आम्ही उत्सवबाजांनी आज हे लक्षात घ्यावे। अवघ्या १५ दिवसांत (दि. २५ नोव्हेंबर १६५९ ) महाराज कोल्हापुरात , नेताजी पालकर विजापुरास , दौलोजी कोकणात राजापुरास आणि इतर चार मावळी सरदार शिरवळ , सासवड , सुपे आणि पुणे या ठाण्यांवर जाऊन धडकले. शिरवळ , सुपे ही चारही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी (दि. १० नोव्हेंबर) काबीज केली. राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतांवर दौलोजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला. प्रत्यक्ष महाराजांनी नांदगिरी , वसंतगड , वर्धनगड , कराड , सदाशिवगड , भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले. याच धडाक्यात पन्हाळगडासारखा अजिंक्य गड महाराजांनी २९ नोव्हेंबर रोजी घेतला. कोल्हापुरची महालक्ष्मी तीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली.

अफझलखानाच्या आक्रमणाचा परिणाम काय ? स्वराज्य बुडालं नाही , वाढलं। दिरंगाई , आळस , चंगळबाजी अजिबात न होऊ देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळविला होता. आम्ही उत्सवबाजांनी हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतले पाहिजे. महाराजांचे नुसते जयजयकार आता पुरे!

नेताजी पालकराला थेट विजापुरावर सोडताना महाराज त्याला आज्ञा देत होते , ' सरनोबत , थेट विजापुरावर चालून जा। ते काबीज करा. अन् आदिलशाह बादशाहलाच ताब्यात घ्या.

' एवढी अफाट अन् अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती वा राजा आपल्याला इतिहासात गेल्या एक हजार वर्षांत तरी सापडतोय का ? महाराजांच्या या उद्योगांत केवळ झोंडशाही नव्हती , क्रौर्य नव्हतं , तर त्या पाठीमागे उदात्त , उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान होते। साधुसंत म्हणजे मानवतेचे महाउपासक. महाराजांच्या या पवित्र व पुण्यकरी कार्याला सर्व साधुसंतांचा आशीर्वादच होता. कोणाही अन् कोणत्याही धर्मातील संताने महाराजांच्या निषेधाचे पत्रक काढले नाही. त्यांना आशीर्वादच दिला.

आदिलशाहसकट राजधानी विजापूरही ताब्यात घेण्याची महाराजांची आकांक्षा होती। तसं घडलं असतं , तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती पण सपाटीच्या प्रदेशात असलेले बळकट तटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या चार-पाच हजार स्वारांच्यानीशी काबीज करणे नेताजीला जमले नाही. सतत आठ दिवस नेताजी धडका देत होता. शहराच्या तटाबुरुजांवर शाही तोफखाना होता. माणूसबळ नेताजीपाशी अगदीच तुटपूंजे ठरत होते. अखेर त्याने माघार घेतली आणि तो महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेला.

महाराजांचा स्वतंत्र तोफखाना नव्हता. धावत्या मराठी सैन्याबरोबर तोफखाना नेल्याचे एकही उदाहरण शिवचरित्रात नाही. कारण तोफाच नाहीत. मराठी किल्ल्यांवर तोफा असायच्या तेवढ्या होत्या. अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हे असे अवघड विजय मिळविले. युद्धसाधने कमी पैसा कमी , माणसे कमी , सारेच काही तोकडे आणि मुठभर. महत्त्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती की , त्यापुढे गगन ठेंगणे पडत होते.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.

अफझलखानाशी कसा प्रसंग घडणार आहे , याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती। पण जो काही ' प्रसंग ' होणार आहे त्यात काहीही घडो ; विजय , पराजय वा मृत्यू , तरीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये , हाच महाराजांचा आपल्या जिवलगांना कळकळीचा आदेश होता। त्याप्रमाणे ' प्रसंगा ' नंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या. महाराजांचेच शब्द आहेत , ' आम्हांस काही दगाफटका झाला तरी नेताजी पालकरांचे हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा.

' गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलं आहे नाही ? कर्मण्ये वाधिकारस्ते!

दि. १० नोव्हेंबर १६५९ , गुरुवार या दिवशी तो ' प्रसंग ' घडणार होता। नेमका कसा ? ते विधात्यालाच माहीत. पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारीत गर्क होता. या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते.

महाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली। कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्ये यांनी पूजामंत्र म्हटले. महाराजांनी पूजा केली ? होय. पण संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखूनरेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेस बसले होते. एखादा विद्याथीर् पूर्ण अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा नमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो तसे. म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते. नवस करणारे नव्हते. नवस करणारे लोक देवाशी ' कॉन्ट्रॅक्ट ' करतात. ' माझं अमुक काम होऊ दे , म्हणजे देवा मी तुझ्याकरता तमुक करीन.

' अन् अजूनपर्यंत तरी शिवाजी महाराजांबद्दलच्या ऐतिहासिक विश्वसनीय कागदपत्रांत कोणत्याही कामाकरता किंवा हेतूकरता महाराजांनी कोणत्याही देवदेवतेला नवस केल्याची एकही नोंद सापडलेली नाही. ते नवसबाज नव्हते.

