शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

बाप्पा रे!

तुला हाक मारताना आताच्या प्रथेप्रमाणं प्रिय म्हणावं की तीर्थरूप म्हणावं याचा निर्णय करता आला नाही. मग ठरवलं तुला हाकच मारायची. तीसुद्धा एकेरी. कारण त्यातून जवळीक साधल्याचा आभास निर्माण करता येतोच; शिवाय आताच्या काळाला धरूनही होतं. आता कुणाशीही पटकन एकेरीत बोलण्याचीच रीत आहे. टेलिव्हिजनवर किंवा जाहीर कार्यक्रमात 'मोठ्या' माणसाची मुलाखत घेताना असं एकेरी बोलून आपलंही वजन वाढवता येतं. ही दाखवेगिरी आहे, असं तू म्हणशीलच. पण अशी दाखवेगिरी करूनच आता सर्वकाही साध्य करता येतं.

बाप्पा रे! कोणे एकेकाळी भादपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला तू घरोघरी यायचास. धुंवाधार पावसानं हवाही ओलीगच्च झालेली असायची आणि आसमंत हिरवागार. श्रावणसरींचा गोडवा आणि मधूनच पडणारे उन्हाचे उबदार सोनेरी कवडसे यांची मोहक चित्रं मनात ताजी असतानाच तुझं आगमन व्हायचं. घर आनंदानं भरून जायचं. पाव्हणा म्हणूनच तू यायचास आणि पाव्हण्यासारखाचा राहून निघून जायचास. पुढच्या वषीर् लवकर येण्याचं आश्वासन मुलांच्या मनात पेरून जायचास. तुझं येणं-जाणं असं सहज होतं. पण बाळ गंगाधर टिळक नावाच्या माणसाला लोकांना एकत्र करण्याचा हुकमी एक्का म्हणून तूच चांगला वाटलास. घराघरातल्या देवघरातच राहून गुपचूप परत जाणारा तू सार्वजनिक ठिकाणी राहू लागलास. तुझं असं एका मर्यादित अर्थानं सामाजिकीकरण होणं ही काळाचीच गरज होती. देवाचं असं सार्वत्रिकीकरण तेव्हा आवश्यकच होतं. पण तेव्हाच का; आताही काही काही बातम्या ऐकल्या की अशा सार्वत्रिकीकरणाची आजही गरज आहे, असं तीव्रतेनं वाटतं बरं. पण आता अशा सार्वत्रिकीकरणाऐवजी राजकीयीकरण करणंच अनेकांच्या उपयोगाचं असतं. अशी गरज अधिकाधिक भासू लागली तेव्हापासून तुझ्या आगमनालाच एक बटबटीत रूप येऊ लागलं.

बाप्पा रे! लहानपणापासून ऐकत आलो की तु बुद्धीची, कलेची देवता आहेस. ज्ञानेश्वर माऊलीनं भगवद्गीतेवरील आपलं भाष्य 'मऱ्हाटी' बोलीत सुरू करताना सुरुवातीला २१ ओव्यांमध्ये तुझंच स्मरण केलं. 'अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथ शब्द ब्रह्मा कवळले। ते मिया श्रीगुरूकृपा नमिले। आदिबीज।। आता अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मिया।। ' असं तुझं वर्णन करून तुला दंडवत घातला. गीतेवरचं ते मऱ्हाटी भाषेतलं भाष्य ही त्या काळातली बंडखोरी होती. संस्कृतातलं धन प्राकृतात आणून जनसामान्यांसाठी खुलं करणं हा विदोहच होता. पण आम्ही मुदलातलं विसरलो आणि ज्ञानेश्वरीची पूजा करण्यातच धन्यता मानू लागलो. भावार्थ नजरेआड करायचा आणि बाह्योपचारालाच महत्त्व देऊन त्यातच गुुंतून पडायचं ही तशी आमची जुनीच रीत. वाईट एवढंच वाटतं की तीच रीत अजूनही चालू आहे.

बाप्पा रे! हे एकविसावे शतक. तुला २१ आकडा प्रिय. दुर्वा व्हायच्या त्या २१. मोदक अर्पण करायचे ते २१. अथर्वशीर्ष म्हणायचं तेही किमान एकवीसदा! जो आकडा तुला प्रिय तोच आकडा धारण करणारं शतक सध्या चालू आहे. आता या शतकात तरी आम्हाला चांगली बुद्धी दे. ज्ञानाची कास धरण्याची वृत्ती दे. विश्लेषक नजर दे. नवीन ते ग्रहण करण्याची क्षमता दे. आजचे प्रश्न समजून घेण्याची कुवत दे. जात आणि धर्म या गोष्टी वैयक्तिक जीवनापुरत्याच ठेवण्याची उपरती सगळ्यांनाच होऊ दे. आमच्या राजकारण्यांना, नाही रे बाप्पा; सत्ताकारण्यांना दूरवरचं बघण्याची दृष्टी दे. तुझा उत्सव हा मन प्रसन्न करणारा होऊ दे. प्रदूषण आणि पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती आणि पाणी या विषयाचं महत्त्व साऱ्या साऱ्यांना उमजू दे!

बाप्पा रे! तुझ्या तीर्थरूपांच्या आवडत्या चंदावर आम्ही पोचलो आहोत; मंगळावर जाण्याची तयारी करतो आहोत. केवळ अवकाशविज्ञानातच नाही, तर विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये आम्ही प्रगती करत आहोत. पण प्रगतीची ही कवाडं महानगरांपुरतीच आहेत. ती खेड्यापाड्यांतही पोचायला हवीत. आधुनिक आयुविर्ज्ञानाचे फायदे अगदी आडबाजूच्या खेड्यात राहणाऱ्याला सामान्य माणसालाही मिळू देत. त्यासाठी आम्हाला बळ दे. येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्याची शक्ती दे. पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून प्रदूषण कमी करण्याची, अधिकाधिक झाडं लावण्याची, तिवरांचं रक्षण करण्याची, पाणथळ जागा वाचवण्याची, खाड्यांमध्ये भराव न घालण्याची, प्लास्टिकच्या पिशव्यांना दूर ठेवण्याची, थमोर्कोलच्या आराशीला बाजूला सारण्याची बुद्धी आम्हाला दे. थोडक्यात, आमची जीवनशैली सुधारण्याची उपरती आम्हाला होऊ दे. इतकं करशील ना रे बाप्पा?
यावें... शिवपार्वतीनंदना, आपले स्वागत असो! दैत्यदानवकंदना, आपलं आगमन आम्हाला कल्याणकारी ठरो. गजवदना, मूषकवाहना आम्ही अधीर मनाने तुमच्या आगमनाची केव्हापासून वाटत पाहातो आहोत. आपण यावे, आम्ही आनंदाने आणि परमभक्तीने तुमच्यासमोर नतमस्तक होण्यास आतुरलो आहोत.

आमच्याप्रमाणे आमच्या गेल्या कित्येक पिढ्या तुमच्यासमोर अशाच किंबहूना यापेक्षा अधिक भक्तिभावनेने नतमस्तक होत आल्या आहेत. गेली किती शतकंहा तुमचा उत्सव अखिल हिंदूमात्र उत्साहात, आनंदात घरोघरी साजरा करत आले आहेत त्याची तर गणतीच नाही. हे गणराया, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा हिंदू तुम्हाला निरंतर पिढ्यानुपिढ्या वंदन करत आला आहे. तुमचं भजन-पूजन गेली हजारो वर्षं या भारतभूमीत निनादतं आहे. आपली म्हणजे गजाननाची मूतीर् घरातल्या मखरातून सार्वजनिक मैदानात आणणारे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला तुमचा उत्सव आता यावषीर् ११६ वर्षांचा झाला. केवळ पाच उत्सवांनी सुरू झालेली ही उज्ज्वल परंपरा आणि प्रथा आता पन्नास हजार एवढी प्रचंड संख्या गाठण्याएवढी विशाल झाली आहे. हा उत्सव महाराष्ट्रात सुरू झाला आणि महाराष्ट्रातच वाढला. असं सांगतात की, इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने दहा-अकरा दिवस चालणारा दुसरा उत्सव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. या उत्सवात मुख्यत: तरुण भाग घेतात. तुमच्या भक्तीभावनेने देहभान विसरतात. त्यांच्या हातून क्वचित काही आगळीक घडली की त्याचा गाजावाजा केला जातो. काही आगळीक होऊ नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेतली पाहिजे हे खरंच! पण उत्सवी वातावरण म्हटलं की, उत्साहाला उधाण आल्याशिवाय कसं राहिल आणि उधाण समुदाचं काय किंवा माणसाच्या मनातल्या आनंदाचं काय, कधी कधी सीमारेषेचं उल्लंघन करणारच. तुमच्या उत्सवाचं योगदान इतकं प्रचंड आहे की, त्या जोरावरच उत्साही कार्यर्कत्यांकडे थोडं क्षमाशील दृष्टीने पाहिलं जातं.

या प्रदीर्घ काळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या भक्तीत एवढाही उणेपणा येऊ दिला नाही. कधी अन्नधान्याची टंचाई, कधी वर्षादेवतेचा रूसवा, कधी गगनाला भिडणारी महागाई तर कधी देशाच्या सीमेवर जमणारे युद्घाचे ढग आणि कधीकधी तर लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या निवडणुकीच्या गदारोळामुळे गढुळलेलं वातावरण... या आणि यासारख्या अनेक चिंता-विवंचना पाचवीलाच पूजलेल्या असतानासुद्घा तुमची चतुथीर् मात्र आम्ही मनापासून, आनंदाने साजरी करत आलो आहोत. 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही तुमची श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लिहिलेली आरती आम्ही गेली साडेतीनशे वर्षं मनापासून म्हणतो आहोत. 'अथर्वशीर्षा'ची आवर्तनं, सहस्त्रावर्तनं उत्सवात नित्यश: होत आहेत. तुमचा अवाढव्य देह आणि त्या देहावर विराजमान झालेलं गजराजाचं मस्तक अनेकांच्या कुतूहलाचा विषय. माणसाच्या देहावर हत्तीचं मस्तक बसेलच कसं, असा प्रश्न मोठमोठ्या विचारवंताना, संशोधकांना गेली अनेक वर्षं, अनेक तपं सतावतो आहे. पण 'अथर्वशीर्ष' ह्याचा एक अर्थ 'अ-थर्व', न थरथरणारं शीर्ष म्हणजे डोकं.. अथर्वशीर्षाचं पठण मानसिक शांतता आणि बौद्घिक स्थिरता देते असा निर्वाळा आहे. आता शीर्ष म्हणजे डोकं स्थिर राहायला हवं असेल तर ते तसंच वजनदार नको काय? येणाऱ्या आणि येऊ घातलेल्या सर्व अडीअडचणींना शांत डोक्याने सामोरं जायचं असेल तर डोकं तसं भरभक्कम पाहिजेच.

कोणी कोणी सांगतात, अथर्वशीर्ष हे मंत्रगर्भ स्तोत्र अथर्ववेदाच्या परिशिष्टात आहे. म्हणजे एकापरीने शीर्षस्थानी आहे. म्हणून त्याचं नाव 'अथर्वशीर्ष'. असेलही, कोणी काही, कोणी काही अनुमाने काढून त्यानुसार तुमच्याकडे पाहतात. कोणी म्हणतात, तुम्ही शेतकऱ्यांचे आवडते आहात. तुमचा शेतकऱ्यांवर लोभ आहे. म्हणून भाताच्या लोंब्या असाव्यात तशी तुमची सोंड आहे आणि धान्य पाखडण्यासाठी ज्या सुपांचा उपयोग केला जातो तसे तुमचे कान आहेत. म्हणून तर तुम्हाला 'शूर्पकर्ण' असंही म्हणतात. पण एक गोष्ट खरी, तुमचं आगळंवेगळंं रूप, चार हात, 'लंबोदर' म्हणजे मोठं पोट, गजमुख हा सगळा काही वेगळाच प्रकार आहे.

कोणी सांगतात, तुम्ही मूळचं आर्यांचं दैवत नाही. तुमच्या स्वरूपाची मूळ संकल्पना 'विघ्नहर्ता' म्हणून नव्हे, तर 'विघ्नकर्ता' म्हणून झाली. अजूनही अगदीच अल्प प्रमाणात असणारे काही लोक तुम्हाला 'विघ्नकर्ता' म्हणून ओळखतात आणि तुम्हाला वचकतात, बिचकतात. मात्र गेल्या हजारो वर्षांच्या प्रवासात तुमचा 'विघ्नकर्ता' हा स्वभाव कुठे कधीकाळी असलाच तर तो आता पूर्णत: दूर झाला आणि आपलं बळ वापरून भक्तभाविकांची विघ्नं, संकटं दूर कशी करावीत, त्यांच्या आधी व्याधींचं निरसन कसं करावं या गोष्टीकडेच आपण अधिक ध्यान दिलंत. आम्हाला याचा अनुभव आहेच. पण आमची तुमच्यावर असलेली भक्ती त्या अनुभवासाठी हपापलेली नाही. तुमच्यावर आमचं मनापासून प्रेम आहे. तुमचे पाय आमच्या घराला लागावेत म्हणून कितीतरी आधीपासूनच तुमच्या आगमनाकडे आम्ही डोळे लावून असतो. तुम्ही आल्यावर तुमची काळजी आम्ही मनापासून घेतो. तुमच्या मूतीर्ला एवढीही इजा पोहोचू नये म्हणून आमच्या जीवाची तळमळ अखंडपणे चालू असते आणि आम्ही तुमच्या भक्तांनी तुमच्यावरची भक्तीपोटी किती आघात सोसले, तुमचे भक्त कोणाकोणाशी आणि कसे कसे लढले हे तर तुम्ही जाणताच.

गोव्यात चारशे वर्षांपूवीर् पोर्तुगीजांच्या राजवट जेव्हा स्थिरावली, तेव्हा त्यांनी तुमचा उत्सव होऊ नये म्हणून जीवघेणी बंधनं तुमच्या भक्तांवर लादली. त्याआधी असलेलं मोगली वातावरण तुमच्या भक्तांना छळत होतेच. पोर्तुगीजांनी मोगलाला पिटाळून लावलं आणि सुरुवातीची काही वर्षं तुमच्या पूजन-अर्चनाबाबत उदार धोरण दाखवलं. पण थोडीशी स्थिरस्थावरता येताच त्यांनी आपलं खरं रूप बाहेर काढलं आणि उत्सवात गणेशपूजन करणाऱ्याला देहदंडाची शिक्षा फर्मावली आणि तो देहदंडही असातसा नाही. गणेशभक्ताला अक्षरश: आगीच्या लोळात ढकलून देऊन त्याला तीव्र यातना देण्याचा अघोरी प्रकार सुरू केला. एवढ्यानेही काही झालं नाही. इतक्या हालअपेष्टा समोर दिसत असतानासुद्धा तुमच्या भक्तांनी गुपचुपपणे तुमचं पूजन चालूच ठेवलं होतं. मूतीर् घडवणं आणि घरात आणणं अवघडच होतं. म्हणून तुमचं एखादं चित्र पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला लावायचं आणि घराची दारं-खिडक्या बंद करून ती पेटी उघडून मनापासून तुमचं पूजन करायचं आणि हलक्या आवाजात तुमची आरती म्हणावयाची, मंत्रपुष्पांजलीचा उच्चार करायचा. आजदेखील कागदावरच्या चित्राची परंपरा क्वचित कुठे आढळतेे आणि तिथे मूतीर्ऐवजी कागदाच्या चित्राचं पूजन केलं जातं. हे असंच, कदाचित इतकं तीव्र नसलं तरी हालअपेष्टा भोगायला लावणारे प्रसंग अनेकदा आले. तुमची चेष्टाकुचेष्टा अन्य धमिर्यांकडून नाठाळपणे केली गेली. पण त्या निंदेचंही तुम्ही आणि तुमच्या भक्तांनी स्वागतच केलं. तुम्ही तर ही निंदेची उत्तरं आपल्या विशाल कानाआड करत आलात.

आम्ही महाराष्ट्रीय लोक तुम्हाला जे मानतो त्याची पाळंमुळं फार पुरातन काळापर्यंत गेलेली असली तरी सात-आठशे वर्षांपूवीर् ज्ञानेश्वरमहाराजांनी अध्यात्म क्षेत्रातलं उच्चतम तत्त्वज्ञान आपल्या मराठी भाषेत आणलं ते 'ँ़ नमोजी आद्या' अशा अजरामर शब्दांनी तुमचे स्मरण करून! गेली कित्येक शतकं जेव्हा जेव्हा काही नव्या कार्याला प्रारंभ केला जातोे तेव्हा 'प्रारंभी विनंती करू गणपती' असंच आम्ही म्हणतो. सुमधुर संगीतामुळे मराठी भाषेत चिरतरूण राहिलेलं संगीत नाटक 'सौभद' लिहिताना अण्णासाहेब किलोर्स्करांसारख्या मराठी रंगभूमीच्या आद्य दिग्गज नाटककाराची मती कुंठित झाली. त्यांना काही सूचेना, नाटक अर्ध्यावर थांबलं. अण्णांंना मुंबईच्या एका दुकानात तुमच्या मूतीर्चं दर्शन झालं आणि काय आश्चर्य, तत्क्षणी त्यांना पुढची कथा सुचली. अण्णांनी झपाट्याने नाटक पूर्ण करून महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केलं. पुढल्या शे-पन्नास पिढ्या या नाटकाचा मनमुराद आनंद लुटत आल्या. घरातल्या दारावरच्या गणेशपट्टीपासून ज्या घरात तुमचं चित्र नाही, ज्या देवघरात तुमची मूतीर् नाही असं कोणतंही घर वा देवघर सापडणार नाही. अगदी आजकालची फ्लॅटसंस्कृतीही याला अपवाद नाही. आम्ही तुमच्याशी किती एकरूप झालो आहोत म्हणून सांगू! आताच्या जीन्स-टीशर्टच्या युगात वावरणारी मुलं-मुली तुमच्या मंदिरासमोरच्या लांबच लांब रांगेत तासन्तास तिष्ठत उभी असलेली दिसतात. ते काय मनात भक्तिभाव असल्याशिवाय? त्यांना काही प्रचिती आल्याशिवाय का? असा तुमचा महिमा आमच्या मनोमनी रूजला आहे. यावे गणेशदेवा! सुखकर्ता दु:खहर्ता हे आपलं बिरूद सार्थ करण्याकरता यावं.

बा अदब, बा मुलाहिजा, होश्शियार, श्रीगणेशजी आ रहे है, निगाह रक्खो होश्शियार!
-ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर

मंगलमूर्ते दयाळा...

काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गर्दी जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वार्थी मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे.

....

हे गिरिजाकुमरा गजानना, लंबोदरा, विघ्नहरा तुला माझा शिरसाष्टांग नमस्कार.

गणराया, जे भक्त तुझे चिंतन करतात, त्यांना विघ्नं बाधत नाहीत. त्यांच्या सर्व शुभ आकांक्षा पुऱ्या होतात. म्हणून सर्व मंगल कार्यारंभी तुला वंदन करण्याची पद्धत आहे. तू चतुर्दश विद्यांचा स्वामी आहेस. वेद, शास्त्रे आणि पुराणे हे तुझेच ध्वनी आहेत. कृपानिधी गणनाथा, अभयदाता विनायका, माझ्या बुध्दीमध्ये चैतन्य येऊ दे. माझ्या मनामध्ये जीवनमुक्त होण्याची वासना प्रबळ होत आहे. ती पुरी व्हावी यासाठी मी तुला साष्टांग नमस्कार करतो.

खरं म्हणजे कुठल्याही उपासनेचा अंतिम हेतू मोक्षप्राप्तीच हवा. जन्ममरणाचे फेरे चुकवण्यासाठी अत्यंत तळमळीने, कष्टाने प्रखर उपासना केली पाहिजे. गणेशाच्या उपासकांना 'स्वानंद लोक' प्राप्त होतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अनादि काळापासून मंगलमय स्वरूपाची ही देवता आहे. 'श्री गणेशय नम:' याच मंत्राने कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ होतो. विश्वमाता आणि विश्वपिता असलेल्या पार्वती-महादेवांनीच गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला आहे. विघ्नांवर, संकटांवर संपूर्ण नियमन असलेली ही गणेशदेवता भक्तांची विघ्नं सहज दूर करते.

सिद्धी आणि बुद्धी या गणेशाच्या दोन शक्ती. म्हणून कुठलेही कार्य करण्यास लागणारी बौद्धिक प्रेरणा गणेशाच्या कृपेनेच मिळते. सर्व देवांचा आद्य-पूजनीय अनंतकोटिब्रह्मांडनायक, गणांचा अध्यक्ष ब्रह्माणस्पती, सकल विद्यांचा निधी, निर्गुणाचाही मूळारंभ असा जो हेरंब, अष्टसिद्धीयुक्त असून त्याची कृपा असीम असते हे निजभक्तांचे अनुभव आहेत.

अध्यात्म हा विषय अंत:करणात उचंबळणाऱ्या अवर्णनीय भक्तीप्रेमाचा हवा. निखळ प्रेमाला बुद्धी, पांडित्य, व्यवहार अभिप्रेत नसतात. या परमार्थाच्या वाटचालीत निर्व्याज प्रेमाची, अव्याभिचारी भक्तीची, स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक अंत:करणाची नितांत आवश्यकता असते. पूजा करताना, भगवंताच्या लीला ऐकताना, प्रार्थना करताना, नाम स्मरताना, ईश्वरप्रेमाने ज्याचं अंत:करण भरून येत नाही, कंठ दाटून येत नाही, डोळे पाणावत नाहीत, हृदयात ब्रह्मारूप प्रकटत नाही त्याची भक्ती वांझ असते. ईश्वरचरणी सर्वस्वाने वाहिलेलं मन हीच खरी पूजा होते.

दुदैर्वाने अशी भक्ती पाहावयास मिळत नाही. काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गदीर् जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वाथीर् मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे. आपले प्रश्न पुरूषार्थाने, विवेकाने, अध्यात्मिक साधनेने आपणच सोडवायचे असतात. पण लोकसमूहाला स्वाथीर्, मतलबी ठेकेदारांनी नवसाच्या फळाची प्रलोभनं दाखवली आहेत. गणेश भावाचा भुकेला आहे, नवसफेडीच्या वस्तूंचा नाही. गणेशचतुथीर्पासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा चालू करताना लोकमान्यांच्या मनात फार उदात्त लोकजागरणच्या भावना होत्या. कारण गणेश ही बुद्धीची देवता आहे. या सार्वजनिक कार्यक्रमातून वैचारिक उद्बोधन व्हावं, अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, मरगळ, निराशा नष्ट व्हावी, प्रबोधनाने जनतेचा आत्मविश्वास वाढावा, प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात कसं करावं याबद्दलची व्याख्यानं व्हावी अशा उत्तमोत्तम संकल्पना मांडून त्या महापुरुषाने सर्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण आज त्या संकल्पनेचा फज्जा उडालेला दिसतो. भक्तीभावना तर फोफावत नाहीच. पण अनेक वाममागीर् धंदे उत्सवाच्या नावाखाली चालतात.

१) जबरदस्तीने वर्गण्या वसूल करणं.

२) गजाननांच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या पवित्र मूतीर्समोर अश्लील सिनेमे, अर्वाच्य भाषा असलेली नाटके, ऑकेर्स्ट्राचा, धांगडधिंगा, कार्यर्कत्यांचं रात्री दारू पिऊन पत्ते खेळणं, दोन मंडळांतल्या मारामाऱ्या पर्यायाने सामाजिक अशांतता दिसते.

३) मोठ्या आवाजातल्या लाऊडस्पीकरने प्रचंड ध्वनिप्रदूषण, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करणं, गणेशमूतीर् आणताना आणि विसर्जन करताना फटाक्यांच्या माळा लावणं, ताशा वाजवणं, तान्ही मुलं, वृद्ध व्यक्ती,रुग्ण यांचा विचार न करणं, रस्त्यारस्त्यावर गणेशमूतीर् स्थापन करून ट्रॅफिक जाम करणं हे लोकमान्यांना अभिप्रेत होते काय? या सर्वांत गणेशाबद्दल प्रेम किती आणि स्वत:चा आनंद किती हा विचार केल्यास सार्वजनिक गणेशोत्सवात विधायक असं फारसं काही घडत नसून स्वार्थ साधण्याची वृत्ती बळावताना दिसते.

४) भक्तीभावाने गोड स्वरात आरत्या ऐकू येत नाहीत. विचारांची भाषणं होत नाहीत. मार्गदर्शन, प्रबोधन कार्यक्रम नसतात. गणपती विसर्जनाच्या दिवशीही गणेशाला निरोप देताना कंठ दाटून आलेले, व्याकूळ झालेले भक्त दिसत नाहीत. उलट अचकट विचकट हावभाव, उद्वेगजनक अंगविक्षेप, मद्यपान करून धुंद नाचत गुलाल उधळणं या सर्व गोष्टीत काय अध्यात्म आहे, हेच समजत नाही.

५) गणपतीच्या देवळात उलटं चालत जाणं, तासन्तास रांगेत उभे राहणं, नवस बोलून देवाला वेठीस धरणं, हार-तुरे-मिठाई यावर पैसे उधळणं हे सर्व करण्यापेक्षा गणेशाची मनापासून उपासना करणं, प्रेमाने स्तोत्र म्हणणं, आपल्याकडून शांततेचा भंग होणार नाही ही काळजी घेणं, मनोरंजनाच्या नावाखाली होणारी पैशांची उधळपट्टी थांबवून तोच पैसा गोरगरिबांच्या अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान या गरजांसाठी दिल्यास गजाननांची केवढी प्रसन्नता प्राप्त करून घेता येईल!

सूज्ञ भक्तांनी उत्सवाचा उद्देश, भक्तीची मूळ संकल्पना समजून घ्यायला हवी. माझा खूप मोठा प्रेमसखा गणेशा आहे याचीच नेमकी विस्मृती होते. सिनेमा-नाटके-वाद्यवृंद-लावण्या यांचा गजाननांच्या भक्तीशी काहीही संबंध नाही तो अपवित्र धांगडधिंगा प्राणप्रतिष्ठीत पवित्र गणेशमूतीर्समोर घालून आपण पापंच जोडत आहोत हे विचार केल्यास कळेल.

गणेशोत्सवाच्या काळात ५०-५० पावलांवर नव्या मंडळांच्या गणेशमूतीर् स्थापन होतात. सहस्त्रावर्तनाच्या उद्देशाने शेकडो लिटर दूधाचा अभिषेक होतो. ते दूध गरीब कुपोषित बालकांना प्यायला मिळाल्यास गणेशाची केवढी मोठी कृपा प्राप्त करून घेता येईल!

एखाद्या गणेश मंदिरात उसळणारी भक्तांची गदीर् हे त्या देवळाचं किंवा त्या मूतीर्चं 'नवसाला पावणारी देवता' हे गमक नसून स्वत:च्या स्वार्थ साधण्यासाठी होणारी ती लोभी माणसांची गदीर् आहे, निजभक्तांची नव्हे. कारण खरा भक्त मंदिरात कधीही याचना करत नाही तर फक्त व्याकूळ प्रार्थना करतो. मनुष्य जगण्यासाठी जन्माला येत नाही, जाणण्यासाठी येतो. सकाम भक्ती जीवनाचा व्यापार असतो. निष्काम भक्ती आत्म्याचा आनंद असतो. लोकांची गदीर् वाढावी. पर्यायाने दानपेटीत भरपूर माया जमावी या उद्देशाने 'जागृत देवस्थान', 'नवसाला पावणारा गणपती' असे चमत्कार अभिप्रेत असतील तर तिथे स्वाथीर् गदीर् असेल पण जाणकार ददीर् नसतील. चमत्काराच्या जोरावर लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणं म्हणजे परमार्थातली वेश्यागिरी करण्यासारखं आहे. साक्षात्कार हा परमार्थमार्गाचा कळस आहे.

देवाला नवसफेडीची लालूच दाखविणाऱ्या अज्ञानी भक्तांनी साधा विचार करावा त्या अनंतकोटी ब्रम्हांडनायकाला आपण एवढेसे चिमुकले जीव काय देणार! त्या कर्तुमकर्तुम महाशक्तीला आपल्यासारख्या क्षुद, र्मत्य माणसांकडून कोणती अपेक्षा असणार? कोटी सूर्यांचं तेज असणाऱ्या त्या महाशक्तीला आपण चिमुकल्या निरांजनाने ओवाळतो हा आपला आनंद आहे. मोठेपणाच्या भावनेने आपण देवासाठी जे जे करतो ते सारे परमात्म्यानेच निर्माण केले आहे, हे विसरू नये. फळं, फुलं, जल ही सर्व त्याचीच निमिर्ती नव्हे का? माझे अमूक काम झाल्यास मी तमुक वस्तू तुला देईन असा नवस बोलून आपण त्या विराट शक्तीला किती कमी लेखतो. नित्य तृप्त परमात्मा कशाचीही अपेक्षा करत नाही. तान्हं मूल स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही तर त्याचं सर्व आईलाच करावं लागतं. तरीही या एका गोष्टीने आई कंटाळत नाही. उलट त्याचं सर्व करताना मातेला खूप आनंद होतो, धन्य वाटतं. ती गोष्ट म्हणजे त्या तान्हुल्याचा निरागस चेहरा, निष्पाप डोळे, आई दिसली नाही की कासावीस होणं, त्याचं निर्व्याजपण आणि आईला पाहताच खुदकन हसणं एका आईशिवाय त्याला काहीही सुचत नाही.

अति चांगट जरी ललना। खेळ भातुके देता नाना।

तेथे न जडे बाळभावना। कुरूपहीन माता गोड।।

तशी भक्ताची अवस्था होणं आणि त्या भावावस्थेत परमेश्वराची उत्कट भक्ती करणं हेच आध्यात्माचं रहस्य आहे. अभक्तीने केलेले राजोपचारही परमात्म्याला रुचत नाहीत. काही अपेक्षा मनात ठेवून ईश्वरसेवा करणं हा व्याभिचारी व्यवहार होतो आणि व्यवहारात कुठली आली- आपुलकी, जवळीक आणि ओलावा! म्हणून वरवरची बेगडी भक्ती ठेवून सेवेचं प्रदर्शन करू नये. प्रेम नसलेली पण अपेक्षा असलेली गणिकाच प्रेमाचं जास्त प्रदर्शन करते. पण प्रेमाने ओथंबलेली गृहिणी फक्त अबोल त्यागच करत असते. मणभर पेढ्यांपेक्षा कणभर प्रेमच श्रेष्ठ असतं.

गणपती उत्सवानंतर कुठल्या गणपती मंडळाला किती किलो सोनं मिळालं, किती लाख रुपये मिळाले, हिऱ्याचा मोबाईल मिळाला, कोणत्या देवस्थानाचे उत्पन्न सर्वाधिक अशा बातम्या सचित्र पेपरमध्ये किंवा वाहिन्यांवर दाखवल्या जातात तेव्हा या सर्वांची कीव करावीशी वाटते. गजाननांचा साक्षात्कार कोणाला झाला, मानसिक किंवा आत्मिक शांती किती जणांना मिळाली, प्रबोधनामुळे किती जीवने सुधारली त्याबद्दल एकही उदाहरण छापून येत नाही किंवा दाखवलं जात नाही म्हणून उत्सव मंडळं ही मोठी आथिर्क उलाढाली करणारी केंदं होऊ नयेत. कारण खऱ्या भक्तीचा त्यात लवलेशही नसतो. उलट देवाच्या नावावर धांगडधिंगा घातल्याने ते विकृत स्वरूप आस्तिकालाही नास्तिक करण्याचा संभव असतो.

सावधान! यापुढे धांगडधिंग्याची ही सर्व पध्दत बंद करून खऱ्या गणेशभक्ताने त्याच्या चरणी प्रार्थना करावी...

मंगलमूतेर् दयाळा धावत बा येई। दुस्तर या भवजलमधुनी पार मला नेई।

स्वानंदेशा श्रीहेरंबा बहुतचि मी चुकलो। अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो।

धरणीधरा ऐसे द्यावे। सर्वांभूती लीन म्या व्हावे।

।। मंगलमूर्ति मोरया।।

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

हे तरुणांनीच बदलायला हवं.


आज गणेशोत्सवाचं रूप बदलायची जबाबदारी तरुणांवर आहे. कारण हा उत्सव त्यांचा आहे. ते करू शकतील अशा गोष्टीही भरपूर आहेत.
......


मला तरुणांच्या ओठावर कोणते गीत आहे सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो असं कोणी विचारवंत सांगून गेला आहे. अत्यंत समर्पक असे हे उद्गार. दरवषीर् मुंबईत, गोविंदा, गणेशोत्सव अशा दरवषीर् होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी या वचनाची आठवण येते. मुळात उत्सव म्हटलं की, सळसळती तरुणाईच डोळयासमोर येते. अगदी आयोजनापासून ते सांगता होईपर्यंत. यात ज्येष्ठांचा सहभाग अर्थातच असतो, पण त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते. सारी धावपळ, दगदग, आयोजन ही जबाबदारी तरुणांची असायला हवी.

मुंबईत तरी, हे उत्सव म्हटलं की तरुणच डोळयासमोर येतात ही सकारात्मक बाब आहे. उत्सव कदाचित एखादा दिवस किंवा नऊ दिवस किंवा दहा दिवस रंगणारा असो, साधारण १६ ते ३० वर्षं वयोगटातील युवक सर्वत्र दिसतात. बेभान होऊन नाचताना किंवा रात्रभर जागरण करून पुन्हा पहाटे कामाला लागणारा असा हा तरुणांचा गट असतो. यांच्यामुळेच हे उत्सव दणक्यात होतात हेही मान्य करायला हवं. पण गेल्या काही वर्षांत हे उत्सव अधिकाधिक त्रासदायक होऊ लागले आहेत अशाही तक्रारी होत आहेत. अनेकदा नियम, कायदे धाब्यावर बसवून ते साजरे होताना दिसतात. असं होत असेल तर त्याचीही जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी लागेल. आपल्याकडे उत्सव म्हणजे, भरपूर सजावट, भपना, अमाप खर्च असे समीकरण होऊन बसले आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं समर्थन असं असतं की, आम्ही वर्षभर उत्सव साजरे करत नाहीत, तेव्हा थोडा त्रास झाला तर काय बिघडतं? कोणी याबाबत विरोधी आवाज उठवला तर काही वेळा धमक्यापर्यंत मजल जाते.

यात एक बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे, वर्षभर समाजाचा कोणता ना कोणता घटक आपापले उत्सव साजरे करत असतो. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर वर्षभर लोकांना त्रास सहन करावा लागेल. नको ती गाणी मोठमोठ्याने लावताना कोणीतरी वृद्ध, बालक झोपलं असेल, कोणी विद्याथीर् अभ्यास करत असेल, कोणाकडे शोककार घटना घडली असेल याचाही तरुणांनी विचार करायला हवा. आपल्या हौसेची किंमत इतरांनी का मोजावी असा प्रश्ान् निर्माण होतो.

काही ठिकाणी मंडळाच्या पैशाचे हिशेब लागत नाहीत, किती वर्गणी जमा झाली हे कळत नाही अशा तक्रारीही होतात. असं होणं अर्थातच तरुणांना शोभादायक नाही. या अशा उत्सवांच्या निमित्ताने, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. उत्सवादरम्यान ते अमलात येतात पण असं कार्य वर्षानुवर्षं कसे करता येतील याचा विचार होत नाही.

तरुणांनी आपली शक्ती कशी कामी लावायची हे ठरवायला हवं. आज मराठी तरु ण लष्करात जात नाही, अशी तक्रार आहे. यावर, साहसाची आवड असणाऱ्यांना याकडे उद्युक्त करण्याचं काम या तरुण कार्यर्कत्यांनी करायला हवं. गरीब वस्तीत शिक्षणाची आच आहे, पण पैशाअभावी ती साध्य करता येत नाही ही स्थिती असणारे अनेक असतात. ही मंडळं, तरुण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा विचार व्हायला हवा.

अनेक मंडळं आपापल्या परीने काम करत असतात, पण तरीही एकंदर चित्र अधिक आशादायक करता येईल. पण असंही दिसतं की, अनेक तरुण कोणत्या का कोणत्या राजकीय पक्षांनी बांधलेले असतात. राजकीय पक्षांचा कार्यक्रम मर्यादित असतो. त्यांना ही शक्ती सत्ता मिळवण्यासाठी, आंदोलने करण्यासाठी वापरायची असते. पण लोकांना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्यांना हात घालावं असं त्यांना वाटत नाही. साधं उदाहरण म्हणजे, मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे आहेत. श्री गणेशाला याच रस्त्यावरून यावं लागतं आणि विसर्जनाचा प्रवासही ठेचकाळत करावा लागतो. पण अशा मंडळांच्या तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याचं दिसत नाही, राजकीय पक्षांना हा कार्यक्रम घ्यायला भाग पाडलं जात नाही. याला कारण बहुसंख्य तरुण राजकीय पक्षांकडे झुकलेले असतात, स्थानिक नगरसेवक, आमदार, अशांनी त्यांना बांधून ठेवलेलं असतं.

आज अनेक समस्या सामान्य माणसाला भेडसावत आहेत. हे बहुतेक तरुण याच घरांतून आलेेले असतात. त्यांनी आपली शक्ती आणि युक्ती केवळ उत्सवाचं आयोजन करण्यात दवडण्यात काय अर्थ आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर, लोकलमधून येत असताना, भजनी मंडळ एका डब्यात जोरजोरात टाळ वाजवत आणि कर्कश्श स्वरात भजनं म्हणत असतात. यात अनेक तरुण असतात. अशा प्रकारे, इतरांना उपदव ठरून देव पावत नाही हे त्यांना कळत नसेल का? रेल्वेचा डबा ही आपली खाजगी मालमत्ता नाही हे त्यांना कळत नसावं? पण दिशा चुकलेले असे युवक उत्सवात वावरत असतात.

हे उत्सवच नव्हे तर, एकंदर सर्वत्र शिस्त, शांतता येईल याची जबाबदारी या युवकांवर आहे. त्यामुळे या युवकांचं कार्य सांगा, मी शहराचं भवितव्य सांगतो, असं म्हणायला हवं.

शुक्रवार, १० जुलै, २००९

वी लव्ह हिम.

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................

' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .

ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .

खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

उत्तर : लीडर

प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला ?

उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'आपल्यालाच उलट प्रश्न विचारण्यात येतो .)

प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं कापली ?

उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर चालेल ना ?')

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !) औरंगजेबाने

प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार आणला ?

उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय म्हणतात ते आठवत नाही )

इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !

या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !

तुझी साथ.

जीवनाच्या या खडतर वाटेवर लाभली तुझी साथ
स्वखुशीने पुढे केलास तू प्रेमाचा हात
तुझे ते सुमधुर बोलणे पटकन मनात
ठसते
बाह्यांगावरूनच तुझ्या सोज्वळतेची खात्री पटते.
तुझा तो लाघवी स्वभाव मनात उमेद निर्माण करतो
प्रत्येक नवीन गोष्ट करण्याची मला प्रेरणा देतो.
तुझ्याशिवाय माझे हे जगणं व्यर्थ आहे
तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे.
तुझे अस्तित्व मला सर्व ठिकाणी जाणवते
तू माझ्या जवळच आहेस याची जाणीव करून देते.
तुझे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व मनाला भुलवते
त्यामुळेच तुझ्या आठवणीत मी दिवसरात्र झुरते.
तुझ्या या प्रेमळ वागण्याने माझी झोपच उडाली आहे
सांग बरं, माझ्यावर तू कोणती जादू केली आहेस?
नकळत तुझे आणि माझे सूर जुळले
माझे अवघे जीवनच बदलून गेले.

जगण्याचा मार्ग.

स्वत:चं भविष्य, करिअर सगळेच बघतात. मी पण बघतोय आणि पण हे सगळं असताना सामाजिक देणं म्हणून मी नेहमी काही ना काही सामाजिक कार्य करत असतो.

मला काय मिळणार... काय फायदा होणार, याशिवाय कुठलंच काम होत नाही का किती फायदा बघणार! आतापर्यंत आपण प्रत्येक जण फायदाच बघत आलोय. फायदा बघतोय आणि पुढे ही बघतच राहणार.

जन्माला आल्यानंतर नकळत्या वयापासून आपण स्वत:चा फायदाच बघतोय. मी आणि माझं हेच... पाहत आलोय.

मग आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ स्वत:चा फायदा न बघता कुठलं काम करू शकत नाही का?

एवढं आपण मीपणात गुरफटून गेलोच की. आपल्या फायद्याशिवाय काहीच विचार किंवा काम करता येत नाही.

इतिहास डोकावून पाहिला तर समजेल.

बाबू गेनू यांनी परदेशी मालाने भरलेल्या गाडीखाली झोकून दिले. त्याने बघितला होता का स्वत:चा फायदा?

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा गांधी यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी घालवलं त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

विनोबा भावे गोरगरीबांसाठी गावोगावी फिरले, त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले स्वत: शिकून हालअपेष्टा झेलत स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समर्पण केले. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबा आणि साधनाताई आमटे यांनी सुखी जीवन सोडून जंगलात वाईट दिवस काढून ज्या कुष्ठरोगींची सेवा करून त्यांच्याकडून एक वेगळं विश्व निर्माण केलं. त्यांनी साधनाताईंनी बघितला होता का आपला फायदा? त्याची मुलं, सुना, नातवंडे पण हेच कार्य करताहेत त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

या लोकांनी जर आपला फायदा स्वार्थ बघितला असता तर काय झालं असतं या देशाचं, हे आपण कल्पना करूनच पाहवं. आपल्याला जरी या लोकांत सारखं महान कार्य करता येत नसलं तरी मला वाटतं आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आपला फायदा विसरून, स्वार्थ सोडून, मीपणा काढून काहीतरी कार्य करायला हवं आणि याच निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यानेच आपला एक परिपूर्ण माणूस बनायला मदत होते.

मीपण तेच करतोय अर्थात मी पण स्वत:चा विचार करतोय मला आर्ट डायरेक्टर बनायचंय आहे. त्यासाठी शिकायचं आहे. घरची जबाबदारी संभाळायची आहे. गाडी, बंगला, बँक बॅलन्स मलाही करायचं आहे. आणि त्यासाठी जी मेहनत करायची आहे ती करतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, मी ठरवलं आहे ते मी करेनच, त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. मग हे करत असताना जर मी काही वेळ स्वत:चा फायदा न बघता, कोणाची तरी मदत करत असेल, एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मी उपयोगी पडत असेन. एखादं सामाजिक कार्य करत असेल तर यात माझं काही चुकतंय का?

मला वाटतं अजिबात नाही चुकत माझं.

प्रत्येकाने असाच विचार करायला हवा, खरं आयुष्य जगणं म्हणजे हेच आहे. पण मी मात्र थांबणार नाही. स्वत:साठी करतोयच पण नि:स्वाथीर् मनाने जिथे गरज असेल तिथे दुसऱ्यांना मदत करतच राहिल. बाकी कोणीही काही बोलो. मला माझा जगण्याचा मार्ग सापडला आहे आणि मी असाच जगत राहणार.

- Namdev Bamane.

गुरुवार, ९ जुलै, २००९

बेळगावचा धडा.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणा-या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

.................

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप चालू आहे आणि ते आणखी काही काळ चालू राहील, याचे महत्त्वाचे कारण हे की, पुढील लोकसभा निवडणुकांपूर्वीचा दक्षिण भारतातील हा बहुधा शेवटचाच सार्वजनिक कौल. म्हणूनच कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, याकडे ब-याच जणांचे बारीक लक्ष होते. त्यातले अनेकांचे अंदाज चुकले, हे ओघाने आलेच. ज्यांचे अंदाज चुकले, ते आधी छातीठोकपणे आपण बोलतो, लिहितो ती कशी काळ्या दगडावरची रेघ आहे, हे सांगत होते. आता तीच मंडळी चुकलेल्या अंदाजांचे तर्कशास्त्र वाचक आणि टीव्ही प्रेक्षकांच्या गळी उतरवत आहेत. हे असेच दर वेळी चालते. या निवडणुकीतील महाराष्ट्राच्या दृष्टीने बातमी ही की, कर्नाटक विधानसभेतील बेळगाव, कारवार या सीमाभागातील जनतेचा गेली पाच दशके चाललेला लढा या निवडणुकीने संपुष्टात आणला. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता विधानसभा सीमाभागाविषयी जो काही निर्णय घेईल व विविध सामाजिक, सांस्कृतिक धोरणे संमत करेल, त्याचा प्रतिवाद विधिमंडळाच्या आत करण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. निदान ही विधानसभा हयात असेपर्यंत सीमावासीयांना आपल्या मागण्यांसाठी विधानसौधाच्या बाहेर फूटपाथवरच तिष्ठावे लागणार. गेली पाच दशके केवळ एकाच मागणीसाठी लढत राहणा-या बेळगाव, कारवारातील मराठी माणसांचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

भाषानिहाय प्रांतरचना करण्याचा फाझलका कमिशनचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला व १९५६ साली मुंबई प्रांतातून कानडी भाषिक वगळले व म्हैसूर राज्याला जोडले, तेव्हापासून हा लढा चालू आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे साडेतीन-चार वर्षे पेटलेले आंदोलन मुख्यत्वे मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून व्हावा, यासाठी होते. त्यामुळेच गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या स्थापना होताना १९६० साली मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून झाला, यातच मराठी जनांचे हात स्वर्गाला टेकले. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरचा डांग जिल्हा अगोदर वादग्रस्त होता, पण तो वाद तिथेच विरला. आणखी काही सीमाप्रांतही चूप बसले, पण बेळगाव, कारवारची मंडळी जोर लावत राहिली. त्यांची सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे आथिर्क नाती महाराष्ट्राशी अधिक जवळची होती, हे एक कारण होतेच. त्यामुळे सीमाभागातील काही लढवय्ये लढत राहिले आणि हरतही राहिले. महाजन आयोग महाराष्ट्राच्या आग्रहाखातर अस्तित्त्वात आला. त्याचा निकाल विरुद्ध गेला. कर्नाटकच्या दृष्टीने हा प्रश्न तिथेच सुटला, पण लोकेच्छा तशी नाही, हे त्यानंतरच्या विविध स्तरांवरील निवडणुकांनी वारंवार दाखवून दिले. कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणुकीतून जाहीर होणारी लोकेच्छा या स्वतंत्र बाबी आहेत, हे खरे. पण संसदीय लोकशाही मानणा-या राज्यव्यवस्थेत या निवडणुकीतून प्रकट झालेल्या लोकेच्छेचाही विचार व्हायला हवा. ही लोकेच्छा अधिक स्पष्टपणे आजमवायची, तर सार्वमत हा मार्ग होता. तो घ्यायची गरज कर्नाटकला वाटत नव्हती, कारण सीमाभाग तांत्रिकदृष्ट्या कर्नाटकाचाच भाग होता. महाराष्ट्राला असे सार्वमत घेण्यात धोका वाटत होता, कारण गोव्यात सार्वमत घेण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या अंगलट आला होता. अशा वेळी वारंवार आंदोलने पेटवणे, मोर्चे, धरणे, उपोषणे, शिष्टमंडळे आदी शिष्टसंमत उपायच अंमलात येत होते.

या विषयात कर्नाटकात अर्थातच स्वारस्य नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आदी सीमाभागातील प्रदेश वगळता कोणाला त्यात सोयरसुतक नाही. आधी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांनी आणि नंतर एन. डी. पाटील, शरद पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला खरा, पण तो केवळ राजकारण म्हणून. मुंबई, दिल्लीत बसून सीमावासीयांच्या बैठका घ्यायच्या, त्यांना आश्वासनांची गाजरे दाखवायची, झिंदाबादच्या घोषणा ऐकून कान तृप्त करून घ्यायचे आणि आपाल्या उद्योगांना लागायचे, यापलीकडे केव्हाही काहीही झाले नाही. शिवसेनेनेही हा विषय हाती घेऊन कोणालाही जमले नाही, असे उग्र आंदोलन उभारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाताबाहेर चाललेली परिस्थिती ओळखून विशाल गोमंतकचा पर्याय मांडला. तोही तिथेच थिजला.

अशा वेळी सीमाभागातील मंडळींना आपला लढा केवळ स्वत:च्याच जोरावर लढावा लागणार, हेही स्पष्ट झाले. महाराष्ट्र एकीकरण समिती या संयुक्त व्यासपीठावर सर्व मराठी जनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातच विलीन होण्याची मागणी सातत्याने लावून धरली असती, तर कदाचित चित्र बदलले असते. पण जसजशी वर्षे मागे जाऊ लागली, तसतसे या भागातील नवतरुण या मागणीपासूनही दूर जाऊ लागले, हे वास्तव आहे. पिकलेल्या केसांच्या आणि टक्कल पडलेल्या निवृत्त व निरुद्योगींचा टाइमपास असे सीमालढ्याचे स्वरुप उरले, हे वास्तवही नाकारता येत नाही. पण ही मंडळी आपल्या भूमिकेविषयी कमालीची हळवी आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या पेपरांत या आंदोलनाविरुद्ध ब्र जरी छापून आला, तरी रान उठते. त्यांची भावना ठीक आहे. तिचा आदर राखतानाच वास्तवाचे भान सोडून कसे चालेल?

' सार्मथ्य आहे संघटनेचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे वास्तव्य पाहीजे', असे समर्थ रामदासांनी सांगितले. सीमावासीयांनी संघटना तर बांधली. पण ती समर्थ कशी होणार? कारण संघटनेचे मुख्य सूत्र एकी हे असेल, तर तिचाच अभाव या एकीकरण समितीत आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटक सरकारने बेळगाव शहराला 'उपराजधानी'चा दर्जा दिल्याने शहराचे रुप पालटू लागले. महाराष्ट्रात जाऊन एका जिल्ह्याचे गाव बनण्याऐवजी 'उपराजधानी' म्हणून दिमाखात राहावे, असे काही मराठी तरुणांनाच वाटू लागले, हे खरे आहे. त्यांना सत्य परिस्थिती सांगून आपल्याकडे वळवायचे, तर समितीत ऐक्य हवे आणि हे ऐक्य निवडणुकीत दिसायला हवे. मराठेशाहीच्या उत्तरार्धात मराठे सरदार आपसात लढले आणि सर्वजण पराभूत झाले. बेळगावातील मराठी नेत्यांनी हा उत्तर पेशवाईचाच आदर्श स्वत:समोर ठेवला.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहीले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणाऱ्या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

समितीतले नेते छोट्या स्वार्थासाठी आपसात लढले आणि परिणाम म्हणून एकीकरण समितीचाच नव्हे, तर मराठी भाषिकांचा गुणफलक कोराच राहीला. हा पराभव केवळ महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून मिरवणाऱ्या डझनभर लोकांच्या टोळीचा नव्हे, तर समस्त मराठी समाजाचा झाला. या पराभवाच्या पापाचे धनी कर्नाटकातील कानडी नेते नसून मराठी भाषिकच आहेत, हे ध्यानात घ्यायला हवे. कर्नाटकातील सर्व मोठ्या पक्षांना सीमाभाग आपल्याच राज्यात हवा आहे. म्हणून त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्नच नाही. पण या प्रश्नावर महाराष्ट्रात रान उठवणारे किती मराठी नेते एकीकरण समितीच्या प्रचाराला गेले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ कर्नाटकात 'प्रचार' करत होते. त्यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जरूर प्रचार केला असेल. पण तिथल्या तुमच्या भाषा बांधवांचे काय? त्यांची तुम्हाला काळजी नाही, हे आता स्पष्ट झाले. मग महाराष्ट्रात एकीकरणाच्या परिषदा आणि राणाभीमदेवी आगखावू भाषणे कशाला? आणि कोर्टकज्जे तरी कोणाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी? याचा एकदाच अंतिम निर्णय घ्यायला हवा. कारण सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनाशी असा वर्षानुवर्षे खेळ खेळणे अमानुषपणाचे आहे.

बेळगावची महापालिका जिंकून तिथल्या मराठी समाजाने आपला ध्वज तिथं मानाने फडकावला होता, पण महापालिकेत जे जिंकले, ते मोठ्या प्रमाणावरील विधानसभेत पूर्णपणे गमावले. आता मराठीचा मुद्दा कोण लावून धरणार? महाराष्ट्र सरकारने सीमाभागाचा प्रश्न ब-याच उशीराने का होईना, सुप्रिम कोर्टात नेला आहे, त्याचा निकाल लागेल, तेव्हा लागो, तोपर्यंत विधानसभा निकाल हेच सार्वमत मानून कर्नाटक सरकार बेळगावचे कानडीकरण करणार. त्यास विरोध कोण व कसा करणार?

बेळगावचा धडा असा आहे. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मुंबई कोणाची? हा सवाल उपस्थित झाला आणि समस्त मराठी जनांनी त्याचा जवाब ती मराठी माणसाचीच, असा दिला. त्याचा परिणाम दिसलाच. ठाण्याच्या निवडणुकीतही असेच ऐक्याचे दर्शन घडले. बेळगावने अशीच एकजूट दाखवली असती, तर इतिहास बदलला असतो. पण आता ती वेळ पाच वर्षांसाठी तरी टळलेली आहे. आता केवळ चचेर्चे कवित्वच आपल्या हाती आहे.

bharat.raut@timesgroup.com

( लेखक टाइम्स ऑफ इंडिया समुहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)

शनिवार, २७ जून, २००९

सप्रेम धन्यवाद, विनंती विशेष! - श्री. राज ठाकरे


लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना लोकांनी भरभरून मतदान केले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. अवघ्या तीन वर्षांच्या `मनसे' ला आपण जे प्रेम दिले, जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरविण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावून मी यापुढील वाटचाल करीन. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पक्षाची स्थापना केल्यानंतर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीतही आपण मला साथ दिली होती. त्यावेळी पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मतदान लोकसभा निवडणुकीत करून आपण माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसाठी यापुढे अधिक कडवटपणे लढण्याचे बळ मला मिळाले आहे. आपले प्रेम यापुढेही असेच भरभरून मिळावे, यासाठी माझे `महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न' आपल्यासमोर मांडत आहे.

गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास का झाला नाही? महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात देशाचा आदर्श का बनू शकले नाही? या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वच पक्ष याला कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. त्या सार्‍यानीच महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावण्याचे काम केले आहे. दिल्लीपुढे लोटांगण घालत आपली खुर्ची सांभाळण्याचे काम केले आहे. मराठीचा मुद्दा आमचाच, असे म्हणणार्‍यानाही महापालिकेत सत्ता असतानाना दुकानांवर मराठीत पाट्या लावता आल्या, ना संसदेत महाराष्ट्राचा आवाज उठवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सार्‍याचीच नावे उठता-बसता घेणाऱ्या ‍आजच्या राजकारण्यांनी या युगपुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आज आहे का, व त्यासाठी आपण कोणते प्रामाणिक प्रयत्न केले, याचा एकदा तरी आढावा घ्यावा. `मनसे' ला लोकसभेत एकाही जागी विजय मिळाला नसला तरी अवघ्या तीन वर्षांच्या माझ्या पक्षाला मतदारांनी दिलेली `लाखमोला' ची मते ही लोकांना`गृहित' धरून राजकारण करणार्‍याच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकावून जाणारी आहेत. कालपर्यंत `मनसे' ला अनुल्लेखाने टाळणारी ही मंडळी आज `मनसे' मुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे गळा काढून सांगत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींनी गेल्या काही वर्षांत आपली विश्वासार्हता किती गमावली आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का?

गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत `मनसे' ने अनेक आंदोलने केली. माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तडीपार्‍या भोगल्या. माझ्या स्वत:वर ८० हून अधिक केसेस आहेत. हे सारे मराठी माणूस उघडे डोळे ठेवून पाहात होता. माझ्या भाषणातील तसेच कृतीतील तळमळ त्याला दिसत होती. त्यामुळेच त्यांनी `मनसे' ला भरभरून मतदान केले. यामध्ये नवमतदारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढलेल्या जाबादारीची संपूर्ण जाणीव मला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मी पाहिले. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडविण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी विकासाची `ब्लू प्रिंट' मी तयार केली. आज जो विश्वास आपण दाखवलात, तसाच विश्वास यापुढेही दाखवलात आणि महाराष्ट्राची सत्ता `मनसे' च्या हाती दिलीत, तर लोकहितासाठी कठोरपणे राज्यकारभार करून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार करून दाखवेन, एवढाच शब्द आज मी आपल्याला देतो.

दिल्लीच्या मनात महाराष्ट्राचा विकास होऊ नये, असेच आहे. किंबहूना, महाराष्ट्राविषयी दिल्ली व उत्तरेतील राजकारण्यांच्या मनात आकस व रागच आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासूनच हा आकस कायम असल्याचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीच स्पष्ट झालेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी चिंतामणराव देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दाखविलेल्या बाणेदारपणानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक सर्वच नेत्यांनी दिल्लीश्वरांपुढे कायम लोटांगणच घातल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील आजचे राज्यकर्ते तर टीकेपलीकडेच आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्न उराशी बाळगून मी `महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना केली. आज जो मी लढत आहे, तो केवळ विरोधासाठीचा विरोध म्हणून नाही, तर एक ठाम भूमिका घेऊन मी उभा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा हा लढा आहे.

जगभर अनेकदा फिरण्याचा मला योग आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही मी अनेकदा फिरलो आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांनीच नव्हे, तर अनेक छोट्या देशांनी केलेली प्रगतीही थक्क करणारी आहे. तेथील रस्ते, पाण्याची व्यवस्था, उद्योग वाढविण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न, पर्यटनाच्या माध्यमातून केलेला विकास, वाळवंटात धरण बांधण्याची साधलेली किमया... हे पाहताना माझ्या महाराष्ट्रात असे का साकारू शकत नाही, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. या सर्व देशांतील नेत्यांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांचा स्वार्थ कधी आड येऊ दिला नाही. प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले आणि विकासाचाच विचार करणारे लोक अशा प्रकारची प्रगती करू शकतात. महाराष्ट्राचाही सर्वार्थाने विकास करणे शक्य आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ताही येथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती येथे नाही, हेच आपले दुर्देव आहे. त्यामुळेच राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षानंतरही पाणी, वीज, बेरोजगारी या प्रश्नांवरच निवडणुका लढविल्या जात आहेत. हे सारे चित्र बदलायचे आहे की नाही, याचा विचार आता महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांना करायचा आहे. गेल्या ६० वर्षांतील सर्वच राजकीय पक्षांनी लोकांना गृहीत धरले आहे. जातीपातीचे राजकारण केले आहे. यामुळे महाराष्ट्र गर्तेत गेला आहे. शेतकर्‍याना आत्महत्या कराव्या लागत आहेत, तर चांगल्या शिकलेल्या तरुणांनाही बेरोजगारांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. वीज फुकट देऊ, नोकर्‍याच देऊ, दोन रुपयांत धान्य देऊ, अशा लोकप्रिय घोषणा करणार्‍याच राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांना निसर्गाकडून फुकट मिळणार्‍या पाण्याचे साधे नियोजन करता आलेले नाही. नुसता मराठवाड्याचा विचार केला, तर तेथे पाण्याची पातळी ७०० फुटांहून खाली गेली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर १५ ते २० वर्षांनंतर मराठवाड्याचे वाळवंटात रुपांतर होण्याची भीती काही अभ्यासकांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. याच मराठवाड्यात शेतीचे व शेतकर्‍याचे पाण्याअभावी हाल होत आहेत. परंतु, त्यांचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळ नाही.

औरंगाबाद येथे बीअरच्या सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यासाठी पाण्याचा उपस मराठवाड्यातच केला जात आहे. बीड आणि लातूर येथे बिस्लेरीसारख्यांचे अनेक प्रकल्प टाकण्यात आले आहेत. लोकांना बाटल्यांतील पाणी घेण्याची सक्ती करणारे हे कोणते धोरण आहे? दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत असताना आमचे राजकारणी मात्र सत्तेत मश्गुल आहेत. शेतकर्‍याच्या आत्महत्त्या झाल्या की, कर्जमाफी करायची; परंतु प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सोडवणूक करायची नाही. शेतीचे, पाण्याचे, वाढत्या शहरीकरणाचे,विजेचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य नियोजन करायचे नाही. तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्र्नच लोंबकाळत ठेवायचे, अशी या राजकारण्यांची नीती आहे. जेथे नियोजनाच्याच नावाने बोंब आहे, तेथे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही. भविष्याचा वेध घेणे, आगामी काळाच्या गरजा लक्षात घेणे, त्यासाठी महाराष्ट्रातील प्रश्नांचा आढावा घेणे - यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळही नाही आणि इच्छाशक्तीही नाही, हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

`महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना करण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा केला होता. लोकांचे प्रश्न पुन्हा एकदा समजून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चांगल्या व तज्ज्ञ लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या विकासाचा लढा लढताना लोकांचा पाठिंबा मिळेल का, याची पाहणी केली. त्यानंतरच पक्षाची स्थापना केली. हे सारे करताना केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्क येथील भाषणात महाराष्ट्राच्या विकासाची `ब्लू प्रिंट' तयार करण्याची घोषणा केली होती. आजही काही लोक खवचटपणे `ब्लू प्रिंट' कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करतात. अशी `ब्लू प्रिंट' माझ्याकडे तयार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सात विषय आम्ही तयार केले आहेत. त्यासाठी पक्ष स्थापनेच्यावेळीच पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीत तज्ज्ञ लोकांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध प्रश्नांचा निरंतर अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये अर्थकारण, आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांसह अनेक विषयांवर नेमके काय केल्यास महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास होईल, यांच्या योजना तयार केल्या जात आहेत.

चांगले रस्ते बांधल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, उद्योगांचा विकास होऊ शकतो. आजचे अनेक राजकारणी वेळोवेळी परदेशात जातात. तिथून येताना आपल्या नातेवाईकांसाठी अनेक गोष्टी आणतात. मात्र त्यांना महाराष्ट्रासाठी एखादी गोष्ट आणावी, असे का वाटत नाही? परदेशात एकदा रस्ते बांधले की, ते ३० वर्षे टिकतात. असे चांगले रस्ते आपण कधी बांधणार? चांगले रस्ते बांधले तर त्यावर खड्डे कसे पडणार आणि मग खड्डे बुजवण्यासाठी व पुन्हा रस्ते बांधण्यासाठी निविदा कशा काढणार, एवढाच विचार करणारे राजकारणी महाराष्ट्राचे काहीही भले करू शकत नाहीत. ब्रिटनमधील कंपन्यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांसंदर्भात अलीकडेच येथील महापालिकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सदर पुलाची जाबदारी ही १०० वर्षापर्यंत आमची होती. आता ही जबाबदारी तुम्ही सांभाळा. अशी बांधीलकी आमच्यात कधी निर्माण होणार? आम्ही आज पूल बांधले की, दुसर्‍या आठवड्यात त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू केले जाते. वर्षभरात पुलाला खड्डे पडून दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला जातो. या खराब बांधणीमुळे राज्याच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो आणि विकासाचा पैसा खड्ड्यात जातो. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांकडे द्रष्टेपणा नाही. एवढेच नव्हे, तर प्रश्न लोंबकळत ठेवायचे किंवा वाढवत न्यायचे, एवढेच काम ही मंडळी करत आहेत. यातून केवळ महराष्ट्रच नव्हे, तर सार्‍याच देशाचा विकास अडकून पडला आहे. चांगले रस्ते न बांधणार्या कंत्राटदारांवर कठोरपणे कारवाई होत नाही, की या कामांवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍याना जेलची हवा खावी लागत नाही, कारण राजकीय नेत्यांचे यामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात.

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी आपल्या बलिदानाची आत्माहुती दिली, अशा स्वातंत्र्यवीरांचे बलिदान भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडविणार्‍या राजकारण्यांना धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्ग शत्रू प्रवेश करू शकतो, असा इशारा दिला होता. तरी आपण आजही झोपलेलो आहोत. त्यामुळेच समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला करण्याची हिम्मत पाकिस्तानी अतिरेकी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांनी अशा बेजबाबदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे.

आज शहरांच्यानियोजनाचा पत्ता नाही. नियोजनाअभावी शहरे बकाल होत आहेत. अनधिकृत झोपड्या वाढत आहेत. कोणीही यावे व कसेही राहावे. कोणतेही नियंत्रण नाही. कसलाही धाक नाही. मुंबई व महाराष्ट्रात परप्रांतातून लोंढे येत आहेत. अनधिकृत झोपड्या बांधून राहत आहेत. या अनधिकृत झोपड्यांना मान्यता देऊन त्यांनाच मोफत घरे देण्याचे उद्योग राजकारणी करत आहेत. यातूनच मुंबईसारख्या शहरांमध्ये परप्रांतीयांची दादागिरी मतांच्या रूपाने वाढत आहे. दिवस - रात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना तसेच सरकारी नोकरांना हक्काची घरे नाहीत आणि बिहार, युपीतून येणाऱ्या लोंढ्यांना मात्र मोफत घरे मिळत आहेत. अरबाच्या तंबूत घुसलेल्या उंटासारखी येथील मराठी माणसाची अवस्था होणार आहे.

मतांच्या राजकारणासाठी शहरांची वाट लावली जात आहे. मुंबईतून केंद्राला ६८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्यातून महाराष्ट्राला योग्य वाटा केंद्राकडून दिला जात नाही. अविकसित राज्ये या नावाखाली बिहार व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांना या महसुलातील मोठा वाटा मिळतो. एकीकडे महराष्ट्राने या राज्याच्या विकासाचा वाटा उचलायचा आणि ते कमी ठरावे, म्हणून तेथून येणार्‍या लोंढ्यांनाही येथे पोसायचे, हे उद्योग महाराष्ट्राला फार काळ परवडणारे नाही. येथील भूमीपुत्रांनाच शंभर टक्के येथील व्यवसायात अथवा नोकर्यांरमध्ये वाटा मिळायला हवा. रेल्वे, आयकर अथवा अन्य केंद्रीय सेवांमध्ये महाराष्ट्रात भरती होणार असेल तर येथील मराठी तरुणांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, यावर मी ठाम आहे. यासाठीच `मनसे' ने मधल्या काळात आंदोलन पुकारल्यानंतर दिल्लीतील युपी-बिहारच्या नेत्यांनी मी देश तोडायला निघाल्याचा आरोप केला.

आज प्रत्येक राज्य आपला विकास, अस्मिता, भाषा व वेशभूषा यासाठी पराकेटीचे आग्रही आहेत. दक्षिणेतील राज्यांकडे याबाबत आदर्श म्हणून पाहता येईल. आपल्याकडील बिनकण्याच्या नेत्यांमुळे मराठी तरुणांचे हक्क डावलले जात आहेत. दुकानांवर मराठी पाट्या लावणे, शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असणे आणि नोकऱ्या मध्ये मराठी तरुणांना प्राधान्य देणे या मुद्दांवर मी ठाम आहे.

दुर्दैवाने मराठी मते फोडल्याचा आरोप माझ्यावर लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही `बालबुद्धी' च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठी मतदार म्हणजे काही शिवसेनेच्या गोठ्यातील गाय नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. २००४ साली `मनसे' हा पक्ष नव्हता. त्यावेळी मुंबईत लोकसभा निवडणुकीत काय झाले होते? मराठी मतदारांनी तेव्हा शिवसेनेला का मते दिली नाहीत, याचा विचार प्रथम त्यांनी करावा आणि त्यानंतरच मराठी मते फुटल्याचा बेताल आरोप करण्याची हिम्मत करावी.

खरे तर मराठी मते फुटलेली नाहीत. नवमतदारांनी `मनसे' ला भरभरून मते दिली आहेत. मी मांडत असलेले विचार, त्यासाठी केलेली आंदोलने, घेतलेल्या केसेस आणि माझी तळमळ अवघ्या तीन वर्षांत लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच लोकंनी `मनसे' ला मते दिल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे व अस्मितेचे स्वप्न घेऊनच मी राजकारणाच्या रणांगणात उभा आहे. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना आपण राज्यात सत्ता देऊन पाहिली आहे. आता एकदा माझ्यावर विश्वास टाकून पाहा. विधानसभा जिंकण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र मी घडवेन, एवढेच मनापासून सांगतो.

- मा. राज ठाकरे
***
(शब्दांकन - संदीप आचार्य)
सौजन्य : लोकसत्ता - लोकरंग, रविवार २४ मे, २००९.

शुक्रवार, २६ जून, २००९

माझी भूमिका, माझा लढा! - श्री. राज ठाकरे


मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल युपी-बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी-बिहारची वकिली करणार्‍या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भैय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकार्‍यांची, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत, ते चांगल्या घरातले आहेत. त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्र्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांना उत्तम करियर्स आणि व्यवसाय आहेत. परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला, ज्यातून त्यांना काहीही आर्थिक किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही. तात्काळ कोणती सत्तापदंही त्यांना मिळणार नाहीत. नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या सार्‍या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही, हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात येणार्‍या यूपी-बिहारमधल्या सर्व भैय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहोत असे वाटत असते. एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत:ची भाषा असते. तिची समृद्ध अशी संस्कृती असते. पाहुणा जेव्हा येतो, तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते, तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी, त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते. उत्तर प्रदेश, बिहारमधला साधा माणूस असो, नेता असो, पत्रकार असो, शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी असो, नट असो, वा मच्छीमार असो - तो तिथे, त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते. इथली भाषा तो शिकत नाही. इथल्या संस्कृतीला, स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो, त्याच्यावर दादागिरी करतो. एखाद्या युपी-बिहारच्या रिक्षा-टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन: पुन्हा येत असतो. आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला औदार्याने, सहिष्णूपणे पुन: पुन्हा माफ करतो, विसरून जातो. असं बंगाली, पंजाबी, उडिया, आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही. कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात. परंतु आपण सहिष्णू आहोत.

आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो. सवर्च अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही. परंतु युपी-बिहारमधल्या भैय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे. सैन्यात मराठा बटालियनमध्ये ‘मराठा’ (म्हणजे महाराष्ट्रीयन) या शब्दाची फोड ‘मरता लेकिन हटता नही वो मराठा’ अशी केली जाते. यापूर्वी हात जोडून या यूपी-बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता-बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की, इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे, तेव्हा या संस्कृतीचं रक्षण, संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे. असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं. परंतु यांची मग्रूरी इतकी आहे की, उत्तर प्रदेश-बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह, मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ‘शिकवण्याचे’ प्रयोग इथल्या युपी-बिहारवाल्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच. पण मराठी ही इथली राजभाषा आहे. तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. शिवाय स्वत:ची भाषा-संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला युपी-बिहारमधल्या भैय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का? या भैय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रात छट पूजा, उत्तर प्रदेश स्थापना दिवस, राजकीय बळ दाखवण्याकरिता जोराने साजरे करायला सुरुवात केली. रिक्षा असो, टॅक्सी असो, रस्ते असोत, इमारती असोत, सोसायट्या असोत, वर्तमानपत्रं असोत, चॅनल्स असोत, मच्छिमारी असो, सिनेमे असो - सर्वत्र या युपी-बिहारवाल्या भैय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली. तेव्हा लक्षात आलं की, यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले. आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं. म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी महाराष्ट्रात युपी-बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणार्‍यांना जगावं लागेल. महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल. हे झालं नाही, तर महाराष्ट्रात अराजक माजेल.


महाराष्ट्रात जी कायदा-सुव्यवस्था आहे, महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत, त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात. ती संस्कृतीच उखडून टाकली, तर इथे जौनपूर-आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल. राजाभय्या, अमरसिंह, लालू, पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील. हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसर्‍या दिवशी कोल्हापूरमध्ये ‘महाराष्ट्राचे पुढचे मख्यमंत्री अमराठी झाले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही,’ असे उद्‌गार काढले. आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत. परंतु ही सार्वत्रिक भावना आहे. मराठी जनतेत, मराठी नेत्यांमध्ये, मराठी नटांमध्ये, सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या युपी-बिहारवाल्यांबद्दल चीड आहे. मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो. नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे. ते साहस मी करतो आहे. परिणामांची पूर्ण कल्पना करून. एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं, आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं, बाळासाहेबांनी केलेलं होतं, खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं.

कित्येक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात. परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली, तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे. तेव्हाचं आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं, प्रामुख्यानं नोकर्‍यांसाठीचं आंदोलन होतं. इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले. आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे. त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते, त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन, शस्त्रास्त्रं आहेत. इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात. भैय्या टॅक्सीवाला, रिक्षावाला, मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भैय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात. परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मग्रुरी, महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष, उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या सार्‍याचं आपल्याला दर्शन होतं. त्यामुळे ‘तो गरीब बिचारा पोटासाठी येतो’ अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही.

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे. ती एकपदरी नाही, बहुपदरी आहे. महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो. युपी-बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ‘व्हाया दिल्ली चेपू इच्छितात. हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे. पं. बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरिसा, आसाम, केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही.
कारण तिथली जनता या भैय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे. स्वत:च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरूद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत. पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही.

आज मराठी माणूस समृद्ध आहे. त्याची आज जागतिक बाजारात पत आहे. दीपक घैसास, आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर आणि यांसारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत. आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकर्‍या करत आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे. पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो. या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत.

एकेकाळी, म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. तेव्हा तो माझाही पक्ष होता. तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता. बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच. त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही.

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यातलेच काही मराठी मला आणि माझ्या सहकार्‍यांना शिव्याशाप देत आहेत. पण त्यांची मुलं-नातवंडं पुढे मला दुवा देतील. कविता, पुस्तकं, संस्कृती, अहिंसा, सहिष्णुता मलाही कळते. नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी, विकासदृष्टीसाठी मी अकादमीच (पुण्यात) सुरू केलेली आहे. ज्या शिवाजी पार्कवर परवा स. पा. ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या, तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं. त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते. पण मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी कविता टिकेल. मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी संस्कृती टिकेल. मराठी संस्कृती टिकेल तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल. शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो. पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. तसं नसतं तर शेजार्‍यांच्या सद्‌सद्‌विवेकबुद्धिवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलीसदलही ठेवलं नसतं. संघर्ष करताना रक्त, घाम, अश्रू द्यावेच लागतात. पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात!

फ्रांन्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत: भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रांन्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात. करुणानिधी मलेशियातल्या तामिळांसाठी मलेशियन सरकारशी वाग्‌युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते. दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो. इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणार्‍या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही. राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणार्‍या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्यावर थेट संबंध ठेवून असतात. गांगुलीला टीममधून काढल्यावर पं.बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात. हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत युपी-बिहारची वकिली करतात, ते प्रांतवादी नाहीत? अमिताभ बच्चन स्वत:ला ‘छोरा गंगा किनारेवाला’ मानतो. ते प्रांतवादी नाही का? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणार्‍या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी, भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं, तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत, असं दाखवलं जातं. त्यांचा मेकअपमन जरी गांगुली, सुब्रम्हण्यम, मिश्रा कुणीही असता, तरी ते असेच वागले नसते काय? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय? ते तन, मन, धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत. त्यांनी जे मिळवलं ते इथे, हेही सत्य नाही का?फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो? राज्यघटनेत असं लिहिलंय का? मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो. सर्व जग जरी विरोधात गेलं, तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता, महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषा यासाठीच लढत राहू. युपी-बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच. मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की, जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय, सामील व्हा!

आपण विजयी होऊच; कारण कोणताही कायदा, कोणतंही युद्ध, कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मराठी माता-भगिनी-बांधवांनो, विजय तुमचाच आहे.

जय महाराष्ट्र!


-महाराष्ट्र टाईम्स, ९ फेब्रुवारी, २००८

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी...

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी, कोणीतरी आपल्याला आवडतं. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. कालांतराने हीच भावना बळावते आणि 'त्याच्या' किंवा 'तिच्या' शिवाय जगणे फार अवघड आहे इत्यादी इत्यादी विचार मनात येतात. हे सगळे फार नैसर्गिक आहे. खरंतर हा त्या वयाचा प्रताप असतो. खरंतर त्या वयात 'कुणीतरी' आवडावं इतकीच योजना निसर्गाने केलेली असते. पण 'त्याच्याशिवाय शक्य नाही' हा मात्र पूर्ण मनाचा खेळ असतो. आयुष्यात प्रथमच असे घडत असल्याने मनाची तशी समजूत होणे स्वाभाविक आहे. त्या वयात निसर्ग स्वप्न पहायची वृत्ती देतो, व्यवहार नव्हे. प्रेम करायची भावना देतो, विषयाकर्षण नव्हे. 'तूच एकमेव' चा विचार देतो, 'तू पण चालेल' नव्हे. थोडक्यात काय, तर मन स्वप्नाळू आणि अपरीपक्व असते.

पण हा काळ दुर्दैवाने जास्त नसतो. मनाची ही अवस्था आयूष्यभर राहू शकत नाही. ते जेंव्हा स्वप्नातून सत्यात येते, तेंव्हा 'स्वप्नात असताना' घेतलेले निर्णय जर त्याला चुकिचे वाटले तर मग सुरू होते ती मनाची असह्य फरफट. आणि प्रेम-विवाह करून नंतर घटस्फोट घेणार्‍या बहुतांश जोडप्यांमध्ये ही फरफटच कारणीभूत असते!

मग सत्य काय आहे? अशा मनाला काबूमध्ये आणावे तरी कसे? योग्य जोडीदार खरोखर 'एकमेव' असतो का? 'त्या वयात' मनाची समजूत कशी घालावी? असे अनेक विचार मनात येतात. आणि इथेच मन परीपक्व व्हायला चालू होते असे म्हणायला हरकत नाही.

व्यवहारी विचार केला, तर 'तो किंवा तीच एकमेव' ही कल्पना चुकीची आहे. एक नाही मिळाला तरी आपल्याला हवा तसा दुसरा जोडीदार मिळणे हे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. शेवटी 'लग्नांतरचे यशस्वी आणि सुखी आयुष्य' हेच आपल्याला हवे असते ना? मग काय लागते त्यासाठी? तर त्यासाठी तीन 'स' पहावे लागतात. 'सवय, स्वभाव आणि समजूतदारपणा'.

सवयी काय आहेत? आपल्याला जूळणार्‍या आहेत का? (एकाला क्रिकेट आवडते तर दुसर्‍याला 'एकता कपूर' ची सिरियल! बस्स इतके कारण खूप असते. हो ना? :) स्वभाव कसा आहे. आपल्याशी जुळतो का? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट 'समजूतदारपणा'. ही एकच गोष्ट पहील्या दोन्हींना पुरून ऊरेल. म्हणजे, जरी स्वभाव आणि सवयी जुळत नसतील तरी केवळ 'समजूतदारपणा'च्या जोरावर संसार खूप सुखी होतो.

तेंव्हा, तारुण्याच्या भरात पट्कन आवडून गेलेली एखादी व्यक्ती 'आयुष्याचा जोडीदार' करण्याची गडबड मुळीच करायला नको. ह्या तिन्ही गोष्टी पुरेसा वेळ देउन पहायला हव्यात.. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या तिन्ही गोष्टि जुळणारी एखादी व्यक्ती जरी आपली झाली नाही, तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही. आपल्यासाठी दुसरे कोणी तरी जरूर वाट पहात असते :)

शुक्रवार, ५ जून, २००९

प्रेम

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
नेहमीच वाटत.....

नेहमीच वाटत कोणीतरी आपलस व्हाव्
सुखदु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
ह्रदयात सामावून घेणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत बागेत भेट्णार कोणीतरी असाव्
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत हातात हात घेणार कोणीतरी असाव्
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असाव्
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठ्वणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असाव्
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
मलाही आय लव्ह यु म्हणणार कोणीतरी असाव्

एक लघु कथा ...

एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....


सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

मराठी माणूस...

उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..

अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकातच दिसेल..

.....

म्हणून म्हणतोय मित्रांनो..
हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि

"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..

दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..

आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक
... असेल हिंमत .. तर अडवा...

मराठी प्रतिज्ञा

मराठी ही माझी मातृभाषा आहे.

मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.

माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.

इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.

त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.

जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.

महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.

मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.

मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.

मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.

जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!