दुपार झाली. महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. जिवा महाला , सकपाळ , संभाजी कावजी कोंढाळकर , संभाजी करवर , सिद्धी इब्राहीम , येसाजी कंक वगैरे दहा जिवलग , महाराजांचे सांगाती होते. तेच ठरले होते. तेच येणार होते. पण बालेकिल्ल्यावरून उतरताना गडाच्या खालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवले होते , त्यांनी महाराजांना बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलेच. या मावळ्यांचा किल्लेदार होता गोरखोजी काकडे. हे सारेच मावळे महाराजांना पाहून भारावले आणि त्यांना गराडा घालून म्हणू लागले , ' महाराज , तिथे (खानाचे भेटीचे जागी) धोका आहे. आम्हाला तुमच्या सांगाती घ्या.

' ठरलेल्या योजना जशाच्या तशाच पार पाडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होता. कोवळ्या मायेच्या पोटी डाव बिघडणं योग्य नव्हतं. महाराज तरीही न रागावता त्यांना मायेने म्हणाले , ' दादांनो , जे ठरले तेच येतील.

' आणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियान्यापाशी आले. सर्वबाबतीत महाराज अतिशय सावध होते , दक्ष होते.

शामियान्याच्या दाराशी महाराज पोहोचले. खानाने तंबूच्या बाहेर न येताच आतच महाराजांना म्हटले , ' तू अपनी हिम्मत बहादुरीकी शेखी बधारता है! बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं ? मेरा मातहत बन जा! अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ! ' आणि खानाने महाराजांना मिठी मारली. अन् क्षणातच त्याने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्या बगलेत जोरात डाव्या हाताने करकचले. अन् आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवर तडाखून घाव घातला. तो घाव नुसताच खरखरला. कारीगार झाला नाही. कारण महाराजांच्या अंगात पोलादी चिलखत होते. त्याच्या हे लक्षात आले असावे. कारण त्याने लगेच दुसरा घाव घालण्याकरता कट्यार उगारली अन् तो घाव घालणार , एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिचवा खानाच्या पोटात खुपसला. किंकाळी फुटली. दग्याने महाराजांचा घात करावयास आलेला खान स्वत:च गारद झाला.

जर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते , तर तेच गारद झाले असते. हा साराच प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे. या शामियान्यातील ती भेट म्हणजे या प्रतापगड प्रकरणाचा सूर्यबिंबाप्रमाणे केंदबिंदू आहे. पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात , तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्त्वाचे किरण दूरवर पसरलेले होते. त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे. महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा , देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले. त्याचवेळी वडीलधाऱ्या , स्वराज्यसेवकांचा अतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले. कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केले.

पण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर काही क्षणात खानाबरोबर आलेल्या त्याच्या वकिलाने , म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकणीर् याने खानाची तलवार उचलली आणि महाराजांच्यावर तो घाव घालण्यासाठी धावला. महाराज निमिषभरही बेसावध नव्हते. त्यांनी क्षणात त्या वकिलाचा घाव अडविला. महाराजांनी त्याला चांगल्या शब्दांत कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. खूप सांगितले. तरीही त्याने महाराजांवर तीनवेळा लागोपाठ घाव घातले. ते त्यांनी अडविले , उडवले. इतके सांगूनही कृष्णाजी भास्कर कुलकणीर् वकील ऐकत नाही , असं पाहिल्यावर महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला. अन् कुलकणीर् वकील ठार झाला. पाहिलंत ? गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकरभट्ट राजोपाध्ये यांना सादर नमस्कार केला होता. कुलोपाध्यायांचा तो आशीर्वाद राजाला होता , स्वराज्याला होता. महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेनं वंदन करीत होतं. पण भेटीच्या जागी राजांवर म्हणजेच स्वराज्यावर घाव घालणाऱ्या कृष्णाजी भास्कराला ते ठार करीत होते.

खानाच्या बाजूने आलेल्या सरदारांत महाराजांचे एक चुलते , भोसले होते. म्हणजे महाराजांचे ते काकाच. किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले. महाराजांचा हुकूमच होता मावळ्यांना की , ' जे झुंजतील त्यांना मारावे. जे शरण येतील त्यांस मारो नये. ' भोसले काका त्यात ठार झाले. पाहिलंत ? महाराज आपल्या स्वत:च्या वकिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदराने ' काका ' म्हणत असत. त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानीत असत. या प्रतापगड प्रकरणात महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला.

महाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारीत होते अन् मानलेल्या काकांचा आदर करीत होते. खानाच्या वकिलाला ठार मारीत होते अन् आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करीत होते. महाराजांचा हाच स्वराज्यधर्म होता. यालाच म्हणतात महाराष्ट्रधर्म. ' विंचू देव्हाऱ्यासी आला , देवपूजा , नावडे त्याला। तेथे पैजाऱ्याचे काम , अधमासी व्हावे अधम।। ' हाच महाराजांचा धर्म होता.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे!

स्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजीराजांचा डाव। हाच त्यांच्या बुद्धीबळाचा डाव. आपल्या वकीलाच्या मार्फत महाराज खानाला आपल्या चक्रव्यूहात गंुतवित चालले होते. खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं.

खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का ? नाही। खानाला येणं भागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता ? त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय. म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच , विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं.

यात त्याची काहीच चूक नाही। तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे. राजकारण , दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठून ठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो. खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून.

खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला। राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं.

या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते। ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का ? त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती. आईची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता.

एक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची। हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की , ' महाराज , खानाला जातीने भेटू नका , धोका आहे. तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण तुम्ही त्या आगीत शिरू नका.

' मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते। पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळत होता. शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते , ' हे जमलियास ठीक. पण न जमलियास कैसे होईल ?

' महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता।

आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं। महाराजांचे शब्द असे , '' श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस बोलली की , ' लेकरा , त्याने (खानाने) माझा अपमान केला. त्वा काम काळजीने करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. ' श्री आम्हांस प्रसन्न झाली.

'' अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार। महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग. श्रद्धा हे सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला.

महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव ' भवानी ' असे ठेवले.

खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की ? ती बोलली का ? श्रीचं जाणे! पण स्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं। राज्य वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.

मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते. खान महाबळेश्वरपर्यंत येऊन दाखल झाला होता.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.

शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं! राष्ट्रीय चारित्र्य। नॅशनल करेक्टर। हे असेल तर यशकीतीर्चे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारख्या कर्दनकाळ वैऱ्यालाही दाखवून दिलं की , हा शिवाजीराजा मरण पावला तरीही इथं हजारो शिवाजीराजेच उभे असतील ते न वाकता , लाचारीने न झुकता , भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस- पंचवीस वर्ष झुंजत राहतील. ते सारे शिवाजी वाकणारही नाहीत , अन् मोडणारही नाहीत. त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तख्त दुभंगेल.

हेच शिवराष्ट्रीय अन् महाराष्ट्रधमीर्य आमचं कर्तृत्त्व आणि आमची आकांक्षा , पुढच्या इतिहासात साक्षात , प्रत्ययास आली नाही का ? आलीच! हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नये. हे लेणं आम्ही कधीही हरवून बसता कामा नये. माझ्या कुमार नातवंडांनो , मी हे महाराष्ट्र टाइम्समध्ये ' आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ' हे सदर मांडतोय , ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच. छत्रपती शिवाजीमहाराजांचे असंख्य , उदात्त , उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच या चरित्राचा उपयोग. नुसतेच पुतळे अन् नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत. निजीर्व आहेत.

अफझलखानच्यास्वारीमुळे महाराजांचे शतपैलू नेतृत्त्व आणि त्यांच्या शिलेदारांचे शतपैलू कर्तृत्त्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्ययास येतेय. या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगडसारखा गड निवडला. प्रतापगड म्हणजे जणू विधात्यानेच रचून ठेवलेला सह्यादीतील अत्यंत बिकट चक्रव्यूहच. महाराजांचा सह्यादीच्या नैसगिर्क रचनेचा , म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येते. अर्थात केवळ जावळी प्रतापगडच काय , पण अवघ्या कोकण , सह्यादी , समुद , मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता. येथील नद्या , निबिड अरण्ये , दऱ्याखोरी , पश्चिम समुद , पठारे आणि अशा अवघ्या मराठी मुलुखातील माणसंही त्यांनी अचूक हेरली होती. त्यांच्या सैन्यात कोकणातील जवान होते अन् त्या दूरवरच्या चंदपुरी गोंडवनातील गोडंही होते. सारेच होते उघड्या शरीराचे , निधड्या छातीचे , अन् कडव्या इमानाचे।

अफझलखान प्रयत्न करीत होता अशा या निबिड चक्रव्यूहातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकून आणण्याचा. त्याचे याबाबतीतील सर्व डाव वाया गेले.

महाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आरखडा आखला जात होता. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकीत होते. विजापुराहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेचदार डाव टाकले. भावनेला डिवचले. चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळात कुठेही प्रतिहल्ले केले नाहीत. ठाणी जाईपर्यंत ती राखण्याची शिकस्त केली. पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितले , ' ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात प्रयत्न करू नका.

' या काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाही. खानाला या काळात महाराजांनी कधीही पत्र वा राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला नाही. अगदी गप्प राहिले. झडप घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो , डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान बुचकळ्यातच पडला होता. या शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा त्याला थांगपत्ताही लागत नव्हता. पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या प्रतापगडावर पाठविले. महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर पत्रही दिले होते. खानाची अशी दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड बोलणी होती की , ' प्रतापगडाहून आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल व्हा ,' म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या घशात येऊन पडा.

हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन् कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने. शरणागतीच्या भाषेत.

या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी आणि तत्परतेने केली. याचवेळी राजापूरच्या बंदरात , कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती. जर युद्ध भडकले आणि कोकणात पसरले तर अफझलखानाला या गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर खानाची छावणी , पुणे , सातारा , कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत होता. ही किमया महाराजांच्या वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची.

या साऱ्याचा परिणाम ? पराभव कुणाचा ?

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे